Kakade Tejas

Horror Tragedy Crime

4.0  

Kakade Tejas

Horror Tragedy Crime

विहीर

विहीर

12 mins
532


रत्नागिरी जिल्हा म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं वरदानच म्हणावं लागेल. पूर्वेकडे सह्याद्रीच्या उंचउंच अशा अतूट रांगा, पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र, या दोन परिसीमांमधील लहानमोठ्या दऱ्या आणि त्यांमध्ये दूरवर पसरलेले समुद्र खाड्यांचे पाणी, हिरवीगार दाट वनश्री, नारळी-पोफळीच्या बागा अशा निसर्गरम्य देखाव्यांनी रत्नागिरी जिल्हा नटलेला आहे. पर्यटकांना मोहिनी घालतील अशी अनेक ठिकाणं या जिल्ह्यात आहेत. गणपतीपुळे म्हणजे माझं सर्वात आवडतं ठिकाण.अश्याच सुंदर रत्नागिरी जिल्हयात दिनकरराव सावंत व सावित्रीबाई सावंत यांच्या घरी पाळणा हलला मुलगा झाला. दिनकरराव म्हणजे पंचक्रोशीतील मोठी आसामी होती. वडिलोपार्जित नारळ आंब्याच्या वाड्या होत्या त्याच आता यांच्याकडे आल्या होत्या. त्याच वाड्या सांभाळत होते आणि पंचक्रोशीत सर्वात जास्त बागा,शेती यांची होती त्यामुळे त्यांना भरपूर मान होता. कोणालाही मदत करायला ते त्वरित धावून जात असत. व्याज न घेता आर्थिक व्यवहार करायचे तसे ते राजकारणी नव्हते पण समाजसेवा करण्यात ते अग्रेसर. याच त्यांनी घेतलेल्या समाजसेवेच्या व्रताने सगळं गाव त्यांना आप्पा म्हणत होते. आता त्यांना मुलगा झाला होता. सगळीकडे आनंदी वातावरण होत. मुलाचं नाव त्यांनी हर्षवर्धन ठेवलं पण सगळे त्याला हर्ष च बोलत असत. हर्ष मोठा होत होता. वर्षे लोटली आणि आप्पांनी शेतीतून फळबागांमधून खूप पैसे कमावले होते जमीन- जुमला नोकर - चाकर त्यांनी दिमतीला भरपूर होते. शेतात राबायला गडी माणसं होती जे लांबचे होते त्यांना आप्पांनी त्यांच्या मळ्यात छोटी घर बांधून दिली होती. इकडे हर्ष मोठा झाला होता बापाकडे एवढा पैसा होता पण त्याला कसला त्याचा बडेजाव नव्हता. त्याच एकदम साधं राहणीमान असायचं. आप्पांनी त्याला पुण्याला पुढील शिक्षणासाठी पाठवलं. इकडे यांच्याकडे पैसे भरपूर येत होते त्यामुळे आप्पा पहिल्यासारखे राहिले होते माणसांसोबत गोड बोलून काम करून घेणारे आप्पा आता शिव्या देऊन काम करून घेत होते. त्यांना फक्त पैसा हवा होता बस्स बाकी काही नको होतं. एवढा पैसा येतोय कोणाचीपण मती फिरणारच ना? त्यांना वाटायचं एवढं काम केलं तर इतक उत्पन्न आहे एवढा पैसा येतोय आणखी जोर जबरदस्तीने काम करून घेतलं तर दुप्पट पैसा येईल. त्यांनी जमीन खरेदी केल्या. पण तिथे काम करायला गडी भेटत नव्हते त्यामुळे रात्रपाळी वर त्याच गड्यांना नवीन जमिनी कसायला लावत असत. कोणी ऐकलं नाही नको म्हटलं तर त्याला शिव्यांची लाखोली वाहत असत. एवढा बदल झाला होता त्यांच्यामध्ये. या बदलाच कारण काय तर पैसा! याच पैशामुळे त्यांना दारू आणि जुगाराचा नाद लागला होता त्यांचं म्हणणं होतं दारु पिणं आणि जुगार खेळणं ही श्रीमंत असल्याची लक्षण आहेत.