दुष्काळ
दुष्काळ
शेतात पीक सारे करपून गेले ।
पाणी कुठे कळेना झिरपून गेले ।।
आलाय घास तोंडी निसटून गेला ।
झालो बधीर भानच हरपून गेले ।।
हाती जे जे होते सारेच विकले ।
विकण्यालायक सारे संपून गेले ।।
नुकसान काय झाले बघण्यास आले ।
पाऊस घोषणांचा बरसून गेले ।।
मदतीस वित्त आले शासनाकडून
मधल्या मध्येच सारे हरवून गेले ।।
झाली जुगार शेती करणेच येथे ।
आता नशीब कैसे जिरवून गेले ।।
भ्यालो मुळीच नाही संकटांना ।
दुःखे मला मजबूत बनवून गेले ।।
येतात येऊ द्या दुष्काळ कितीही ।
विचारांनी मन समर्थ घडून गेले ।।