सरींनो घ्यावी विश्रांती
सरींनो घ्यावी विश्रांती
तुडुंब झाली धरणे आता फाटू लागली धरती।
तांडव हे थांबवा सरींनो घ्यावी जरा विश्रांती।।धृ।।
जिकडे तिकडे सभोवताली झाले पाणीच पाणी।
महापुरी विळख्यात सापडून झाली जीवितहानी।।
ज्याच्या त्याच्या मनात भरली यमराजाची भीती।।१।।
घरात नाही घास खायला पाणी नसे प्यायला।
नजरकैद जीवास, मिळेना जरा कुठे जायला।।
थयथयाट किती करता आता कोसळता तरी किती।।२।।
पशु, पक्षी अन् मानव सारे अनाथ बेघर झाले।
आशेच्या नजरेने देवाकडे पहायला लागले।।
आशा त्यांची विफल न व्हावी मान्य करावी विनंती।।३।।
क्रोध अनावर झाला म्हणून का सीमा ओलांडता।
जमदग्नी अवतार धरून का ऐसा बदला घेता।।
क्रोधाला आवरा मनाशी जरा धरावी शांती।।४।।
आकाशातून कोसळला कसा दैवगतीचा फेरा।
कुठे अजूनही ओठ कोरडे झालाच नाही पेरा।।
फिरवा जरासा मोर्चा तिकडे भिजवा तिथली माती।।५।।