Kakade Tejas

Tragedy Thriller

3.6  

Kakade Tejas

Tragedy Thriller

पन्हाळा

पन्हाळा

21 mins
1.0K


सन १९७५ च्या आसपासचा तो काळ असेल. माझ्या आजोबांची पन्हाळ्याला बदली झाली होती. किशोर काकडे म्हणजे त्याकाळी एका मोठ्या हुद्द्यावर असलेले पोलीस अधिकारी त्यांच्या प्रामाणिकपणाने केलेल्या कामामुळे त्यांची अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची. आता यावेळेस त्यांची बदली पन्हाळ्याला झाली होती. कांचन(माझी आजी) सोबत नुकतंच नवीन लग्न झालं होतं. लग्नानंतर अवघ्या १५ दिवसात पन्हाळा गाठायचा होता तर आजोबांचे वडील त्यांना म्हणाले, अरे बायकोला सोबत घेऊन जा आता लग्न झालं आहे तुझं अजून किती दिवस खानावळीत जेवण करणार. वडिलांचा शब्द डावलायचा कसा म्हणून त्यांनी आजीला सोबत घेत पन्हाळा गाठला. जुलै महिना उजाडला होता पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता त्यात पन्हाळा तर अगदी हिरवागार दिसत होता. आजी तर पन्हाळ्याच्या प्रेमात च पडली होती. खरंच सांगतो तिथल्या निसर्गसौंदर्यात काय जादु आहे काय माहिती जो पण तिथे जातो तो त्या जागेच्या अगदी प्रेमात पडतो. ते दोघे पन्हाळ्यावर पोचलो. त्यांना पोलीस क्वार्टर मध्ये खोली मिळाली होती त्यामध्ये त्यांनी संसार मांडला. आणि त्यांचा सुखी संसार सुरू झाला. एकदिवस आजोबांना सुट्टी होती आणि त्यांच्या मनात विचार आला लग्न झाल्यापासून हिला कुठे बाहेर फिरायला घेऊन गेलो नाही. तिला इकडे आणलं आणि कामात गुंतवून ठेवलं. त्या दिवशी त्यांनी आजीला surprise द्यायच्या हेतूने पन्हाळगड फिरायला नेले.

गडावरून फेरफटका मारताना आजीला खाली दरीमध्ये एक घर दिसले, घर कसलं लांबून तर तो चांगला प्रशस्त बंगला वाटत होता, एकदम जंगलाच्या मधोमध आणि चारही बाजूने हिरवीगार झाडी. झालं आजीला ती जागा आवडली तिने लगेच आजोबांना तिच्या मनातली ईच्छा बोलून दाखवली.की आपण इथलं घर सोडून त्या बंगल्यावर राहायला जाऊया किती एकांत मिळेल तिथे' पण आजोबांनी कठोर शब्दात नकार दिला. आजी हिरमुसली आणि गुपचूप गाडीमध्ये जाऊन बसली आजोबा तिच्या मागोमाग गेले.आजीला त्या बंगल्याने एवढं जाळ्यात ओढलं होत स्वप्नात तो बंगला तिला दिसे. तिने अनेकदा आजोबांना सांगितले पण आजोबा ऐकायला तयार नव्हते कारण पोलीस चौकी त्यांना क्वार्टर पासून जवळ होती. आजी खूप नाराज झाली आणि तिने खाणंपिणं सोडलं आजोबा खा बोलले तरी खायची नाही आजोबांना काळजी वाटू लागली मग त्यांनी आजीला शब्द दिला की आपण लवकरच त्या बंगल्यात जाऊया. आजोबांनी माहिती काढायला सुरुवात केली कोणाचा बंगला आहे, कशी जागा आहे असं. लोकांकडून काही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. एके दिवशी घरी येताना आजोबांनी त्यांच्या चालकाला विचारले कसा आहे तो बंगला कशी आहे ती जागा, त्यावर तो चालक गडबडला आणि म्हणाला, "सायेब मलाबी ठाऊक नाय पर लोक म्हणत्यात की ती जागा भुताची हाय भूत राहत्यात तिथं", आमचे आजोबा मुंबईत राहिलेले त्यांना या गोष्टीच हसू आलं आणि ते म्हणाले हे बघ रघुनाथ(चालकाचे नाव) आपण येत्या दोन दिवसात तिथे राहायला जातोय. रघुनाथ उचकला म्हणाला, "सायेब तुम्हाला जायचं तर जावा म्या नाय येत वाटल्यास मला नोकरी सोडावी लागली तरीबी चालण" आजोबा हसले आणि म्हणाले चल घरी सोड. त्या रात्री नंतर रघुनाथ परत गावात दिसलाच नाही.आजोबांनी आजीला सांगितले नव्हते की गावकरी त्या जागेला भुताची जागा म्हणतात ते कारण आजी भलतीच खुश होती तिला बंगल्यात जायला मिळणार होत.आजोबांनी सगळा बंगला दोन गडी घेऊन व स्वतः तिथे उपस्थित राहून साफ करून घेतला कारण पोलीस ते होते त्यांच्या नकार देणं कोणाला खपणार होत. ततपप करत त्यांनी घर साफ करून घेतलं.आणि दोन दिवसात आजी आणि आजोबा बंगल्यात राहायला गेले......कोणाला ठाऊक होतं इथं खरंच भूत आहे का की लोक अफवा पसरवतात. दिवस चांगले जात होते चालक पळून गेला होता त्यामुळे आजोबांना रात्री एकट्याला गाडी चालवत यावं लागत असे. आजोबांना किती पण उशीर होऊदेत आजी त्यांची वाट पाहत बसायची. रात्रीचे बारा वाजतील एक वाजेल पण ते आल्याशिवाय काही ती घास खायची नाही. आता या त्या काळच्या प्रथा किंवा त्या काळची प्रेम व्यक्त करायची पद्धत. ते काहीही असो. पण मात्र आजी वाट पहायची. आणि एक दिवस अचानक आजोबांना एका गुन्ह्याच्या तपासासाठी चंदगड (महाराष्ट्र व कर्नाटक च्या सीमेवरील गाव) या ठिकाणी जायचं होतं. आजोबा काळजी मध्ये पडले. एवढ्या मोठ्या घरात हिला एकटीला कस ठेवायचे.. पण आजी आमची धीट म्हणाली या जाऊन राहते मी एकटी काही काळजी करू नका. आजीने बोललेल्या या शब्दांनी आजोबांना धीर आला आणि म्हणाले काळजी करू नकोस चार दिवसांत मि परत येईल अस म्हणत आजोबा निघून गेले.

