दोन मनाचं भांडणं
दोन मनाचं भांडणं
किती रे तू निर्दयी. जन्मास आम्हाला घालून वाऱ्यावर सोडतोस. कुठल्या जन्माचं पाप आमच्याकडून फेडून घेतोस? तारतोही तूच आणि मारतोही तूच. मरणाच्या दाढेत निष्ठुरपणे फेकून देतोस आणि क्षणात अलगद, हळुवार उचलून जीवदान देतोस. तुझे कावे कळण्याच्या पलीकडचे रे ..सारं काही हिसकावून घेतोस, कफल्लक करतोस आणि पुन्हा एखादा आशेचा किरण दाखवतोस. भरभरून देतोस पण त्याचा उपभोग घेऊ देत नाहीस. अक्कल देतो सर्व काही हिसकावून घेतो. धन संपत्ती देतोस त्याची समज काढून घेतोस. दात आहे तर चणे नाही चणे आहे तर दात नाही असा कसा रे तुझा तुघलकी कारभार? परीक्षा तूच घेतोस तर कधी तूच आयुष्यच गुंता सोडवतोस. अजब तुझा कारभार तुझ्या सारखा तूच देवा. जाब तुला रे कुणी विचारावा? काहींना दोन वेळच खाणं मुश्किल करतो. तर काहींना जीवनातूनच बेदखल, निराश्रित आयुष्य बहाल करतो . काहींवर भलताच मेहेरबान होतोस. की तूही माणसारखाच विकला गेलाय. लाचखोर झालास. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचे , कसब शिकलास ...की तुलाही माणसानं संमोहित केलंय. अरे करता धरता तू, होतोय का मग प्रेक्षकांची भूमिका निभावतोस? सांग ना? किती दिवस असा कमरेवती हात ठेवून भागात बसणार आहेस सांग ना? तुझा नीतिमत्तेच्या, अध्यात्मिक वाटेवर चालणार्याचीच का अंत पाहतो आहेस. जगाचा पोशिंदा जीवनयात्रा संपवत आहे. कामगार हवालदिल आहे. कुणाला तर खायला काळ नि भुईला भार असं जीवन प्रदान करतोस. संधीसाधू बगळे सावज टिपत आहेत. अन स्वतंत्र मात्र तमाशा पाहत उभा आहेस कर कटेवर ठेवूनिया. हे सारं कथन ऐकुन दुसरं मन दीर्घ श्वास सोडून पहिल्या मनाला म्हणाल झालं तुझं बोलून आता माझं शांतपणे ऐक अन मग काय ते ठरव.
किती रे तू भोळा? अनाकलनीय असलं कि दैवाच्या भरवशावर सोडून मोकळा होतो. नशिबावर सारं जगणं उधळतो. कष्ट नको कमी मेहनतीत लगेच यश तुला हवं असत. तुला एवढं कसं कळत नाही जगात जे काही अनमोल असत ते दुर्मिळच असत. कोहिनुर हिरा जपून ठेवतात अन दगड - धोंड्यांना लोक ठोकरून जातात. धन्य तुझं राजकारण, धन्य तुझं वागणं, स्वप्न घेऊन झोपी जातो. दिशाहींन भरकटतो अन योजनाबद्ध जीवनात भविष्याची दिशा न ठरवताच झोपी जातो . पुन्हा सकाळी पडलेलं स्वप्न पण खरं असत म्हणून मोकळा होतो. तू स्वप्नात जगतो. स्वप्नातच मनाचे मांडे खातो. उभ्या आयुष्याची माती झाली म्हणतोस? अरे माती एवढी सामान्य असती तर हिर्या मोत्यांनी तिच्या पोटी जन्म घेतला असता का? वेळ गेल्यावर कळते स्वप्न पूर्ण करण्यास कृती करण्यास तर पण विसरलोच. नशीब घडवणं बिघडवणं तर आपल्याच हाती होत. तूच तुझ्या जीवनाचं शिल्पकार. तुझ्या बुद्धी सामर्थ्यावर, कृतीवर तुझा भविष्य घडणार आहे मित्रा. उगाच कुढत बसू नको. हेवा कुणाचा करू नको . तो एक श्रुष्टीनिर्माता त्याने दिलाय भरभरून ... त्याच्यासारखा तोच रे ...पण तूच ते नष्ट करी चाललंय अन तोंड वर करून म्हणतोस माझ्या जगण्याला अर्थच उरला नाही. अरे थू तुझ्या जिंदगानीवर ... तुझ्या पेक्षा ती जनावरे, पक्षी, जीवजंतू हुशार आहेत. ते मार्ग काढतात. भरभरून जगतात. निसर्गाचा समतोल राखतात. पथ्थराला पाझर फोडन्याची धमक तुझ्यात आहे.. काळ्या आईच्या पोटातून मोती पिकवण्याची शक्तीही तूच बाळगतोस. जे काही करशील ते मनापासून कर. यश तुझ्या पायाशी लोळण घालील. तूच खुदाचा बंदा तूच ईश्वराचं शांतिदूत आहेस. स्वतःला ओळख.