शाप - उ :शाप आणि वरदान -२
शाप - उ :शाप आणि वरदान -२
आजही आमच्या ऑफिसच्या मुलींमध्ये एक नवीन विषयावर चर्चा सुरू होती . आमच्या ऑफिसमधील सुनीता वर तिच्या पतीला काही शंका होती म्हणून तिच्या चारित्र्याची माहिती काढण्यासाठी तिच्या पतीने म्हणे कोणी गुप्तहेर नेमला होता . सुनिता तशी दिसायला सुंदर , हुशार आणि नीटनेटकी राहणारी पण ती एक पतिव्रता होती . संसारात हातभार लावण्यासाठी आणि खूप शिकलेली असल्यामुळे तिने लग्नानंतरही नोकरी चालू ठेवायचा निर्णय घेतला .
ह्या चर्चेत मला एक विषय मिळाला. पौराणिक कथांमध्ये सुद्धा अशा विषयाचा उल्लेख आहेच. खुद्द सीतेला इतक्या चारित्र्यवान स्त्रीला अग्नीपरिक्षा द्यावी लागली होती आणि साध्वी अहिल्या सुद्धा पती ऋषी गौतम यांनी दिलेल्या शापामुळे दगडाची शिळा होवून पडली होती .
अहिल्या ही ब्रह्म देवाची मानस पुत्री होती असही म्हटलं जातं .आणि त्यांच्यामते ती सगळ्यात सुंदर स्त्री होती . अहील्येच्या सौंदर्यावर सर्व भाळत असत . ब्रह्मदेवाने तिचं लग्न गौतम ऋषीं बरोबर लाऊन दिलं. इंद्र देवाला हे पटलं नाही. पण अहिल्या ही एक साध्वी व पतिव्रता स्त्री होती. सौंदर्य ,कलागुण , नृत्य संगीत ह्याची ती सम्राज्ञी होती . पण पूर्ण प्रामाणिक पणे ती आपल्या पतीची म्हणजे गौतम ऋषींची सेवा करत होती . दोघांचा संसार सुखाने चालला होता . अहिल्या पूर्णपणे आपल्या पती व संसाराला समर्पित झाली होती .
इंद्र देवाला अहिल्या आवडत होती आणि एकदा गौतम ऋषी त्यांच्या आश्रमात / कुटीत नाही असं पाहून ते गौतम ऋषींचा वेश घेवून तिथे गेले . अहील्येने नेहमीप्रमाणे त्यांची सेवा केली . त्यांनी अहील्येशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला , जे कधीपासून त्यांच्या मनात होतं.आणि तेव्हड्यात गौतम ऋषी तिथे येतात आणि ते इंद्रदेवाला ओळखतात . तेव्हा ते आपल्या पत्नीवर शंका घेतात की तुला कळलं असूनही न माहित असल्यासारखं केलं . इंद्रदेव तिथून निघून गेल्यावर अहिल्या गौतम ऋषींची माफी मागते नकळत झालेल्या चुकीबद्दल. पण गौतम ऋषींना संताप अनावर झालेला असतो ते अहील्येला शाप देतात की तू एक दगडाची शिळा होऊन पडशील ..
अहिल्या खूप गया वया करते , इतकी कठोर शिक्षा नका देवू असं म्हणते तेव्हा ते उ:शाप देतात कि जेव्हां विष्णू राम अवतार घेवून येतील आणि शिळेला पायाने स्पर्श करतील तेव्हा तुला तुझं आधीचं खरं रूप मिळेल आणि असं म्हणताच अहिल्या निर्जीव झाल्यासारखी दगडाची शिळा होवून पडते .
जेव्हा राम अरण्यात वनवास म्हणून येतात तेव्हा ऋषी विश्वामित्र यांच्या भेटीस गेले असता ऋषी विश्वामित्र त्यांना साध्वी व गौतम ऋषींची पत्नी अहिल्या आणि तिच्या बरोबर घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगतात ते ऐकून राम त्या शिळे जवळ जाऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने स्पर्श करतात तेव्हा पुन्हा अहिल्या शापमुक्त होऊन पुन्हा आपल्या मूळ रूपात येते .
सौंदर्य हा कोणा स्त्रीसाठी एक अभिशाप असू शकतो ह्याचे उदाहरण म्हणजे अहिल्या . जिने प्रामाणिकपणे आपल्या पतीची सेवा केली तिच्या नकळत झालेल्या चुकीचा इतका मोठा परिणाम तिला भोगावा लागतो . हा एक गौतम ऋषींचा अहंकार व संतापच ज्यामुळे इतकी मोठी शिक्षा तिला भोगावी लागली तिही भर तारुण्यात .
साध्वी , ऋषिपत्नी , अप्सरा यांनीही अन्याय सहन केला किंवा यांच्यावरही अन्याय झाला , त्यांनाही जीवनात बरच काही भोगावं लागलं असं म्हणायला हरकत नाही . काहींसाठी सौंदर्य हा अभिशाप ठरला . त्यांच्या भोळ्या स्वभावामुळे त्यांना पुरुषी अहंकार व संताप सहन करावा लागला .
पुढच्या भागात अशीच एक सत्य व पौराणिक कथा...