आजी चा नंतरचा दिवस कामातच गेला. कारण बंगला फार प्रशस्त अगदी चित्रपटात दाखवतात तसा. आत प्रवेश केल्यावर मोठा हॉल, डाव्या बाजूला किचन, हॉल मधून उजव्या बाजूला गेलं वरच्या खोल्यांमध्ये जायला जिना वरती तीन खोल्या होत्या पण आजीने त्यांच्यासाठी एकच खोली उघडली होती. बाकी दोन खोल्यांची दार बंद च होती. सूर्य मावळला अंधार पडला आजी घरात एकटी नशीब तेव्हा विजेची सोया तिकडं झाली होती एक मिणमिणता बल्ब चालू केला. पण रात्र झाली आणि आजीला ते घर खायला उठू लागलं तिला भीती वाटू लागली.ती अस्वस्थ झाली आणि त्या दिवशी ती जेवली देखील नाही. पाणी पिऊन झोपायला गेली. त्या दिवशी तिला शांत झोप लागली नाही सतत आजोबांची काळजी लागून राहत होती. सकाळ झाली आणि ती खोलीच्या बाहेर आली तर खोलीबाहेर तिला तिच्या डाव्या पायातली एक चप्पल दिसली. मुख्य दरवाजाबाहेर काढलेली चप्पल अक्खा एक जिना चढून तिच्या खोलीपर्यंत आली कशी हा प्रश्न तिला पडला. तिला वाटलं कोणी मांजर वैगैरे असेल त्याने ठेवली असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं.आणि ती चप्पल घेऊन खाली आली. आजीला आजोबांची काळजी वाटत होती त्यावेळी आत्ताच्या सारखे मोबाईल नव्हते त्यामुळे संपर्क व्हायचा काही संबंध च नव्हता. तो ही दिवस कामात गेला आजीचा रात्री आजी झोपायला गेली. दुसरा दिवस उजाडला आजी उठून खाली यायला लागली तर जिन्याच्या सुरुवातीला पुन्हा ती चप्पल तिला दिसली आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कोणी चोर वैगरे घुसला की काय घरात अस तिला वाटलं म्हणुन तिने सगळं घर तपासलं पण काही नव्हतं सगळं व्यवस्थित आणि जागच्या जागी होत. पण ती चप्पल आली कुठून परत एकदा ते तिला समजलं नाही. तो ही दिवस गेला रात्र झाली आजी झोपायला गेली पण आजीला शांत झोप लागेना. रात्रीचा दीड वाजत आला असेल ती या कुशिवरून त्या कुशीवर होत होती. थोडीशी अस्वस्थ होती तिला तहान लागली होती ती पाणी प्यायला खाली निघाली. खोलीचा दरवाजा तिने उघडला आणि तिला धक्का च बसला पुन्हा तिची चप्पल दरवाजात आली होती. ती हादरून च गेली कारण आता रोज रोज हे अस होत होत. तिने चप्पल हातात उचलून घेतली आणि तिला खूप मोठ्यामोठ्याने समोरच्या बंद असलेल्या खोलीतून रडायचा,किंकाळी फोडल्याचा आवाज येऊ लागला. आजी पुरती घामाघूम झाली होती. तिकडून आवाज येत होता आणि आवाज मुलीचा वाटत होता. ती ओरडत होती 'वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा'. हे सगळं ऐकून आजी धाडकन चक्कर येऊन पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा आले दरवाजा वाजवून देखील दरवाजा उघडला जात नाही म्हटल्यावर काहीतरी काळबेर असेल याची जाणीव त्यांना झाली दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि थेट त्यांच्या खोलीकडे धावले आणि खोलीच्या दरवाज्यातच आजी पडली होती. ते फार घाबरले त्यांनी तिला उठवायचा प्रयत्न केला पण ती काही उठली नाही शेवटी त्यांनी खाली जाऊन पाणी आणून तोंडावर मारले तेव्हा आजी थोडीशी शुद्धीवर आली. त्यांनी तिला हळूच खोलीमध्ये नेले आणि आराम करायला सांगितला. पण आजीच्या डोक्यात तोच रात्रीचा रडलेला आवाज ऐकू येत होत्या तेच तेच विचार करून तिच्या डोक्यात मुंग्या येत होत्या. तेवढ्यात आजोबा चहा घेऊन आले. आजीची विचारपूस केली. तेव्हा आजीने रात्री घडलेली सगळी हकीकत सांगितली तो चप्पलचा किस्सा ते रडणं वैगैरे सगळं काही. आजोबा बोलले छे काही पण नको बोलूस भूत वैगैरे काही नसत एखादं जनावर असेल आणि रडायचं म्हणत असशील तर तुला कदाचित एकटी असल्याने भास झाला असेल. पण आजी म्हणाली तो भास नव्हता अहो खरंच मला त्या समोरच्या खोलीतून तो रडलेला आवाज ऐकू आला. आजोबा त्यावर फक्त हसले आणि म्हणाले देवावर विश्वास आहे ना तुझा मग झालं तर नको चिंता करुस. कोणी भूत वैगैरे नाही येणार तुला घ्यायला. आजोबांच्या येण्याने आजीला जरा हायस वाटलं तेवढ्यात नेमके आजोबा म्हणाले माझ्याकडे आलेली केस अजून सुटली नाहीये कदाचित आणखी एक चंदगड चा दौरा होऊ शकतो. आजी त्यांना