तिरुपती
तिरुपती
एकवीस मे 2023...!
स्टोरी मिरर आयोजित...एक प्रवास असाही...!
प्रवास म्हंटले की आठवणी खूप मनात रुंजी घालतात.मग तारांबळ उडते...!आठवणीत अनेक प्रवासाचे अनुभव असतात.मग नेमक्या कोणत्या प्रवासाचे अनुभव आपण आठवायचे। आणि शब्दबद्ध करायचे याचे कोडे पडते.प्रत्येक प्रवास काहीतरी आवणास आनंददायी आठवण देत असतो.ही गोष्ट आहे माझ्या अगदी नुकत्याच झालेल्या चौदा मे ते सोळा मे 2023च्या कोल्हापूर तिरुपती प्रवासाची.
मागच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये आम्ही मित्रांसमवेत तिरुपतीला रेल्वेने जाऊन आलो होतो. प्रवासही छान झाला होता.नुकतेच कोल्हापूर मुक्कामी थोडे स्थिरस्थावर झालो आणि नेमके लग्नाच्या वाढदिवसाचा विषय सहज डोकावला.डोकावला म्हणजे काय चांगलाच रुजला.बोलणे झाले आणि विमानाचे तिकीट मिळाले,राहण्याची आणि दर्शन तिकिटांची सोय झाली तर जाऊ पुन्हा असा सूर जुळून आला.
नुकताच मुलगा पुष्कर usa हुन दहा दिवसांच्या सुट्टीवर आला होता,दिवस मजेत जात होते आणि 13 मे ला त्याचे usa ला जाणे ठरले,आणि आम्हालाही 15 मे लग्नाच्या वाढदिवशी देव दर्शनाची तिकिटे मिळाली,14 मे ची कोल्हापूर तिरुपती आणि 16 मे ची तिरुपती कोल्हापूर ची तिकिटे बुक झाली.राहण्याची पण सोय झाली.
पुष्करच्या साहित्याची जुळवाजुळव आणि बांधा बांध झाली,बॅगा भरल्या आणि त्याला प्रवासासाठी कोल्हापूर हुन मुंबईस रवाना केले.
आम्ही पण थोडी विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे 14 मे च्या प्रवासाची तयारी केली.सोबत कच्च्या पोह्याचा चिवडा,भडंग,डिंकाचे लाडू,शेंग दाणे व इतर साहित्य घेतले आणि विमानासाठी विमान तळावर पोहचलो. चेकिंग झाले,आणि एकदाचे विमानात स्थानापन्न झालो.
टेकऑफ च्या सूचना मिळताच,पट्टा बांधला आणि विमानाने हवेत झेप घेतली.हा हा म्हणता विमान भरपूर उंचीवर जाऊन पोहचले.बाहेर क्षितिज रेषा आणि निळे अवकाश मन मोहित करीत होते आणि इकडे विमानात दोन गोऱ्या गोमट्या दोन विमान परिचरिका हातात पाण्याचे ग्लास घेऊन समीर आल्या,पाणी प्यायलो आणि पुन्हा खिडकीतून बाहेर नजर टाकली.
पत्र्याचा डबा थोड्या थंड हवेचे स्थिर वाटत होता पण अंतर कापले जात होते. दीड एक तासाचा हा विमान प्रवास,हा हा म्हणता पुन्हा पुकारा झाला आणि आम्ही पुन्हा पट्टे बांधले...विमान झुमकन खाली आले, धडक धड करीत धावपट्टीवर धावून स्थिरावले आणि आमचे पहिले पाऊण तिरुपती विमानतळावर पडले.
तिथल्या मोठ्ठ्या लॉबीतील तिरुपती बालाजीची मूर्ती पाहिली आणि मन प्रसन्न झाले.देवस्थानच्या बसने तिरुमला डोंगरावर पोहचलो,वराह स्वामी गेस्ट हाऊस मध्ये रम घेतली आणि थोडे फ्रेश होऊन प्रसाद घेण्यासाठी म्हणून प्रसाद वाटप हॉल वर गेलो.मस्त पैकी सारू अन्ना घेतले आणि पुन्हा रूमवर येऊन विश्रांती घेतली.
दुसरे दिवशी म्हणजे 15 मे ला डोसा नाष्टा घेऊन दर्शन बारी गाठली. सुखमय देव दर्शन घेऊन ,प्रसादाचे लाडू घेतले, उदबत्ती पुढे घेऊन रम गाठली, खूप दमणूक जाणवली.16 मे ला तिरुपती बालाजी तीर्थ ,गन्ध घेऊन तिरुपती बसने रेनिगुंठा विमानतळ गाठले. पुन्हा चेकिंग,मग पुन्हा पट्टे बांधले आणि परतीच्या प्रवासासाठी आमचे विमान टेक ऑफ झाले.
नुकताच लग्नाचा वाढदिवस पार पडला होता,स्त्री शक्ती भलतीच जागृत झाली होती त्यामुळे खिडकी कडेची जागा भेट दिल्याच्या भावनेने तिने स्वीकारली...ती हवेत आणि मी क्षितिज रेषा पहात पहात हळू हळू कोल्हापूर गाठत होतो.दीड पावणे दोन तासांनी पुन्हा धडक धड आणि धाव पट्टीचे घर्षण जाणवत विमान स्थिरावले आणि परत कोल्हापूर मुक्कामी आम्ही दोघे कृतकृत्य आणि प्रसन्न मनानी घरी पोहचलो. यात एकच गोष्ट चांगली पार पडली ती म्हणजे नियोजित प्रवास जीवनात पहिल्यांदा अनुभण्यास मिळाला.हीच त्या परमेश्वराची खरी कृपा हे त्रिवार सत्य...!