सुख
सुख
सुख म्हणजे आत्मिक आनंद. समाधान. सुखाची निश्चित अशी व्याख्या सांगणे तसे कठीणच. व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच सुखही व्यक्तीनुसार बदलते. गांधीजींचं पहा ना. बॅरिस्टर असूनही स्वतःला देशसेवेत झोकून दिलं. इंदिरा गांधींना देशाचा कारभार सांभाळण्यात सुख वाटले. शेतकऱ्याचं स्वतःची हिरवेगार डौलदार पिकं बघण्यात सुख. एका चांगल्या शिक्षकाचे सुख शिकवण्यात. डॉक्टरचं रुग्णाची सेवा करण्यात, तर इंजिनिअरचं घराचा आराखडा आखण्यात आणि घर बांधण्यात. कोणाचं खूप पैसा कमावण्यात. तर कोणाचं प्रसिद्धी मिळविण्यात. कोणाचं मुलाला खूप मोठं करण्यात सुख. कोणाला पर्यटन करण्याचे सुख. कोणाला पाककलेत सुख. नेहरूंना लाल गुलाबाचे फुल कोटाला अडकवण्यात आणि मुलांबरोबर खेळण्यात सुख आणि आनंद वाटत होता.
सुख म्हणजे मनाची उदासीनता घालविण्याचे एक माध्यम. जगात सर्वांत सुखी कोण? ज्याच्याकडे पैसा आहे तो की ज्याच्याकडे नाही तो. पैसा असेल तर तो कसा वापरायचा किंवा कसा गुंतवायचा याची काळजी. नसेल तर नाही म्हणून चिंता. कोणाला पावसात भिजण्याचं सुख. तर कोणाला नको रे बाबा भिजायला. छत्री घेऊया, ह्यात सुख. सगळं काही असूनही काही जण दुःखी. काही नसूनही काहीजण सुखी. सुख शेवटी मानण्यावर आहे. लग्न छान थाटामाटात झालं. दोघेही छान शिकलेले. पण काही दिवसातच पटेना. म्हणून घटस्फोट घ्यावा लागला. लग्न करताना सुख होते. नंतर त्याची जागा दुःखाने घेतली. एखादी गोष्ट आत्ता करण्यात सुख वाटतं. पण पुढे वाटेल याची खात्री नाही. काहींना नोकरी करण्यात सुख. काहींना दुसऱ्याची गुलामी नको म्हणून स्वतःचा व्यवसाय करण्यात. काहींना एकटं राहण्यात तर काहींना कुटुंबात राहण्यात मजा. ज्याला जी गोष्ट करण्यात चेहऱ्यावर समाधान, आनंद दिसतो, ते सुख.
दुःखावर मात करणारा क्षण म्हणजे सुख. दुःख तरी काय तुमच्या माझ्या मानण्यावर. असेही होते की लोक दुःखी असतात, कष्टी असतात, पण सुखाची झालर नेहमी चेहऱ्यावर लावतात. दुसऱ्याला आपले दुःख सांगत नाहीत. मग हेच तर खरे सुखी. झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे.
बाबा आमटे यांनी आपले सगळे जीवन कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अर्पण केले. समाजसेवा हेच त्यांचे सुख. आपल्याला वाचता येते. बोलता येते. लिहिता येते. आपलं मन मोकळं करता येते. एवढं मनुष्याचं जीवन जगायला मिळतयं ह्यातच सुख नाही का?
आपण वेड्यासारखे भौतिक गोष्टींमध्ये अडकून त्यांना आपल्या सुखाचे कारण किंवा मूळ म्हणतो. पण खरं सुख तर जिवंत माणसांशी संवाद साधण्यात. समाधान मानले की आपोआप सुखाचे दरवाजे उघडतात. पण माझ्याकडे हे नाही ते नाही अशी कुरकुर करत बसलं तर आत्ताचा क्षण पण नकोसा वाटतो व पदरी येते ते नैराश्य, दुःख. सुख आणि दुःख हे ऊनसावली सारखे असतात. एक गोष्ट गेली की दुसरी हजर. दुसरी आली की पहिलं गायब. सुख वाटा. आनंद वाटा. दुप्पट होईल दुसऱ्याच्या चेहर्यावर आपल्यामुळे आनंद दिसणे यासारखी मोठी गोष्ट कुठली नाही. जगलात तुम्ही तो दिवस खऱ्या अर्थाने. आनंदी रहा. हसत रहा आणि स्वस्थ रहा.
"हसत जीवन घालवावे
दुःख सारे विसरावे
करू नको तू कसली हाव
ठेव सतत प्रसन्न भाव"