थांबवत म्हणाली, 'तुम्ही जाता मला एकटं ठेऊन रात्रीच घर खायला उठत मला आणि त्यात तो घडलेला प्रसंग एकटी कशी राहू मी या घरात'. आजोबा म्हणाले नको काळजी करुस स्टेशन वरून एक हवालदार पाठवेल मी इथे लक्ष्य ठेवायला अस म्हणून आजोबा त्याच संध्याकाळी पुन्हा चंदगड कडे रवाना झाले आणि आजी पुन्हा एकटी पडली रात्री सुमारे साडे आठ च्या सुमारास दारावरची बेल वाजली दारात हवालदार उभा होता म्हणाला साहेबांनी पाठवलं आहे मला इथे तुमच्या सुरक्षिततेसाठी. आजीला बर वाटलं ती म्हणाली तुम्ही कुठे थांबताय त्यावर हवालदार उत्तरला,गेट पाशी आहे ना छोटी केबिन तिथे बसतो माझा रेडिओ ऐकत काही वाटलं तर वरच्या खिडकीतून आवाज द्या. आजी ठीक आहे म्हणाली आणि सगळं आवरून ती झोपायला गेली. रात्रीचे साडेबारा एक वाजला असेल कसलातरी आवाज झाला त्या आवाजाने आजीला जाग आली. ठक....ठक....ठक......ठक.... असा आवाज येत होता. अस वाटत होत की कोणीतरी काठी आपटत चालत आहे पण एवढ्या रात्री कोण असणारे इथे अस तिला वाटलं म्हणून ती वरच्या खिडकीकडे गेली गेटकडे पाहिलं तिथे केबिन पाशी रेडिओ चालू होता त्याचा आवाज येत होता पण दरवाजा बंद होता आणि अंधार पण होता त्यामळे हवालदार आजीला दिसला नाही. तिला वाटले हवालदार काठी आपटत चालत आहे. याची शहानिशा करावी म्हणून ती खाली जायला निघाली आणि तिने खोलीचा दरवाजा उघडला पण दरवाज्यात चप्पल नव्हती. तिच्या जीवात जीव आला. पुढे ती जस जसा जिना उतरुण खाली आली तिला समोर जे दिसलं ते फार भयंकर होत. तिला समोर एक मुलगी दिसली जिच्या एका पायात तिची एक चप्पल आणि डाव्या खांद्याला कुबड्या होत्या तिला एकच पाय होता. ती एक अपंग मुलगी होती काळेभोर केस,निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता तिने. आजी फार घाबरली आजीला फक्त भोवळ यायची बाकी होती. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली पण तिथे कोणी नव्हतं कदाचित गेटवरच्या हवालदाराचा पण डोळा लागला होता पण गाण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता त्यात रातकिड्यांची किरकिर होतीच आणि या मुलीचं ठक ठक चालणं सुरू होत. आजीने आरडाओरडा करताच त्या मुलीने आजीकडे वळून पाहिलं आणि तिला पाहताच आजी भोवळ पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली सतत वाजणाऱ्या बेल ने आजीला जाग आली. पाहते तर समोर हवालदार उभा पण रात्री जो हवालदार होता तो हा नव्हता हा वेगळाच कोणीतरी होता. आजीने त्याला विचारले, 'काय हो ते रात्रीचे दादा कुठे गेलेत? त्यावर हवालदार चपापला आणि म्हणाला, रात्रीचे हवालदार? अहो मॅडम साहेबांनी मला काल रात्री इथली ड्युटी लावली पण गावात जुन्या जाणत्या लोकांच्या कडून बरच काही वाईट ऐकलंय या बंगल्याबद्दल म्हणून मी रात्रीचा आलो नाही मला भीती वाटत होती. पण इथे रात्री दुसरा कोणी कसा येणार ही गोष्ट फक्त साहेब आणि माझ्यामधली आहे. आजीला हे सगळं ऐकून पुन्हा भोवळ आली ती पडली. आणि तिने डोळे उघडले ते दवाखान्यातच. समोर आजोबा उभे होते तो सकाळचा हवालदार उभा होता डॉक्टर उभे होते. शुद्ध येताच डॉक्टर म्हणाले, गुड न्यूज आहे तुम्ही आई होणार आहात....हे ऐकताच आजीचा चेहरा खुलला आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. पण आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद फार काळ टिकला नाही. तिला ती रात्रीची मुलगी आठवली तिचा चेहरा आठवला. तिने ती सगळी हकीकत आजोबांना सांगितली,एका बाजूने पूर्ण भाजलेला होता त्या मुलीचा चेहरा आणि ती हसत हसत माझ्या कडे पाहत होती. पण आजोबांनी हे देखील हसण्यावारी नेलं आणि म्हणाले स्वप्न बघितलं असशील तू हे असलं सगळ्या गोष्टी फक्त चित्रपटात होतात खऱ्या आयुष्यात नाही. आजी त्यांना कस समजावणार होती तिच्या च हट्टापायी त्यांनी ते घर घेतलं होतं. संध्याकाळी ते घरी आले डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितले होते. म्हणून आजोबांनी त्यांच्या आईला पत्र लिहिले. पण त्यांची म्हणाली, अरे आठ दिवसांनी येते शेतात लगबग चालू आहे.

