विधवेशी विवाह लोक काय म्हणतील?
विधवेशी विवाह लोक काय म्हणतील?
"लोक काय म्हणतील? तुला जराही काही कस वाटत नाही अभि?" मंगलाताई रागानेच अभिजित ला बोलत होत्या.
" लोक..? कोण लोक आई?? लोकांपेक्षा जास्त तू महत्वाची आहेस मला. तुला काय वाटत ते जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. अग लोकांनी नाही वाढवलं मला. तू स्वतःचा जीव जाळून मला लहानाच मोठं केलंस. मी आज जो काही आहो फक्त आणि फक्त तुझ्या मुळे. लोकांमुळे नाही. त्यामुळे ते काय विचार करतात? त्यांना काय वाटेल हे माझ्या साठी महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी तू महत्वाची आहेस. तुला काय वाटत? तू काय विचार करतेस ते जास्त महत्वाचं आहे. " अभि त्याच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
बराच वेळ अभि आणि मंगलाताई मध्ये वाद सुरु होता. खूप उशीर झाल्यामुळे दोघेही त्यांच्या त्यांच्या खोलीत निघून गेले. मंगलाताईला काही केल्या झोप लागत नव्हती. त्या एकटक छताकडे बघत बेड वर पडून होत्या. आज अभि जे काही बोलत होता, त्याचा विचार सारखा त्यांच्या मनात घोळत होता. काय चूक?काय बरोबर? या प्रश्नांची उत्तरे काही केल्या त्यांना मिळत नव्हती. अभि लहान असतानाच त्याचे वडील त्यांना सोडून गेले. मंगलाताईने अभिला बघून दिवस काढले. त्याला शिकवून खूप मोठ करायचं, एक चांगला माणूस बनवायचं हेच त्यांचं स्वप्न होत. पण अभि अस काही करेल याचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता. खरं तर अभिच्या वागण्यामुळे त्या आतून पार खचून गेल्या होत्या. रात्री कधी त्यांचा डोळा लागला त्यांच त्यांनाही कळलं नाही. सकाळी उठून त्या मॉर्निंगवॉक ला सुद्धा आज गेल्या नव्हत्या. त्यांच मन कश्यातच लागत नव्हतं. इतक्यात दारावरची बेल वाजते. त्या दार उघडतात. बाहेर राधिका त्यांची मैत्रीण उभी असते. तिला बघून मात्र त्यांच्या डोळ्याचा बांध फुटतो.
" अग मंगला, शांत हो..! बस पुरे आता. इथे बस आधी. " ( राधिका मंगलाला शांत करत तिला खुर्चीवर बसवतात. तिला पाणी प्यायला देतात. ) आता सांग काय झालंय. अशी का अस्वस्थ वाटत आहे?
" राधिका हा अभि बघ काय म्हणतोय ग? त्याला लग्न करायचं आहे..पण एका विधवेशी विवाह?? लोक काय म्हणतील?? त्याला पुढून किती चांगले स्थळ येताहेत. आणि हा?? काहीच विचार न करता असा कसा विचार करू शकतो?? शिवाय त्या मुलीला तिचं मुलं देखील आहे. लग्न म्हणजे काय समाजसेवा आहे का? कुणाही बरोबर करायला?? हे सोडून गेले तेव्हा नुकताच पाच वर्षाचा होता माझा अभि. मी फक्त त्याच्या साठी जगले. तो खूप मोठा व्हावा, खूप नाव मिळावावं, एक चांगला माणूस व्हावा, यासाठी मी काय काय नाही केल ग.. आणि हा....!!!" मंगला आता राधिका जवळ घळघळा मनातलं सगळं बोलत होती. तिच्या आसवांनाही गळायला वाट मोकळी झाली होती. मंगलाच सगळं बोलणं राधिका शांतपणे ऐकून घेत होती. मंगला थोडी शांत झाल्यावर राधिका बोलू लागली,
" मंगला तू जरा शांत हो आधी. आणि काय ग? तूच म्हणतेस ना अभिने एक चांगला माणूस व्हावं? अग मग तो एक चांगला व्यक्ती आहे म्हणूनच तर त्याने हा निर्णय घेतलाय. हे सगळे तुझे संस्कार आहेत. इतरांची काळजी घेणं, स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करण.., हे सगळं तुझ्याच कडून त्याला मिळालंय ना?? आणि मला तर यात काहीच चुकीचं वाटत नाही. अग आपण देखील या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचल्या होत्या. मोठ मोठया लोकांनी यासाठी उचललेली पाऊले.. हे सगळं वाचून तेव्हा फार अभिमान वाटायचा ना आपल्याला. एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्री च्या भावना आपण समजू शकलो पाहिजे. आणि मंगला तू सुद्धा अभिला वाढवताना किती खस्ता खाल्ल्यास ग? तुझं दुःख अभिने पाहिलंय. तुझं एकटेपण त्याने देखील भोगलंय ग.., या सगळ्यांची त्याला खूप जास्त जाणीव आहे. मग एखाद्या मुलीचं उध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा फुलावण्याचा जर तो विचार करतोय तर यात काय वाईट आहे? तुला तर अभिमान वाटायला हवा. आपला अभि इतका हळवा विचार करतो, स्त्रियांचा सन्मान करतो. आणि काय ग हवं यापेक्षा जास्त?"
राधिकाच बोलण मंगलाला कळलं होत. तिला आता सगळं स्पष्ट झालं होत. थोड्या वेळात अभि उठून बाहेर आला. अभिला बघून मंगला उठून त्याच्या पुढे उभी राहिली आणि म्हणाली, " अभि, बाळा कधी रे इतका मोठा झालास? तुझ्या निर्णयाचा मला फार अभिमान वाटतोय. "
आता मंगला ताईंना 'लोक काय म्हणतील?' यापेक्षा माझ्या मुलाचा आनंद कश्यात याच जास्त महत्व वाटत होत.