हर्ष शिक्षण घेत होता त्याच महाविद्यालयात तो रोहिणी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. रोहिणी च्या घरून लग्नाला तर विरोध नव्हता त्यांना हर्ष पसंत होता आता राहिला होता तो प्रश्न आप्पांचा. हर्ष दिवाळी साठी गावाला आला होता त्यावेळी त्याने आप्पा ना रोहिणीबद्दल सांगून टाकले. आप्पा देखील लगेच लग्नाला तयार झाले पण हर्ष म्हणाला लगेच लग्न नको मला नोकरी करूदेत माझं सगळं स्थिरस्थावर झालं की मग लग्न करू. हे ऐकून आप्पा हबकले! म्हणाले, अरे ही शेतीवाडी,जमीनजुमला तुझंच तर आहे सगळं जरा लक्ष घातलंस की समजेल तुला पण सगळं काही.यावर तो गप्प बसला आणि दिवाळी झाली की तो शहरात निघून गेला. तिकडून त्याने आप्पांना फोन करून सांगितले की मी तयार आहे जमीन कसायला तिचीच मशागत करेल तुमच्यापाशी राहील तेवढंच तुम्हाला आधार वाटेल. हे ऐकून आप्पा आनंदाने अक्षरशः वेड्यासारखे सगळ्या घरभर नाचले. सगळे त्यांना बघत होते पण त्यांचं लक्ष्य कोणाकडेच नव्हतं. काही दिवसात धुमधडाक्यात हर्ष आणि रोहिणी च लग्न झालं रोहिणी सून म्हणून आप्पांच्या वाड्यात आली. दिसायला ती अतिशय सुंदर होती आणि स्वभाव पण एकदम मनमिळावू त्यामुळे च कदाचित हर्ष ला ती आवडली असेल? असेच दिवसामागून दिवस जात होते सगळे आपापल्या कामात व्यस्थ होते. हर्ष जवळपास सगळं शिकला होता त्यामुळे आप्पांवरचा भार थोडा का होईना कमी झाला होता. आप्पांना आता नातवाची तोंड पहायची घाई झाली होती. हर्ष च्या लग्नाला दोन वर्षे झाली होती तरी मुलं होत नव्हतं. डॉक्टर केले,देव देव केले,नवस केले काही गुण आला नाही. हर्ष ची आई मात्र रोहिणी ला सतत टोचून टोचून बोलू लागली होती. शिव्या देत असायची ते रोहिणीला सहन होयच नाही आणि ती तिच्या खोलीमध्ये जाऊन रडत बसायची. असच एका रात्री रोहिणी ने हर्ष ला सांगितले मला माझ्या आईबाबांना भेटायला जायचं आहे.दोन दिवसांनी हर्ष ने रोहिणीला तिच्या आईबाबांकडे पुण्याला नेऊन सोडलं. रोहिणी ने आपल्या माहेरी आल्यावर आईला सगळी हकीकत सांगितली की कशी हर्ष ची आहे म्हणजे तिची सासू तिला छळते, अपमानास्पद वागणूक देते. रोहिणी ची आई तिला सांगते, हे बघ रोहिणी सगळं नीट होईल आपण एकदा पुळ्याच्या गणपतीला जाऊन येऊया त्याला नवस करू या तो म्हणे सर्वांचे नवस पूर्ण करतो. हे ऐकताच रोहिणी चेहऱ्यावर तेज आलं खरं. कारण गणपतीपुळे तीच सर्वात आवडत ठिकाण होत तिथलं ते मयुरेश्वराच समुद्रकिनारी असलेलं मंदिर, त्या मंदिराला समुद्राच्या धडकणाऱ्या लाटा आणि मंदिराच्या मागे असलेले डोंगर खूप मस्त वातावरण असत नेहमी तिथं आणि तिथं गेलं का काय माहिती फारच प्रसन्न वाटत. अश्या वातावरणात ती जाणार होती मोकळा श्वास घ्यायला. तिची आई म्हणाली आपण दोन दिवसात निघू या. दोन दिवसांनी रोहिणीचा परिवार आई, वडील आणि ती पुण्याहून गणपतीपुळेकडे रवाना झाला. पुळ्याच्या गणपतीचं दर्शन घेयचं आणि रोहिणीला सासरी सोडायचं अस त्यांचं एकंदरीत नियोजन होतं. आठ तासांच्या प्रवासानंतर ते गणपतीपुळ्याला पोहोचले. दर्शन दुसऱ्या दिवशी घेणार होते आदली रात्र त्यांनी पुळ्यात काढायची ठरवली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून ते तिघेही मंदिरात गेले. रोहिणीची आई मयुरेश्वरासमोर हात जोडून उभी होत म्हणाली, देवा मयुरेश्वरा, आजवर तू मला माझ्या लेकीला माझ्या कुटुंबाला काहीच कमी पडू दिल नाहीस जे मागितलं त्या