आजोबांनी मनाशी पक्के केले या अवस्थेत आजीला सोडून कुठेही जायचं नाही. आजोबांनी त्यांची आई येत नाही तोवर आजीची पुरेपूर काळजी घेतली आजीला काही कमी पडू दिलं नाही. आठ दिवसांनी आजीची सासू आली सासूबाई जाम खुश घरात पाळणा हलणार या बातमीने. आता आजोबा मोकळे झाले त्यांनी त्यांच्या आईवर आजीची सगळी जबाबदारी टाकली आणि ते आपली काम करायला मोकळे झाले. त्या दिवशी अमावस्या होती आजोबा कामानिमित्त मुंबई ला गेले होते घरात आजी आणि त्यांची सासू दोघीच. काम आवरली आणि दोघी जणी वरती झोपायला गेल्या दोघी एकाच खोलीत झोपल्या. तेव्हा आजीचा पाचवा महिना चालु होता. आणि मध्यरात्र झाली होती एकाएकी आजीला काहीतरी पडल्याचा आवाज आला. ती दचकून जागी झाली तिने शेजारी पाहिलं सासूबाई गाढ झोपल्या होत्या. तेव्हढ्यात बाहेरून जोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. हा तोच आवाज होता जो त्या दिवशी आजीला ऐकू आला होता. आजी फार घाबरली तिने सासूबाई ना उठवायचा प्रयत्न केला सासूबाई गाढ निद्रेत होत्या. त्या जाग होत म्हणाल्या, 'काय झालं बाई झोप ना गप धड स्वतः झोपत नाही आणि दुसऱ्याला झोपू देत नाही'. आजीला माहिती होत सासूबाईंना झोप फार प्रिय होती. आजी त्यांना म्हणाली अहो कोणीतरी रडल्याचा आवाज येतोय मोठमोठ्याने सासूबाई दचकून जाग्या झाल्या. उठून बसल्या त्यांनी कानोसा घेतला आणि म्हणाल्या, झोप गपचुप काही आवाज वैगैरे येत नाहीये पण आजीला मात्र आवाज ऐकू येत होता, आणि आजीला दाट संशय होता ही तीच मुलगी असणार आहे जी त्या दिवशी खाली तिला दिसली होती. आजीला घाम फुटला होता बाहेर उठून जायची हिम्मत होत नव्हती शेवटी तिने कानावर हात ठेवला आणि झोपी गेली. तास दीड तासानंतर तो आवाज पूर्ण शांत झाला आणि आजी झोपी गेली. दिवस उजाडला १० वाजत आले असतील. आजीला रात्रीच्या उशिरा झोपण्याने तिल सकाळी जाग आली नाही सकाळी पण शेजारी ती पाहते तर सासूबाई नव्हत्या. आजी खाली उठून गेली तर सासूबाई खाली किचन मध्ये होत्या. त्या म्हणाल्या, उठलात का सुनबाई? बर झालं....सकाळी नाही उठवलं तुम्हाला शांत झोप लागली होती तुमची, पण मला एक सांगा सुनबाई तुमची एक चप्पल आपल्या खोलीबाहेर कशी काय आली? आजी निरुत्तर झाली. सांगणार तर काय आणि कोणाला? सांगितलं असत तर तिलाच येड्यात काढलं असत या लोकांनी म्हणून ती गप्प बसली. त्या दिवशी तिने दिवसभर आराम च केला. रात्री झोपण्यापूर्वी सासूबाई तिला म्हणाल्या, मी खालीच झोपते तुझ्या खोलीत मला काही बाई झोप येत नाही. आजी म्हणली मला भीती वाटते हो त्यावर त्या म्हणाल्या अग कोणी नाही येत नको काळजी करुस. मी आहे की खालीच झोपलेली. आणि भीती वाटते तर खोलीचा दरवाजा उघडा ठेव बंद नको करुस.आजीला हा पर्याय आवडला तिने दरवाजा उघडा ठेवला आणि झोपायला गेली. मध्यरात्र झाली होती अचानक आजीला ठक ठक....त्या दिवशी आला तसा आवाज येत होता. आणि तिला तो आवाज फार जवळून येत होता. आजी जागी झाली पण डोळे काही तिने उघडले नाहीत. आवाज शांत झाला तिने डोळे उघडले आणि पाहते समोर काय....