समाधान
समाधान
समाधान मिळवताना
नेहमी भटकत राहिलो
कधी गाव गाव, कधी गल्ली गल्ली
कधी रस्त्याच्या कडेला, कधी नदी किनारी
कधी राना वनात भटकलो,
कधी डोंगर दऱ्या हुडकून आलो...
बालपण हरवल, तारुण्य गमावलं..
अन् उतरतीच्या उंबऱ्याहून मागे वळून पाहिलं
हसू आल स्वतःचच ...
समाधान कुठे शोधत राहिलो?
अंतःकरणातून मानायच ...
तर मी बाजार फिरून आलो..!
होत्याची किंमत नाही.. त्याची माती करून बसलो
अन् समाधान मिळवताना सारंच हरवून बसलो
मी सारंच हरवून बसलो...!!!
'समाधान' म्हणजे नक्की काय हो ..??? ते नक्की कुठे मिळत..??? अहो! ते कुठल्याच बाजारात मिळत नाही ! ते ज्याच त्यालाच शोधाव लागत .
"जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥ "
या जगात सर्वात सुखी, समाधानी असा कोणीही नाही. आपल्या आयुष्यात रोज बऱ्याच गोष्टी घडत असतात. या साऱ्याच गोष्टी म्हणजे सुख-दुःखाचं मिश्रण असत. श्रावणाच्या सरी प्रमाणेच त्यांची बरसात प्रत्येकाच्या आयुष्यात होत असते. मनाला आनंद देणाऱ्या, सुख देणाऱ्या आठवणी सर्वांनाच हव्या असतात , कारण त्या जेव्हाही येतात आपल्या ओठांवर सुंदर अस हसू फुलवत असतात किंवा अलगद डोळ्यातून मोती बनून उतरत असतात. यामुळे आपल्या मनालाही समाधान मिळात.
खर पाहिलं तर.., आपल्या आयुष्यात दुःख देणाऱ्या गोष्टींपेक्षा आनंद देणाऱ्या गोष्टी जास्त घडत असतात. मात्र त्या एका दुःखा पुढे आपण साऱ्याच सुखाच्या आठवणी विसरून जाऊन त्या दुःखाला कुरवाळत बसत असतो...आणि मग साऱ्याच सुखाच्या, आनंदाच्या, समाधान देणाऱ्या गोष्टी कुठेतरी हरवून जातात..आणि आपण परत त्याच आनंदाच्या शोधात असमाधानी बनून भटकत असतो.
खर तर.. या दुःखाचे आपण किती लाड करायचे ना? हे आपल आपल्याला ठरवता यायला हवं. कारण न मिळालेल्या गोष्टी साठी आपण आयुष्यभर रडत बसतो. मात्र जे सुख आपल्या ओंजळीत असतं त्याचा साधा विचारही आपण करत नाही. या छोट्या छोट्या गोष्टीत जर सुख मानलं ना तरी आपल्याला आपलं मानसिक समाधान मिळत असतं.
आणि आपण जर हे करू शकलो ना, तर हा आनंद, हे समाधान नेहमी आपल्या अंगणात खेळेल. आपल्याला आपला आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही शोधता येईल आणि एक आत्मिक समाधान आपल्याला कायम मिळत राहील.