पेक्षा नक्कीच जास्त आमच्या पदरात पडलं पण आता शेवटचं मागण मागते तुझ्यापुढे ते देखील माझ्या लेकीसाठी. तिने नवस मागितला की,'जर माझ्या मुलीला पुढील एक वर्षात मुलबाळ झालं तर मी तुला सोन्याने माखलेला एक मुकुट अर्पण करीन". आपल्या आईच हे बोलणं ऐकताच रोहिणी च्या मनात प्रश्नाचं काहूर उठलं तिला वाटलं आपली आई देवाला लाच देतेय की काय नवस वैगैरे खरंच अश्या काही प्रथा आहेत का? की देव सांगतो यांना की तुम्ही नवस करा आम्ही तुमची ईच्छा पूर्ण करू? हे खरं असत? पण ती मनात म्हणाली हे खरं नसतंच मुळी, माणसाने लोभापायी बनवलेल्या काही नियमांना आपल्यासारखे लोक बळी पडतात आणि त्यातला एक नियम म्हणजे नवस जो की माझ्या आईने माझ्यासाठी केला आहे. तिला वाटत होतं जावं सांगावं आईला की हे नवस वैगैरे काही नसतं. पण तिच्या आईची श्रद्धा होती तिला तडा जाऊ नये यासाठी तिने मौन पाळलं काही न बोलता निमूटपणे दर्शन घेतलं देवाकडे तीनेदेखील काहीतरी मागितलं असेलच कारण माणूस किती पण दूरच्या विचारांचा का असेना लोभापायी तो काहिही करू शकतो. रोहिणीचा परतीचा प्रवास सुरु झाला तिच्या सासरी जाण्यासाठी. पण ती यावेळी टवटवीत दिसत होती सासरी जाताना तिच्या मनात भीती नव्हती की कसलं दडपण नव्हतं मुळात तिला पण प्रश्न पडला की अस का वाटत आहे मला. ते सासरी पोहोचताच त्यांना अनपेक्षित धक्का बसतो कारण एवढ्या १० ते १५ दिवसांच्या दरम्यान दिनकररावांचा दारूचं आणि जुगाराचा भयानक वाढला होता त्यांनी या पायी बरीच जमीन विकली कामगार काढून टाकले होते ते कामगार हर्षच्या हाता पाया पडत होते विनवणी करीत होते आम्हाला काढू नका कामावर ठेवा पण हर्ष च्या हातात अजून तर कारभार सगळा आला नव्हता दिनकरराव बोलतील तो शब्द अखेरचा. एवढं सगळं घडून गेलं होतं आणि रोहिणीला हर्ष ने कधी फोनवर पण सांगितलं नाही याचं जास्त वाईट वाटलं तिला.दोन महिने उलटून गेले आणि रोहिणीने गोड बातमी दिली तिला दिवस गेले होते. जरा अस्वस्थ वाटू लागल्याने ती आणि हर्ष डॉक्टरकडे गेले असता त्यांना समजलं. हर्ष तर आनंदाने वेडावून गेला होता या क्षणाची त्याने जवळपास साडेतीन वर्ष वाट पाहिली होती. त्याला अस झालं होतं कधी घरी जाऊन सगळ्यांना सांगतोय. घरी बातमी धडकताच सगळे आनंदी झाले सगळीकडे आनंदी वातावरण झालं होतं. कालपर्यंत शिव्या देणारी सासू आज सुनेची दृष्ट काढत होती. आप्पा सावंताच्या वाड्यात आता एक नवीन पाहुणा येणार आपल्याला आजोबा अशी साद घालणार, दुडूदुडू सगळीकडे पळणारं, भूक लागली की रडणार हा सगळा विचार करून आप्पा फारच खुश होते. आप्पांनीदेखील आनंदाच्या भरात आजपासून दारू आणि जुगाराचा नाद सोडल्याची घोषणा केली. सगळ्या घरालादिवाळसण असल्यासारखं उधाण आलं होतं. काही महिन्यांनी घरात पाळणा हलला. रोहिणीला मुलगी झाली होती सगळे आनंदित होते. आप्पांनी जवळपास दहा ते पंधरा किलो बर्फी सगळ्या गावभर वाटली. सगळेच खुश होते जवळपास अडीच तपांनी या वाड्यात नवजात शिशूच्या रडण्याचा आवाज घुमला होता. सर्वकाही सुरळीत चाललं होतं हर्ष च्या मुलीचं बारसं झालं नाव ठेवण्यात आलं आर्या. बघता बघता आर्या दोन वर्षांची झाली तोतर बोलू लागली. आप्पांना बा....बा...अशी आवाज द्यायची. आप्पा तिला जास्त जवळ घेत नव्हते कारण त्यांनी तिला जवळ घेतलं की त्यांच्या अवतीभवती एक वेगळीच वातावरण निर्मिती होई काहीतरी त्यांना अस्वस्थ वाटत असे. अनेकदा हे झालं पण ते कधी कोणाला बोलले नाहीत. तरी आर्या सारखी आप्पांच्या जवळ यायची पण आप्पा तिला जास्त वेळ जवळ ठेवत नव्हते. अश्याच एके रात्री आप्पा गाढ निद्रेत असताना त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नांत एक हिरवी साडी घातलेली हातात हिरव्या बांगड्या कपाळावरच कुंकू पसरून नाकावर आलेली एक बाई त्यांना दिसली डोळे तिचे रागाने लालबुंद झाले होते. स्वप्नांत येत ती जोरात किंचाळली दिनकर सावंत बघ मी परत आलेय... बघ मी परत आलेय... आप्पा दचकून जागे झाले त्यांना सर्वत्र अंगभर घाम फुटला होता त्यांनी शेजारी पाहिलं त्यांची पत्नी शांत झोपली होती.आप्पा पाणी प्यायले आणि म्हणाले कदाचित कामाच्या ताणामुळे येत असतील असली स्वप्न आणि त्यांनी दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या दिवशी त्यांचं डोकं फार दुखत होत. डिसेंबर महिना संपत आला होता अखेरचा एक दिवस बाकी होता तर त्या शेवटच्या दिवशी आप्पा आणि त्यांच्या गावातल्या मित्रांनी आप्पांच्या मळ्यात एक जंगी पार्टी आयोजित केली होती. तिथे सगळं होत मांस, मच्छी, दारू सगळं काही यांची पार्टी सुरू होती आप्पांनी दारू सोडली होती पण मित्रांच्या आग्रहाखातर त्यांना घ्यावीच लागली त्यांनी थोडी घेतली तशी आणि म्हणाले मी लघुशंकेसाठी जाऊन येतो ते उठले हातात बॅटरी घेऊन आंब्याच्या बागेत गेले तिथे त्यांनी आटोपत घेतलं आणि मागे फिरले तर त्यांना तिथे कोणाची तरी चाहूल लागली. आप्पांना वाटलं कोणीतरी मित्र आला असेल म्हणून त्यांनी आवाज आला त्या दिशेने बॅटरी मारली त्या प्रकाशात त्यांना एक बाई दिसली ही तीच बाई होती जी काल रात्री आप्पांच्या स्वप्नात आली होती. आप्पांची तिला पाहताच बोबडी वळली सर्व अंगभर घाम फुटला होता त्यांच्या हृदयाची स्पंदने त्यांना स्पष्टपणे ऐकू येत होती इतकी जोरात ती धडधडत होती. आप्पा तिच्याकडे पाहत तसेच निपचित होऊन खाली पडले.त्यांनी थेट डोळा उघडला तेव्हा ते फार बिथरले होते खूप घाबरले होते. प्रश्नावर प्रश्न विचारत होते. मी कुठंय? ती कुठंय? कोणाला काही कळत नव्हतं ते काय बोलत आहेत ते तस डॉक्टरांनी सांगितले होत की त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे त्यांना सावरायला वेळ लागेल. आप्पा मात्र हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत होते आणि आठवत होते की ती बाई कोण होती कारण आप्पांना जस थोडं आठवत होतं तसं त्या बाईला त्यांनी पाहिलेलं होत. आणि हळूहळू त्यांच्या लक्षात सारा वृतांत आला भूतकाळात घडलेली एक खूप मोठी घटना जिचा आप्पांना काळाच्या ओघात विसर पडला होता. विसर पडला होता की त्यांना काहीच फरक पडला नव्हता कारण ते तेव्हा फार निर्दयी झाले होते. अडीच ते तीन वर्षापूर्वी दिनकररावांना दारूचा आणि जुगाराचा भयानक नाद लागला होता अगदी वेड्यासारख ते वागत होते. पैसे कमी पडले तर जमिनी विकत होते. उधार घेत होते एवढं सगळं करणारा माणूस फक्त नातू येणार हे ऐकताच दारू आणि जुगार सोडतो कस शक्य आहे ना? एकेदिवशी आप्पा जुगारात हरले आणि त्यांनी पणाला लावलेले पैसे ते पण गेले. म्हणून ते ज्या दिवशी हरले त्या दिवशी त्यांनी त्यांची जमीन एका माणसाला लगोलग विकली त्यांचा व्यवहार झाला.