ती उभी होती काळ्या रंगाचा कुर्ता, दोन्ही हातात कुबड्या, अर्धा चेहरा भाजलेला, डोळे रडून रडून सुजलेले,लाल भडक झालेले, ते सगळं पाहून आजीची दातखीळ बसली. ती मुलगी हळूच घोगऱ्या आवाजात आजीजवळ येऊन म्हणाली, तुम्ही माझ्या घरात राहायला आला आहात हे माझं घर आहे आणि आता तुला तेच ऐकावं लागेल जे मी सांगेल, आता ऐक मी काय म्हणते ते तुझ्या नवऱ्याचं आणि माझं लग्न लावून दे आपण दोघी या घरात बहिणीसारख्या राहू... बोल आहे का कबूल??? आजी गप्प च होती. तिचा जीव जायचा बाकी होता फक्त. ती मुलगी म्हणाली तुझा नवरा आला की त्याला सांग सगळं मी काय म्हणाले ते आणि माझं लग्न लावून दे नाहीतर तुझं बाळ आहे आणि मी आहे ध्यानात ठेव. अस म्हणून ती मुलगी मागे वळाली. आणि इकडे आजीने मान टाकली...सकाळी सासूबाई उठून आजीच्या खोलीत आल्या पण खोलीच्या बाहेर त्यांना ती आजीची चप्पल दिसली. त्यांनी दुर्लक्ष करत खोलीत आल्या आणि आजीची ती अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला.आजी आडवी पडली होती बेडवर तीच डोकं बेडच्या बाहेरील बाजूस लटकत होतं. त्यांनी पळत जाऊन आजीला नीट केलं आणि त्यांच्या हाताला चटका बसला आजी तापाने फनफनत होती. सासूबाई ना काय करावे सुचेना त्यांनी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आणून ठेवल्या. थोड्यावेळाने आजोबा आले त्यांनी आजीला हात लावला अंग फार गरम होत तीच. ते ताबडतोब जाऊन डॉक्टर ला घेऊन आले. डॉक्टर हो नाही हो नाही करत शेवटी आले. त्यांनी आजीला तपासलं. इंजेक्शन दिलं. डॉक्टर म्हणाले, साहेब तुमच्या मिसेस ने खुप काहीतरी मोठा मानसिक ताण घेतला आहे आणि त्याचा परिणाम शरीरावर फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या अवस्थेत ताण तणाव नाही घ्यायला पाहिजे त्यांनी. बाळावर परिणाम होतात, मी त्यांना इंजेक्शन दिल आहे त्यांना वाटेल बर काळजी नसावी. आजी हळूहळू शुद्धीवर येत होती ताप पण कमी झाला होता. आजोबा तिच्या समोर गेले आणि ती लग्न,लग्न...अस म्हणाली आणि परत तिची शुद्ध हरपली. आजोबांना वाटले हा सगळा डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शन चा प्रकार आहे पण तसं नव्हतं आजीने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती आजोबांच्या शेजारीच हसत हसत उभी होती.पण आजी सोडून ती कोणालाच दिसत नव्हती. अस का?अस का होतंय? ती मुलगी फक्त आजीला च का दिसत होती इतरांना का दिसत नव्हती? हा प्रश्न आजीला भेडसावत होता. तिथे आजोबांच्या शेजारी दात विचकत उभी होती.आजी त्या दिवशी दिवसभर झोपून होती. रात्र झाली आजोबांनी पण त्या दिवशी सुट्टी घेतली होती ते आजीच्या उशाला बसून तिची काळजी घेत होते. घरातली काम करायला सासूबाई होत्याच ना....आजीला जाग आणि आजोबांनी तिला पाणी दिलं. आजोबांना समोर पाहून तिला बरं वाटलं तिने खोलीतून चौफेर नजर फिरवली आणि ती कुठे दिसतेय का बघितलं पण ती त्या खोलीत नव्हती. आजीला वाटलं हीच योग्य वेळ आहे आजोबांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगायची. आजी त्यांना म्हणाली, अहो मला तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचं आहे. ते म्हणाले अग थेट बोल ना काय असेल ते. मग आजीने चप्पलच्या गोष्टीपासून ते काल शेजारी येऊन त्या मुलीने लग्न लावून दे म्हणेपर्यंत सगळा घटनाक्रम सांगितला. हे सगळं ऐकून आजोबांचा चेहरा गंभीर झाला. आणि त्यांच्या डोक्यात विचार आला,सगळं गाव ह्या घराला भुताच घर म्हणत, जागा झपाटलेली आहे असं म्हणत पण मला इथे काही जाणवलं नाही कारण मी जास्त वेळ घरी नसायचो,ही जास्तवेळ घरी होती आणि खरचं घरात अस काही असेल तर मग लवकरात लवकर हे घर सोडावं लागेल. आजोबांनी त्या जागेचा इतिहास शोधायचं ठरवलं.

