तू गेल्यापासून
तू गेल्यापासून
तू कधी नीट आकाश पाहिलंय का?
नसेल तर बघ
प्रत्येक पाखराची नजर त्यावर असते
'झेपावण्यासाठी'
सायंकाळचं तांबूस सूर्यबिंब तर
चित्रकाराने असंख्य कुंचले फिरवावेत निरनिराळ्या रंगांचे
अशा छटा उधळीत असते
'सायंकाळच्या संधीप्रकाशात'
अन् त्यावेळी त्याला पाहिलं तर सार्या रंगछटा
एकत्र झालेल्या दिसतात त्या आकाशाच्या धरतीवर
पाखरं आणि ते सूर्यबिंब एकमेकांना कवेत घेताना दिसतात
तर रात्रीच्यावेळी त्याला दृष्ट लागू नये म्हणूनच
चंद्र उगवतो त्याच्यावर असलेल्या डागांसह
पण याच आकाशात जेव्हा आभाळ येतं
तेव्हा हेच आकाश बेरंग दिसू लागतं
ना त्यावर कोणत्या रंगछटा असतात
ना कुण्या चित्रकाराचे असंख्य कुंचले
ना त्याला भीती असते दृष्ट लागण्याची
म्हणूनच चंद्रही हरवून जातो
अमावस्येच्या रात्रीसारखा
मग पाखरंही त्याला सोडून जातात
अन् सूर्यही हरवतो बेरंग होऊन
शेवटी आकाशाची व्यथा ऐकायला कोणीच थांबत नाही
अन् मग ते आकाश बेवारस होऊन जातं
ना त्याला साथ असते जमिनीची
ना आभाळ टेकू देतं क्षितीजावर
हे सर्व एकदा बघच तू
घे अनुभव त्याच्याही जगण्याचा
जर यातलं काहीच पाहिलं नसशील तर ये माझ्याकडे
तुला माझ्यातच दिसेल
एखादं भिरभिरणारं आकाश
जे स्वतःचं अस्तित्वच हरवून बसलंय
काठ नसलेल्या क्षितीजासारखा
तू गेल्यापासून,,,