स्वागत आव्हानांच !
स्वागत आव्हानांच !
येत असतात ढगं असे अधून मधून दाटून,
पण झेलायचं असतं त्यांना धीरानं उरात साठवून...
वादळांना नसते तमा दिशा आणि दशेची,
पण आपलं आपणच सावरत, वाट असते शोधायची...
वादळ वारा पावसाची जरी घट्ट असतात नाती,
पण विध्वंस करतातच ना ती, जर उफाळून आले अति...
भरल्या ढगांच्या सावटानं काळोख होतच असतो ,
पण निराशेनं असं खचून, ध्यास सोडायचा नसतो...
बांध फुटला ढगांचा कि बरसतोच ना पाऊस,
मग त्याच पावसात भिजून आपण पुरवायची असते हौस...
भिजून पंख जड झाले म्हणून उडायचं थांबत नाहीत ना पक्षी,
तशीच न थांबता आपणही स्वप्नांची, रेखाटायची असते नक्षी...
वादळी पावसानंतरच येते ना स्वच्छ पालवी फुलून,
तसच आव्हानांच स्वागत करायचं असतं चेहऱ्यावर स्मित ठेवून...