एक नातं जुळलं तेव्हा
एक नातं जुळलं तेव्हा
काहींनी आदर केला, काहींनी लाड केले,
काहींच्या ओठी मात्र नाराजीचेच सूर आले|
समजून घेतलं कुणी, कुणाला काही खटकलं,
नात्यांच्या गुंतागुंतीत जीवन सारं अडकलं।
बऱ्याच गोष्टी घडून गेल्या, बरंच पाणी गेलं,
कित्येकांना ओळखायचं आजही मग राहून गेलं।
इतका जीव लावूनही पाखरू ते दूरच राहिलं,
अन माझं रडकं मन त्यानं आनंदाने पाहिलं।
माझ्या सुखात सुखी होणं काहींना कधी जमलंच नाही,
माझ्या दुःखात त्यांचं सुख होतं हे मला कळलंच नाही।
आज त्यांनाही कळू दे, आता खूप उशीर झालाय,
माझ्या लेखी त्यासाठीचा आदरही निघून गेलाय ।
मी कुठलंही नातं तुटावं इतकं ताणलं नव्हतं,
पण मला कुठं माहित होतं हे नातंच मुळी विणलं नव्हतं।