आई, बघ ना गं काय होतंय हे मला?
आई, बघ ना गं काय होतंय हे मला?
अर्ध्या रात्री कुणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने अर्चनाला जाग आली. ती उठून बघू लागली. तर तो आवाज तिला ओळखीचा वाटला. ती लगेच धावत संजनाच्या खोलीकडे गेली. बघते तर काय संजना बेड वर नव्हती. अर्चना घाबरली. तिला बाथरूम मधून आवाज येत होता. तिने लगेच दार ढकलले. बघते तर काय.., संजना एका कोपऱ्यात बसून रडत होती.
अर्चना लगेच तिला जाऊन बिलगली, " संजू.. काय झालं बाळा..? अशी का रडतेस?? काय झालं? बर नाही का वाटत आहे तूला? कोणी काही बोललं का?? परीक्षेत मार्क्स कमी आलेत का??" असे असंख्य प्रश्न तिने एका दमात विचारायला सुरुवात केली.
तोच संजना लाल झालेल्या टॉयलेट सीट कडे बोट दाखवत म्हणाली, " आssईईई... बघ ना ग..!! काय होतंय मला हे ???
आणि अर्चना दचकून जागी झाली. बघते तर काय...? " संजना शांतपणे तिच्याच शेजारी झोपली होती. अर्चनाच्या मनात रोज येणारे प्रश्न स्वप्न रूपात तिच्या पुढे आले होते. तिने घड्याळीत पाहिले, सकाळचे साडे पाच झाले होते. ती तशीच उठली आणि आवरा सावर करू लागली. खरं तर अर्चनाला तिची मुलगी संजना आता वयात येणार याच जरा टेन्शन आणि काळजी वाटत होती. संजनाला आता तेराव वर्ष सुरु झालं होत. कुठल्याही आईला वाटेल अशीच काळजी तिच्या मनाला वाटत होती. संजनाला हे सगळं कस समजावून सांगायचं, तिला सगळं कळेल ना? ती या सगळ्या गोष्टींना कश्या पद्धतीने सामोरे जाईल असे बरेच प्रश्न तिच्या मनाला भेडसावत होते.
मुली वयात आल्यावर आईला देखील सतत मुलींची काळजी वाटत असते. शिवाय आज कालची ही पिढी एक पाऊल पुढेच असते. त्यात रोजच काही ना काही वृत्तपत्रातून वाचायला मिळत. या सगळयांचा ताण अर्चनाच्या मांगुटीवर येऊन बसला होता. तिने गॅस वर दुधाच भांड ठेवलं. पण तिच त्याकडेही लक्ष नव्हतं. इतक्यात.., " अग अर्चू, लक्ष कुठंय? दुध उतू जातंय बघ जरा.. " तसाच अर्चनाने गॅस बंद केला.
अर्चना : "आई तुम्ही उठलात? थांबा मी चहा टाकते."
सासूबाई : " अग, काय झालंय? गेल्या काही दिवसापासून बघतेय तू काही तरी विचारात दिसतेस?नीट जेवण देखील करत नाहीस? काय झालंय? काही त्रास होतोय का? कसला इतका विचार करतेस अर्चू? "
अर्चना : " आई.. कस सांगू आता मी? मला काय वाटतंय तर? अहो.. आपली संजू आता तेराची झालीय.. तिला कधीही न्हाणं येईल. हे सगळं एक आई म्हणून मी तिला कस समजावून सांगू ना याचच टेन्शन येतंय मला. काही कळतच नाही आहे.. हा विषय कसा काढू तिच्या पुढे. तिच्या वर्गातल्या तिच्या मैत्रिणी होतात की नाही? तेही मला नाही माहिती."
सासूबाई : " एक सांगू का अर्चना.. जेव्हा आपले मुलं वयात यायला लागतात ना.. तेव्हा आई वडिलांनी फक्त आई वडील न राहता त्यांचे मित्र मैत्रिण व्हावं. कारण आपण आपल्या मित्र मैत्रिणींना मनातल्या सगळ्या गोष्टी न संकोचता सांगत असतो. तू ही संजूची मैत्रीण हो.. एक आई म्हणून तूला ज्या गोष्टी कठीण वाटत आहेत ना बोलायला.. एक मैत्रीण म्हणून तूला त्या जास्त स्पष्ट पणे बोलता येईल. खरं तर हे सगळं मी ही संजूशी बोलू शकते. पण मला वाटत आता तुम्ही तुमच्या नात्याला थोडं मोकळं कराव आणि बोलाव .
अर्चनाच्या सासूबाई जे काही बोलल्या त्या नंतर अर्चनाचं थोडं टेन्शन कमी झालं. तिला थोडं रिलॅक्स वाटलं. दुपारी सगळ्यांचे जेवण खावण आटोपल्यावर अर्चना संजनाशी बोलू लागली. तिने संजूला सगळं नीट समजावून सांगितलं. या वयात शरीरात होणारे बदल. मनात निर्माण होणाऱ्या भावना, पाळी म्हणजे काय असतं.. या सगळ्या गोष्टी अगदी मोकळे पणाने ती संजूशी बोलत होती. आज संजू देखील आपल्या आईशी एक मैत्रीण असल्यासारखी मनमोकळेपणाने सगळ्या शंका कुशंका काढून घेत होती. आज दोघीनाही त्यांच्या नात्यातील हे नवेपण आवडल होत.