मरण
मरण
गावतलं फुटलेलं तांबडं बघून
जात असतो बाप शेतात .
पिकं लेकरांसाठी लेकरासमान जपणारा
असतो फक्त काळ्या आईच्या विश्वात
कुणीतरी जपलं पाहिजे मातीचं मोल
ही ओझ्याची काळजी दिसते सुरकुत्यात ..
भाकरी पोटाला हवी मग पिकलं पाहिजे शेत
तवा कुठं धान्य येतं जात्यात
असे विचार घेऊन पडीक रानात
मोती पिकवायचं स्वप्न बाळगून असतो बाप.
अन् पावसाचा अनिश्चित काळ
डोळ्यातल्या पाण्याला ठरतो श्राप
सुकलेली इवलीशी हिरवी पिकं
जवा पिवळट पडून माना टाकतात.
तेवा बापाचे उत्पन्नाचे
सारेच अंदाज चुकतात
बाप कधीच जवळ करत नाही
फास आणि बाभळीचं झाडं .
पण आतली काळजी अन् कर्ज
झोपायलाच लावतात कायमचं गाढ
बाप मरतो विरोधी, सत्ताधारी
सगळे झाडून येतात.
पांढ-या कपाळाच्या आईला
भेगा पाडून जातात
सांत्वनपर अनुदानावरही
सावकारं डोळा ठेवत असतात.
वाईट झालं म्हणून तेराव्यास
भरपेट जेवत असतात.