--- असं वागावंच लागतं ---
--- असं वागावंच लागतं ---
संस्कार कसेही असुद्यात,
नाती कशीही असुद्यात,
घटना कशाही घडुद्यात,
असं वागावंच लागतं !
आपलीशी वाटणारी मनं मारावीच लागतात,
चेहरे एकमेकांपासून लपवावेच लागतात,
जुळलेल्या स्वभावाच्या तारा सुद्धा अलग होतात,
मिळणारे आलाप हि आपोआप विस्कटतात.
कधी नाही घडत आपल्या मनासारखं,
मन तोडून वागावं लागतं जगासारखं !
आपलीच माणसे एकमेकांपासून दुरावतात,
ती आपलीच होती का असेही प्रश्न पडतात ?
थोरामोठ्यांची मनं जपावीच लागतात,
दडपणाची ओझी झेलावीच लागतात,
मनाविरुद्धच्या घटना विसराव्याच लागतात,
लोपलेले संवाद आठवावें लागतात.
नाती रक्ताची असो कि मानलेली असोत,
मैत्रीची असो कि अचानक बनलेली असोत,
आपल्या आयुष्यात ती आपलीच असतात,
नाही पटलं तरी मानावीच लागतात.
वाहवत गेलेल्या मनाला थांबवावं लागतं,
तुटलेल्या सुरांची नाळ जडावीच लागते,
नाही आवडणाऱ्या चेहऱ्यांना सुद्धा बघावंच लागतं,
कधी कधी असं वागावंच लागतं ---