ओळख
ओळख
कोकण एक निसर्गरम्य ठिकाण
भुतांचही गाव,
अन् संतांच जन्मस्थान.
कोकण म्हणजे फेसाळणारा समुद्र,
भेलपुऱ्यांच्या कागदांशिवाय
कोकण म्हणजे रसाळ फणसाचे गरे,
काटेरी स्पर्शाशिवाय
कोकण म्हणजे वाळणावळणांचा नकाशा,
ट्राफिक आणि सिग्नल शिवाय
कोकण म्हणजे लाल मातीचा सुगंध,
गगनचुंबी इमारतींशिवाय.
क्षितिज तर येथे दिसतच नाही
डोंगरांचीच काय ती गावांना किनार
कितीही दुष्काळ पडो शेतात
तरी आत्महत्येने जीवन नाहीच संपवणार.
मुंबईसारखी बिस्लेरी बॉटल
कदाचित येथे आढळणार नाही
पण विहिरीच्या पाण्याची चव मात्र
जगात शोधुन सापडणार नाही.
मुंबईसारखे टॉवर्स नाहीत पण
शुध्द हवा तर नक्कीच आहे
भविष्यात ऑक्सिजनचे सिलेंडर भरायला
कोकणच अव्वल असणार आहे.
भारतातील अर्धे देव तर
तुम्हाला कोकणातच आढळतील
काम ठरो वा ना ठरो
पण कौल मात्र नक्की लावतील.
रवळनाथ माउली वेताळ भरतेश्वर
यांच्यावरच इथे विश्वास आहे
आणि प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला सुद्धा
होय महाराजा प्रसिध्दच आहे.
प्रत्येक वर्षी प्रत्येक बोर्डात
कोकणच सर्वात अव्वल आहे
आणि त्याच्याच कृपेने का होईना
पण फळांचा राजाही कोकणच आहे.
भाऊबंदकी आणि अंधश्रद्धेचा कलंक
इतकच काय ते दुर्दैव कोकणाचं
पण श्रीमंत असो वा गरीब यांच्यासाठी
जीव लावणारं माणूसच महत्वाचं.
गणपती शिमगा नी जत्रांनाच काय ती खेड्यापाड्यात थोडी जाग असते
अन मुंबईच्या सामान्य चाकरमान्यांनाही
तीच एक हक्काची सुट्टी असते.
इथे,
एसी नाही साधी एसटी आहे
पुष्कळ नाही पण समाधानी आहे
आणि भजन कीर्तन मिसळीचा प्रसाद
हीच कोकणाची खरी ओळख आहे.