पावसातलं नातं
पावसातलं नातं
आज पुन्हा तेव्हासारखाच पाऊस छान झरत होता ,
तिच्या आठवांचा वर्षाव त्याच्या मनी करत होता ।
आज बरसत असलेली एक न एक पावसाची सर ,
तिची आठवण जपून होती मनात अगदी खोलवर ।
तिलाही आज पावसाचं वागणं काही औरच वाटलं ,
त्याच्या सहवासातल्या क्षणांचं मनी धुकं दाटलं ।
प्रत्येक थेंबानं साक्ष दिली एका गोड क्षणाची ,
पुन्हा पावसानंच ऐकून घेतली व्यथा तिच्या मनाची ।
तो सारखा म्हणत होता तिनंच तर सारं सोडलं होतं ,
अन प्रेमाचं नाजूक नातं तीनच तर तोडलं होतं ।
ती म्हणाली मनोमन तुला कधीच का नाही कळलं ?
सारं घडत असताना माझं काळीज किती जळलं ?
ह्याच पावसानं एक दिवस त्यांचं नातं जोडलं होतं ,
आज त्या दोहोंतलं अंतर अधिकच वाढलं होतं ,
विरहाचा अग्नी त्यांना मनोमन जाळत होता ,
आज त्यांच्या दुःखात जणू मेघच आसवं गाळत होता ।