त्यांनी गावात चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यात त्यांना यश आले. गावातल्या एका जुन्या जाणकाराने त्यांना त्यांच्या आधी जे कुटुंब तिथे राहायचे तेव्हा तिथे एक नोकर काम करीत होता त्याचं नाव व पत्ता सांगितला. धनाजी यादव त्या नोकराच नाव पण तो नोकर पन्हाळ्यात राहत नव्हता तो मुळगाव त्याच होत गडहिंग्लज. आजोबांच्या हातात पत्ता तर होता फक्त त्यांना गडहिंग्लज ला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी गडहिंग्लज ला जायचं ठरवलं आणि एका दिवसात परत यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी गाडी आणि सोबत तो गावातला गडी घेऊन आजोबा गडहिंग्लज ला निघाले. जवळपास दोन तासांच्या प्रवासानंतर ते गड ला पोहोचले. पत्ता होता त्यामुळे इकडेतिकडे कोणाला विचारायची गरज त्यांना पडली नाही. त्यांची गाडी थेट धनाजी च्या दारात जाऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकून एक म्हातारी आजी बाहेर आली. आजोबा गाडीतून उतरुन त्या म्हातारीपाशी गेले आणि म्हणाले, आजी धनाजीराव आहेत का घरात? म्हातारी काही न बोलता घरात निघून गेली आणि जाता जाता दरवाजात थांबून तिने आजोबांना आत येण्याचा इशारा केला. आजोबांनी त्या गड्याला खुणावलं गडी पण गाडीतून उतरून त्यांच्या मागे चालू लागला. आजोबा त्या घरात आले घर तस छोटेखानी होत घर कसलं झोपडी म्हणा हवं तर. शेणाने सारवलेली जमीन, मातीच्या भिंती त्यांचे जागोजागी पोपडे निघाले होते तशी आत मधून पार च घराची अवस्था बिकट होती. आजोबा खालीच जमिनीवर बसले. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक माणूस खोकत दमखात बाहेर आला आणि आजोबांकडे पाहून म्हणाला, साहेब काय काम काढलत गरिबांकड काय चुकलं माकल का आमचं? हात जोडत तो म्हणत होता. आजोबा हसत म्हणाले, अस काही नाही मला जरा माहिती हवी आहे बस्स बाकी काही नाही. धनाजीला जरा हायस वाटलं तो म्हणाला, कसली माहिती साहेब? आजोबांनी त्याला विचारलं, तुम्ही पन्हाळ्याला होतात ना? त्यावर धनाजी हो उत्तरला. तेव्हा तुम्ही 'स्मिता' बंगल्यात नोकर होता अस ऐकलं आहे मी मला त्या बंगल्याबद्दल माहिती हवी आहे,जेव्हा तुम्ही तेथे कामास होता तेव्हा तिथे कोण कोण राहत होत त्याची माहिती हवीये. धनाजीला त्या बंगल्याच नाव काढताच दरदरून घाम फुटला..तो म्हणाला,साहेब त्या घरापायी मी बरच काही गमावलं आहे मला आता तो विषय नकोय बास. आजोबा थक्क झाले ते म्हणाले अहो मी त्या घरात आता राहत आहे आणि माझी पत्नीला दिवस गेले आहेत तेव्हापासून की त्याच्या आधीपासून तिला कसले कसले भास होतात. ती म्हणते, तिला कोणी मुलगी दिसते. धनाजी आजोबांना थांबवत म्हणाला, म्हंजी ती हायच का तिथं आजूक? आजोबा अवाक् झाले आणि म्हणाले ती म्हणजे कोण? धनाजी उत्तरला,स्मिता? धनाजी पुढे सांगू लागला, १९६५ साली म्हणजे दहा वर्ष झाली बर या गोष्टीला. गौतम मोहिते नावाचे तुमच्यासारखेच एक सरकारी साहेब पन्हाळ्याला आले. त्यांच्या दिमतीला मी होतोच. त्यांला सरकारी घरात जागा भेटली होती. सोबत त्यांच्याबर त्यांची बायको,पोरगी आणि एक पोरग . पण पोरगी एका पायानी अधू होती. तिला एक पाय नव्हता. लहानपणी तिचा म्हणे अपघात झालता आणि त्यात ती पाय गमावून बसली अस बाईसाहेब मला म्हणाल्या होत्या, जेव्हा मी त्यांना तिच्याबद्दल विचारलं होतं. तिच्यापायीच त्यांनी पुणे सोडून इथं बदली करून घेतली होती वाटतं. तिथं तिला त्रास होयचा माणसं काहीबाही बोलायची तिला. लग्नाचं वय झालं होत तिचं पोरगी २१ वर्षाची तर असल ती. दिसायला तर लय देखणी, मनमिळाऊ स्वभाव होता पर एक गोम होती तिच्यात तिला जी आवडल ना ती ते करायची मग ते चांगलं असलं काय आणि वाईट असलं काय...साहेबाची लाडकी लेक त्यामुळं कोणीबी काय बोलत नव्हतं तिला. एक दिवस तिला गच्चीवरून फिरताना खाली जंगल दिसलं एकदम सुंदर हिरवंगार पाहताच क्षणी कोणीही त्या जागेच्या प्रेमात पडावं अस. आणि आता जिथं बंगला आहे ना ती जागा तिला लय आवडली. तेव्हा ती जागा भुताची नव्हती. आणि एवढी जास्त दाट पण नव्हती. गावातली माणसं गुरेढोरे घेऊन त्या वाटेने चरायला डोंगरावर आणायची. त्यामुळं तिथं काय बी भय नव्हतं. तिनं त्या रात्रीला त्या जागेबद्दल साहेबांसोबत चर्चा केली वाटतं. स्मिता तेव्हा साहेबाना म्हणली होती की मला तिथं आपलं घर पाहिजे आपण इथल्या गर्दीतून तिथे जाऊ. आणि त्याचवेळी आजोबांना आजी त्यावेळी पहिल्यांदा त्या जागेबद्दल काय बोलली होती ते आठवलं. धनाजी पूढे म्हणाला, साहेब तिच्यावर जाम चिडले आणि तिथून निघून गेले. हिकडं पोरीन खाणंपिन सोडलं. कोणासोबत बोलत नव्हती काही खात नव्हती. सायेब आणि बाईसाहेब काळजीत पडल्या, हिला नेमकं झालं काय? आणि त्यांच्या ध्यानात आलं की तिला त्या जागेवर घर हवंय. साहेब एक दिस कामावरून घरी आल्यावर थेट स्मिता जवळ गेले आणि त्यांनी कसलातरी कागद तिला