Supriya Jadhav

Thriller

4.3  

Supriya Jadhav

Thriller

अमावसेची रात्र

अमावसेची रात्र

3 mins
483


दिनकर आणि बबन धावतच बस स्टॉपवर आले. संध्याकाळचे ७:३० वाजले होते. "गावाला जाणारी गाडी आली का?" अशी तिथल्या लोकांकडे चौकशी करू लागले. १०मिनीटापुर्वीच गाडी निघून गेली असं समजलं. दोघेही निराश झाले. शेवटची गाडी होती. ती ही राहती गाडी होती. ती पण चुकली आता काय करावं बरं? दोघेही विचारात पडले. दिनकर . "ए बब्या जाऊया की चालत, तसबी गाव हितनं १० किलोमीटरवर तर हाय." "रात झाल्या" बबन बोलला. "आरं आपण एकाला दोघं हाय, जाऊया, आपल्याच शिवारात कसलं आलयं भ्या? "असा म्हणतूयास व्हय, बर चल जाऊया, तसं हित बी कुठ ऱ्यायाचं तेच्यापेक्षा जाऊया चालत". अस म्हणत दोघे ही गावच्या वाटेच्या दिशेने चालू लागले.

           

  बोलत, बोलत ते दोघेही निघाले. पुल पार केला. आता मुख्य रस्ता संपला होता. गावाच्या दिशेने कच्चा रस्ता लागला, तिकडे वळले.अंधार चांगलाच दाटून आला होता, पण ती नेहमीची पायाखालची वाट म्हणून त्यांना काही वाटले नाही. ते बोलत चालले होते. वाटेला चिटपाखरू ही न्हवतं. निम्मा रस्ता पार केला होता अन आता ते वळणाच्या रस्त्याला आले होते. छोट्या टेकडीला वळसा देऊन पुढे जायचे होते. आजुबाजूला रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. खूप दूरवर डोंगरावर लाईट दिसत होत्या. इथं मात्र काळामिट्ट अंधार. टिटवीचं ओरडणं कानावर पडले तसं बबन थोडा आतून घाबरला, पण तो तसं दाखवत नव्हता. झुडपात काहीतरी खुसफुसलं तसा त्यांनी पायांचा वेग वाढवला, तेवढ्यात १० फुटावर कोणीतरी उभं असलेल त्यांना दिसलं. तो एक म्हातारा होता. डोक्यावर फेटा,खांद्यावर टॉवेल."आव पावणं" त्यानं दोघांना आवाज दिला. दिनकर बोलला "कोण हाय?" "मी हाय, आरं कुंठ गेला हुतारं, बराच वेळ केला, तुम्ही, या की इकडं, जरा तंबाकु देता का? जरा तलाफ झाल्या तंबाकु खायाची." बबनचे त्याच्या पायाकडे लक्ष गेले आणि तो चांगलाच चरकला. त्यानं दिनकरचा हात जोरात दाबला, तो काय समजायच ते समजून गेला. काहीही न बोलता त्यांनी चालण्याचा वेग अजून वाढवला. तसं तो म्हातारा त्यांच्या मागणं-मागणं जाऊ लागला, अन बोलू लागला, "आरं थांबा की मी बी यतोय तुमच्या संगट." बबन कुजबुजला,"दिन्या पाय उचल, माग बिलकुल बी वळून बघू नगस." ते दोघे झपाझप चालू लागले.

               

पुढच्या वळणावर परत त्यांना थोड्या अंतरावर तोच म्हातारा परत दिसला. आता दिनकरही चांगलाच हादरला होता. दूरवर कोल्हेकुईचा आवाज येत होता. "पावणं, कुस्ती खेळता का?" असं तो विचारू लागला. दोघे काहीच न बोलता चालत होते.थोड्या वेळाने पायात काहीतरी घोटाळतयं असं दोघांनाही जाणवायला लागलं. पहातात तर ते छोटं पांढरं कोकरू होतं. आता ते विचित्र आवाजात ब्या....ब्या.....करू लागलं होतं. बबन ने आता राम,राम म्हणायला सुरूवात केली होती.

                 

आता गाव तीन किलोमीटरवर राहिलं होत. पायात कोकरू अजुन घोटाळत होत. बबनने जोरजोरात स्वामी समर्थांचा जप सुरू केला. दिनकर ही देवाचा धावा करू लागला. आता कोकरू गायब झाले होते. गावाची वेस जवळ आली होती. तेवढ्यात जोरात वादळ वाऱ्यात झाडाची फांदी कडाडून मोडून पडावी असा आवाज झाला. आता दोघे चांगलेच टरकले होते. मागून आवाज आला, "वाचला रे वाचला."

                    

 अंगात असेल नसेल तेवढी शक्ती एकवटून दोघेही गावात पळत शिरले. धापा टाकत गावातल्या पाराजवळ येऊन कोसळले. पारावर जेवण करून गप्पा मारत बसलेली गावातली माणसं बोलली, "कुठुन आलातरं पोरांनो? थोड्या वेळाने त्यांनी घडलेल्या सगळ्या घटना सांगितल्या. "आर तुमाला काय कळत का नायं, आज आमुश्या हायं, तुमी कशाला चालत आला रं? बंडू आज्या बोलला. "तुमी वाचला त्या खविसाच्या तावडीतनं, स्वामींच्या जपानं तारल तुमाला बघा."

                   

लोकांनी दोघांना घरात नेलं. दिनकर अन बबन दोघे ही तापानं फणफणले होते. त्यांची आई चांगलीच काळजीत पडली. स्वामींच्या जपानं तारलं लेकरांना म्हणू लागली. दोघांनाही आईनं अंगारा लावला, बंडू आज्या बोलला, "घास मुटका टाक पोरांच्या अंगावरनं. कोण काय सांगत होते ते सगळ तीनं केल.बबन तापाच्या भानात काय पण बरळत होता. अन् घरातली सगळी माणसं काळजी करत सकाळ व्हायची वाट बघत बसली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller