हरवलेली माणूसकी
हरवलेली माणूसकी
पहा जरा आजूबाजूला , किती गतिमान झालंय जग !
धावपळ , गर्दी , खेचाखेच
पुरता अडकलाय माणूस
कोळ्याच्या जाळ्यातल्या किड्यासारखा!
अहो , कोणासाठी कोण थांबणार?
अन् कोण कोणाची विचारपूस करणार?
इथे दुस-याच्या सुखदुःखाची पर्वा आहे कुणाला?
धावपळच इतकी चालू की नातेसंबंध जपायला वेळ आहे कुणाला?
फक्त मी, मी, अन् मी!
ह्या 'मी ' चा कोशच इतका दाट झालाय ,
बाहेर पडणंच कठीण!
जरा डोकवा भूतकाळात
आठवतंय का माता-पित्यांचं जीवन ?
एकत्र कुटुंबातील वडीलधाऱ्यांना मान
आला अतिथी कसा संतुष्ट असे!
वासुदेवालाही पसाभर धान्य
शेजा-याची अडचणही आपलीच
दानाने अन् परोपकारानेच , त्यांचे जीवन व्हायचे धन्य!
आणि आता ?
आता , एखाद्याकडे औषधाला पैसे नसतील तर
फक्त निराशा
एखाद्या गरीब मुलाकडेफॉर्म फी नसली तर
फक्त वणवण
मित्र पुढे , मौजमजेला ,
वारा येईल तशी पाठ फिरवणारा
नकोसे वृद्ध आईवडील
वृद्धाश्रमात हद्दपार, निरुपयोगी गुरासारखे !
जड वाहनाने कुणी ठोकरलेलं.....
कोणी रक्तबंबाळ ........वेदनेनं कण्हणारं !
फक्त बघ्याची भूमिका अन् पोबारा.......
एखाद्या बाईची भाजीची पाटी डोक्यावरुन लवंडली तर......
मला काय त्याचे ?..... सहानुभूतीशून्य........
जे देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावतात ,
त्या सैनिकांच्या निधीला तरी सढळ हातांनी मदत ?......छे !!
कृतघ्न आणि संधीसाधू झालाय माणूस.
काळीज मागणा-या मगरीप्रमाणेच माणूस मित्रालाही फसवतोय ,
नैतिक मूल्ये अगदी पायदळी तुडवतोय.
स्वार्थाने अंध , मूक , बधीर झालाय अगदी !
संवेदना गळाठून गेल्यात , अगदी थंडगार बर्फासारख्या !!
पुतळ्यासारखा निश्चल झालाय , मनाने तो.
कोणी याचना केली , तर मदत तर राहूच दे ,
प्रेमाचे चार शब्द बोलायची माणुसकीही
तो साफ विसरलाय ,
खरं तर हरवूनच बसला आहे.
अरे माणसा , अजूनही वेळ गेलेली नाही.
हरवलेली माणुसकी , हा मानवजातीला लागलेला मोठा कलंक .
तू सदवर्तनाने पुसून टाक......
पुसून टाक.
बहिणाईंची आर्त हाक ऐक जरा ,
" अरे माणसा , माणसा.......
कधी होशील माणूस?