दावला. जागेचा कागद होता वाटत त्यो. त्यो कागद बघून पोरगी बापाच्या गळ्यात च पडली का नाही पडणार हो, बापाने तिच्या नावाने ती जमीन खरेदी केली होती. १९६५ ते १९६७ बंगल्याच काम सुरू होतं. बंगला एकदम प्रशस्त बांधला होता. साहेबांनी स्वतः जातीने लक्ष्य देऊन काम करून घेतलं होतं. साहेबांनी बंगल्याची मोठी पूजा घालायची ठरवली. पूजेचा दिवस ठरला साहेबांनी सगळे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळ सगळे जण बोलावले होते. सगळी मित्र मंडळी आली. त्यांच्या ऑफिसातली लोक आली होती. मोहितेंनी बंगल्याचा नाव पण स्मिता ठेवलं. पूजेचा दिवस ठरला साहेबानी सगळे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळ सगळे जण बोलावले होते. सगळी मित्र मंडळी आली. त्यांच्या ऑफिसातली लोक आली होती. जेवण वैगैरे चालू होती. स्मिता कुबड्यांच्या आधारे का होईना सगळीकडे मिरवत होती. पूजा थाटात संपन्न झाली. सगळे नातेवाईक निघून गेले. काही जवळचे होते तेवढे राहिले होते त्यात साहेबांची एक लांबची बहीण होती. पूजेच्या दुसऱ्या सगळे खाली नाष्टा करत बसले होते. स्मिता खाली येत होती. त्याचवेळी ती बहीण म्हणाली, काय म्हणावं पोरीला दया येते तिची एवढं सहन करतेय ती, पण आता मोठी झाली पण तिचं लग्न कस होणार एवढी देखणी पोरगी आणि बिनलग्नाची राहणार. फक्त पायामुळेच ना?. तिने ते ऐकलं आणि ती आल्यापाऊली मागे फिरली आणि खोलीत जाऊन रडत बसली. आधीच अपघाताने तीच बालपण हिरावून घेतलं होतं. तिला पण वाटायचं आपण मनसोक्त जगावं, इतर मित्रमैत्रिणी प्रमाणे फिरावं आपलं पण लग्न व्हावं पण अस काही होणार नव्हतं हर तिला माहिती होतं आणि ती नशिबाला दोष देत तिथेच रडत बसली. तिला फक्त तिच्यावर प्रेम करणारा हवा होता तिला हवं तसं कबूल करणारा. पण तसा कधी तिला भेटणार होता का? झाले आता सगळे नातेवाईक निघून गेले. मोहिते कुटुंब तिथं स्थायिक झालं होतं. ,मुलगा छोटा होता त्याला शाळेला कोल्हापुरात ठेवलं होतं. हिच्या मनातून लग्नाचा विचार काही जात नव्हता. एक पाय अधू असल्याने कोणी तिला आपल्या घरची सून करून घ्यायला तयार नव्हत. अशातच साहेबांना एक वॉचमन पाहिजे होता. मी माझ्या पोराला साहेबांकडे विनंती करून बंगल्याच्या राखणीसाठी ठेवला. २६ वर्षाचा माझा तो मुलगा . नोकरी लागत नव्हती शिक्षणाभावी. स्मिता ची आणि त्याची नजरानजर होयची. ते बोलू लागले. आणि अश्यातच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्मिता दिसायला सुंदर होती. पण अधू होती तरी त्याला मंजूर होतं. पण हे फारकाळ टिकणार नव्हतं. दोघांच नात फार पुढे गेल होत. ही त्याला तिच्या खोलीतून इशारे करत असताना साहेबांनी त्यांना पकडलं आणि त्यांना सारं काही समजलं. त्यांनी त्या पोराला कामावरून हाकलून लावलं. त्याच्यावर आपल्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा पण नोंदवला. पोलिसांनी मारून मारून पार माझ्या पोराची हाड खिळखिळी केली. आणि त्याला सोडून दिला. तो पोलीस स्टेशन मधून थेट त्या बंगल्याकडे गेला. मोहिते..... ओ..... मोहिते असा आवाज दिला. साहेब धावत बाहेर आले. पण तोवर माझ्या काळजाच्या तुकड्याने बाहेरच झाडाला फाशी घेतली होती. त्याच्या पाय आणि हातात तडफड दिसत होती. साहेब जवळ जाई पर्यँत ती पण थांबली. हे सगळं स्मिता ने वरून पाहिलं होतं. साहेबांनी स्मिता कडे पाहिलं स्मिता लगेच आत वळली. ते थक्क होऊन त्या लटकलेल्या पोराकडे च पाहत होते की तेवढ्यात त्यांना त्यांच्या मुलीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला त्यांनी खोलीकडे पाहिलं तर धूर येत होता स्मिताने स्वतःला पेटवून घेतले होते. वाचवा वाचवा अस ती ओरडत होती. मोहिते धावत तिच्यापाशी गेले. त्यांची पत्नी तिथेच उभी रडत रडत दार ठोठावत होती. पण दरवाजा आतून बंद. ते दरवाजा ला धक्के देत होते पण दरवाजा उघडत नव्हता आतून फार जोरजोरात आवाज ऐकू येत होता...दहा मिनिटांनी तो आवाज बंद झाला. मोहितेंनी दरवाजा धक्का देऊन तोडला पण तोवर उशीर झाला होता. स्मिता आणि तिची खोली दोन्हीची राख झाली होती. साहेबांना एवढा जबर धक्का बसला होता की बस्स. कारण त्यांच्या समोर दोन जीव गेले होते आणि त्यात एक त्यांची पोटची मुलगी होती. मी मागच्या बाजूला होतो बाहेर पळत आलो तर माझं पोरग पुढं लकटलेलं दिसलं. मला पण काही सुधारत नव्हतं की बाईसाहेबांचा रडण्याचा आवाज ऐकू आला. मला तिकडे पण जाऊ वाटत नव्हतं. मी माझ्या पोराच्या तिथेच बसलो. पुढे काय पोलीस आले. काय क्रियाकर्म झालं माझ्या पोराची बॉडी दोन दिवसांनी हातात दिली. याच हातानी मी त्याच्या पार्थिवाला अग्नी दिला. आजोबा हे सगळं थक्क होऊन ऐकत होते. नंतर वाटत त्यांनी बंगला पण सोडला आणि पुढे काय झालं काही माहिती नाही मला. आजोबा त्यावर त्याला काहीच बोलले नाहीत.थोडेसे पैसे त्यांनी त्याच्या हातावर ठेवले आणि त्यांनी धनाजी चा निरोप घेतला.

