नव्यानं भेटू
नव्यानं भेटू
कित्येक दिवसांतून तिचा आज मेसेज आला
कसा आहेस'?
माझं ठरलेलं उत्तर
आहे बरा'?
अता तिला कसं सांगणार
तू गेल्यापासून फक्त जीवंत आहे
जगत मात्र नाही'
सारं कसं थांबलंय तिथेच
तू निरोप घेतल्यापासून
तुझा निरोप घेताना फक्त एकच वाटलं होतं
तू भेटणार नाही म्हणून काळीज फाटलं होतं
तेव्हापासून
माझं आयुष्य अजूनही त्याच वाटेवर थांबलं आहे
जिथं सोडून गेलीस तू तिथं एक गाव बांधलं आहे
त्या गावात एकटाच राहतोय
तू येशील या आशेवर
पण तू काही येत नाही
सारं कसं विझलय अता
एक ठिणगी देखील पेटत नाही
तू निरोप घेतलास दूर गेलीस
त्या तिथून, तिकडून, पलिकडून
तुझा आवाज आला नाही
मला कधीच जायचे नव्हते
पण तू थांब म्हणाली नाही
आज हे सारं तिच्या एका मेसेजने आठवलं
पण अाज ती किती भरभरून बोलत होती
आम्ही अनोळखी होतो तेव्हा बोलायची तशी
अता वाटतंय पुन्हा अनोळखीच व्हावं दोघांनी
अन् नवं काव्य लिहावं नव्या मैत्रीचं
म्हणूनच
चल ना पुन्हा एकदा नव्यानं भेटू आपण
जे लक्षात आहे तेवढं विसरून बोलू आपण.