जमिनीला लागून विहीर होती ज्यात बारमाही पाणी असायचं म्हणून त्यांनी ती एकरभर जमीन कसायला गणपत नावाचा गडी ठेवला होता तो आणि त्याची बायको दोघे तिथं राहत होते. गणपत दिवसभर राबराब राबायचा आणि त्यातून आप्पा त्याला पगार द्यायचे आणि मग घर चालायचं. पण आता ती जमीन आप्पांनी एका माणसाला विकली होती. एके दिवशी तो माणूस आप्पांच्याकडे आला आणि म्हणाला तुमचा गडी जमिनीची जागा सोडायला तयार नाहीये. त्याला खरं वाटत नाहीये की तुम्ही जमीन विकली मला विकली आहे ते मला ती जमीन आत्ताच्या आता रिकामी करून हवीय अन्यथा माझे पैसे मला परत देऊन टाका.आप्पा दारूच्या नशेत होते आणि हे ऐकताच ते फार संतापले आणि तावातावाने गणपत च्या झोपडीकडे गेले आणि मोठ्याने आवाज दिला. गण्या बाहेर ये... मालकाचा आवाज ऐकताच एका हाकेतच तो धावत बाहेर आला आणि आप्पांसमोर येऊन उभा ठाकला. आप्पा म्हणाले,"जमीन काय तुझ्या बापाची आहे का र बांडगुळा मी ही जमीन या माणसाला विकली आहे आणि आता या जमिनीचा आणि माझा संबंध नाहीये तुला एकच सांगतो दिवस मावळायच्या आत जागा खाली कर आणि पगार घे आणि गाव गाठ. हे ऐकताच गणपा पार कोसळून गेला विनवण्या करीत म्हणाला, मालक तुम्ही हाकलून दिलं तर जाऊ कुठं आम्ही,खाऊ काय आम्ही हे सगळं होत असताना गणपतची बायको बाहेर आली आणि तीदेखील गयावया करू लागली. गणपत म्हणाला,"मालक बायको पोटुशी आहे तुमच्या पोरीप्रमाणे आहे तिचा तरी विचार करा." हे ऐकताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली कारण हर्षला मूल होत नव्हतं आणि त्यात हे असं गणपत म्हणतोय आणि आप्पा दारूच्या नशेत होते. संतापाने उफाळून आलेल्या आप्पांनी विनवण्या करीत असलेल्या गणपतच्या बायकोला तिच्या दंडाला धरून जोरात हिसडा दिला तो धक्का इतका जोरात बसला की ती तिथे शेतात ढेकळात पोटावर पडली आणि वेदनेने विव्हळू लागली. तिला नववा महिना सुरू होता. गणपत खूप घाबरला तो पळत बायकोजवळ गेला ती वेदनेने विव्हळत होती मोठ्यामोठ्याने रडत होती आप्पा ते सगळं पाहून जरा बिथरले आणि त्यांनी तिथून त्या माणसासकट काढता पाय घेतला. मागून गणपतने दिलेला मदतीचा आवाज हवेतच विरला. बाकीच्या गड्यांच्या मदतीने गणपतने बायकोला रत्नागिरीच्या दवाखान्यात आणलं आणि त्याला समजलं की बायको पडल्यामुळे त्यांचं मुल दगावलं होतं. त्याने मोठ्याने बायकोकडे पाहत टाहो फोडला. सोबत आलेल्यांनी त्याला धीर देत शांत केलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते घरी आले. सगळी पांगापांग झाल्यानंतर गणपत आणि त्याची बायको खूप रडले. दोघांनाही समोर काही मार्ग दिसत नव्हता. सगळीकडे अंधारच अंधार दिसत होता. तेवढ्यात त्याची बायको उठली आणि पळत विहिरीकडे गेली. याला इकडे काही कळायच्या आत तिने आतमध्ये उडी घेतली. गणपत पोहोचेपर्यंत पाण्यात उडी टाकेपर्यंत त्याच्या बायकोचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. त्याने ते दृश्य पाहताच जोरात टाहो फोडला, पण ऐकायला जवळ कोणी नव्हतं. त्याने पुढचा मागचा विचार न करता घरात गेला आणि एक कासरा घेऊन त्याला स्वतःला लटकवून घेतलं कारण त्याला माहिती होतं मालकाचं आपण काही वाकडं करू शकत नाही. म्हणून त्याने स्वतःला संपवलं होत कायमचं. एक हसतं खेळतं घर काही क्षणात उध्वस्त झालं होतं... ते देखील सणासुदीच्या ऐन दिवशी. कारण त्या दिवशी संक्रात होती.