मध्यरात्र उलटून गेली होती आजोबांना पन्हाळ्यावर पोहोचायला. संपूर्ण प्रवासात तोच विचार आजोबांच्या मनात की खरच हिला स्मिता दिसत असेल का? आजोबा घरात गेले खालच्या खोलीत त्यांची आई झोपली होती तिनेच आत्ता दरवाजा उघडला होता. वरती खोलीत गेले आजी शांतपणे झोपली होती. ते देखील थकले होते त्यामुळे ते लगेच झोपी गेले. झोपता झोपता त्यांनी मनाशी ठरवलं जो पर्यंत आपल्या समोर काही येत नाही तोपर्यंत याच बंगल्यात राहायचं.....आजोबांची ही एक चुक त्यांना खूप महागात पडणार होती याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती.....आजोबांनी मनाशी चंग बांधला होता की स्वतःला काही अनुभव आल्याशिवाय कोणताही निर्णय घेयचा नाही. हा विचारांमध्ये त्यांना आजीचा विचार आला नाही. तिला या अवस्थेत होणाऱ्या त्रासाचा विचार आला नाही. त्या रात्री सगळे शांत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा खोलीबाहेर पडले तर त्यांना आजीची चप्पल दाराबाहेर दिसली. ते जरा अचंबित झाले हे इथं कस आलं हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी ती चप्पल उचलून दाराबाहेर नेऊन ठेवली. आजीला त्यांनी उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला. आजीला माहिती होत हे विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे तिने तो विषय टाळला. त्या दिवशी आजोबांनी सुट्टी घेतली आजीची तब्येत बरी नसल्याने घरची काम करायला त्यांची आई होतीच की! रात्र झाली सगळे झोपायला गेले. आणि मध्यरात्र झाली असता आजोबांना रडण्याचा आवाज ऐकू आला. ते दचकून उठले तर शेजारी आजी शांत झोपली होती. तिला उठवणे योग्य नाही असे म्हणत आजोबा त्या आवाजाच्या दिशेने चालत गेले. खोलीबाहेर आले आणि समोरच्या बंद खोलीतून त्यांना आवाज येत होता. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि त्याचवेळी आवाज शांत झाला. आजोबा जरा घाबरले पण भास असेल असं म्हणत दुर्लक्ष करीत आपल्या खोलीकडे वळाले आणि इतक्यात त्यांच्या पायामध्ये काहीतरी आलं ते खाली पडले. काय आलं पायात हे पाहायला त्यांनी मागे मान केली तर ते दृश्य पाहून आजोबा पुरते हादरले. त्यांच्या समोर दात विचकत स्मिता उभी होती. हो हो स्मिता च उभी होती. जीच्याबद्दल एवढं ऐकून देखील त्यांनी दुर्लक्ष केलं होतं स्वतःच्या बायकोवर विश्वास त्यांनी ठेवला नव्हता आता ती स्मिता आजोबांच्या समोर उभी होती. तिथे उभी राहून आजोबांकडे पाहत म्हणाली, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय तुझी बायको आणि मी यावर बोललोय. आम्ही दोघी बहिणीसारख्या राहू तुझा जर नकार असेल ना तर हे सगळं तुझ्या बाळाच्या जीवावर बेतेल लक्ष्यात ठेव.....आजोबा तिथेच बेशुद्ध होऊन पडले. सकाळी त्यांच्या आईने त्यांना जाग केलं आणि उठताक्षणी ते म्हणाले, आपण हे घर आजच्या आज खाली करतोय खूप झालं इथं या जंगलात राहण. त्यांच्या आईला काही समजेना हे अस का बोलत आहेत त्यांनी आजीला पण सांगितले तू तुला लागेल ते वर काढून ठेव आपण हे घर सोडतोय.... आजी हळूच जवळ जाऊन म्हणाली, दिसली वाटतं तुम्हाला पण ती? आजोबा निःशब्द झाले त्यांनी दोन गडी बोलावून घेतले सगळं सामान पोचवायला. आणि हे सगळं इतकं गडबडीत झालं होतं की कोणाला काहीच समजत नव्हतं काय होतंय ते. पण आजोबांना एवढं नक्की समजलं होत की या घरात धोका आहेच. संध्याकाळ पर्यंत ते घर खाली करून आजोबा सहकुटूंब क्वार्टर वर परत राहायला आले. पुन्हा त्या बंगल्याकडे चुकून सुद्धा पाहणार नाही असा त्या दोघांनी निश्चय केला. पुढे त्या स्मिता च आणि त्या बंगल्याच काय झालं कोणास ठाऊक! पण इकडे येऊन आजी जरा खुलली होती. आनंदी वाटत होती. आजीला जरा बर वाटलं तिचा शेवटचा महिना होता दोन दिवस झाले होते त्यांना घर बदली करून की आजीला त्रास होयला लागला पोटात कळा येऊ लागल्या आजीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेलं आजोबा सोबत होतेच. OT च्या बाहेर सगळे थांबले होते आणि डॉक्टर बाहेर आणि म्हणाले, मला माफ करा साहेब पण मी आपल्या बाळाला नाही वाचवू शकलो ते फार अशक्त होतं आणि विचित्र गोष्ट अशी की जन्मलेल्या मुलाला एक पाय नव्हता.............

समाप्त.........


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy