जगणं
जगणं
मनातल्या मनात बोलायलाही लागतं थोडंसं धैर्य
समोरच्याला ऐकू जाणार नाही इतकंच असायला हवं स्थैर्य
मनात तरी साठवून ठेवायचं किती चेहरा हसरा ठेवून?
कितीतरी जण वावरत असतात आपल्या आजूबाजूला मनावर ओझं घेऊन
खदखद कधी ना कधी येते बाहेर, ती वाटायला नको कचरा
त्यासाठी हवं कुणीतरी जिथं भावनांचा,विचारांचा होईल निचरा
व्यक्त व्हायला लागत नाही शहाणपण जे लागतं ऐकून घेण्यात
म्हणूनच का कुणी करतं सुपीक मातीचं मोल सोन्यात?
कितीतरी संघर्षानंतर उभा राहतो संसार थोडंसं धैर्य लागतं तो टिकवायला
जीवन हीच शाळा असते भावनांचं संयमन शिकवायला
कुणी असावंच सोबतीला हा नसावा प्रत्येक ठिकाणी दरवेळी हट्ट
मनोबलापेक्षा आत्मबलच माणसाला करत असतं जास्त घट्ट
ध्यानधारणा आणि छंद हे त्यासाठी आहेत उपाय
अपयश नसतं टिकत कायम हार मानून उपयोग काय?
कर्तव्यतत्परता हीच भाग्याची गुरुकिल्ली ही माणसाला हवी जाण
माणूस तेव्हाच होईल सुखी जेव्हा त्याला सारखे वाटतील मानापमान
यश आणि आनंदात करायची नाही कधीच चूक
जगण्यावर करायचं प्रेम तेच माणसाचं खरं सुख