आप्पांना दवाखान्यात बेडवर हे सगळं आठवत होतं. पण त्यांच्या मनात विचार आला, तीन वर्षांपूर्वी गेलेली व्यक्ती माघारी कशी येऊ शकते? या घटनेबद्दल रोहिणीला काही कल्पना नव्हती. दोन दिवसांनी आप्पांना घरी सोडण्यात आलं. आप्पा घरी आले पण ते जास्तीत जास्त वेळ झोपून राहत असतं. त्या दिवशीदेखील संक्रात होती. आप्पा घरात त्यांच्या खोलीत होते. हर्ष बाहेर गेला होता आणि रोहिणी आणि तिच्या सासूला देव ववसायला जायचं होतं आणि आर्यादेखील झोपली होती त्यामुळे रोहिणीने आर्याला उचलून आप्पांच्यापाशी नेऊन ठेवलं आणि म्हणाली आम्ही येईपर्यंत फक्त लक्ष ठेवा. आप्पांनी होकार दिला. या दोघी ववसायला निघून गेल्या.अर्धा तास गेला असेल. आप्पा खोलीतच पुस्तक वाचत बसले होते. अचानक त्यांचं लक्ष आर्याकडे गेलं तर आर्या उठून बसली होती पण ती रडत नव्हती ती हसत नव्हती ती फक्त एकटक आप्पांकडे पाहत होती. सुरुवातीला त्यांना काही जाणवले नाही. जसजसे ते आर्याच्या जवळ गेले, त्यांनी तिला आर्या... आर्या... असा आवाज दिला पण तिने उत्तर काहीच दिले नाही. ती एकटक आप्पांकडे पाहत होती. अचानक आप्पांच लक्ष खोलीतल्या आरशाकडे गेलं आणि त्या आरशात त्यांना आर्याच्या जागेवर गणपतची बायको त्याच हिरव्या साडीत दिसली. ती पोटुशी दिसत होती आणि ती त्यांच्याकडे एकटक पाहत होती. समोर पाहिलं तर आर्या होती आणि आरशात पाहिलं तर गणपतची बायको. आप्पांना काहीच सुचत नव्हतं. भीतीने ते गांगरून गेले होते ते पळत उठून खोलीबाहेर आले त्यांना नीट श्वासदेखील घ्यायला येत नव्हता. त्यातच त्यांच्या मनात आलं की आता एकच उपाय आहे विहिरीवर जाऊन माफी मागणे. असं मनात येताच ते विहिरीकडे धावू लागले. त्यांनी मागे वळून पाहिलं तर आर्यादेखील त्यांच्या मागे येत होती. पण ती नुसती त्यांच्याकडे पाहत पळत होती. आप्पा पडत धडपडत विहिरीपाशी पोहोचले. त्यांनी आतमध्ये डोकावून पाहिलं तर आतमध्ये सगळा गाळ आणि कचरा साचला होता. ते विहिरीमध्ये डोकावून ओरडले, माफ कर मला. तो आवाज विहिरभर घुमला. पण व्यर्थ... एवढ्यात त्यांना मागून आलेल्या त्यांच्या नातीच्या रुपात असलेल्या गणपतच्या बायकोने धक्का दिला. ते विहिरीत पडले. त्यांना चांगलं पोहता येत होतं पण त्यांचा पाय गाळात खोल रुतत गेला आणि आप्पा हळूहळू बुडत गेले. ते वाचवा... वाचवा... असं ओरडले पण त्यांचा आवाज काही विहिरीबाहेर जाऊ शकला नाही. वरती काठावर उभी असणारी आर्या अचानक आप्पांना पाहून जोरजोरात रडू लागली. गणपतच्या बायकोचा सूड पूर्ण झाला होता पण तिने सूड उगवण्यासाठी तीन वर्षे वाट का पाहिली आणि त्यांच्या नातीच्या रूपानेच सूड का उगवला?


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror