'योग्य निवड''
'योग्य निवड''
काळा सावळा गौरव एमबीए झालेला. एका मोठ्या कंपनीत उच्चदावर नोकरी करत होता. सुनिल गोरागोमटा, देखणा युवक बिझनेसमन होता. या दोघांची ही स्थळ नेहाला सांगून आली होती. नेहा ही सुस्वरुप उच्चशिक्षित इंजिनिअर मुलगी. घरातील सगळ्यांना सुनिलचे स्थळ पसंत होते पण नेहाने गौरवचे स्थळ पसंत केले. घरात सगळ्यांना आश्चर्य वाटले. एवढे मोठं श्रीमंत स्थळ, गोरागोमटा देखणा, कर्तृत्ववान मुलगा अशा मुलाला नकार देऊन तिने गौरवला पसंत केले होते.
गौरव काळा-सावळ्या वर्णाचा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेला मुलगा. नेहाला पहायला आला तेंव्हा घरात सगळ्यांना वाटले यांच्या रंगामुळे ती त्याला नकार देईल, पण दोघे एकमेकांबद्दल जाणून घेत असताना तिला गौरवचा स्वभाव आवडला होता. एकमेकांना अगोदर जाणून घेऊया मग लग्नाबाबत काय तो निर्णय घ्यायचा अस दोघांनी ठरवलं. घरातुन ही त्यांच्या या निर्णयाला सहमती मिळाली.
गौरवला एक-दोन वेळा भेटल्यावर नेहाला हाच आपला जीवनसाथी व्हायला योग्य आहे याची खात्री पटली. त्याचे उमदे विचार, केअर टेकिंग स्वभाव आणि त्याच्या कर्तृत्वाने नेहा प्रभावित झाली होती. दोन भेटीतच त्यांनी एकमेकांना चांगले ओळखले होते. विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय दोघांनीही घरी सांगितला.
नेहाच्या घरी तीची बहीण श्वेता विचारत होती, "असं काय पाहिलेस त्याच्यात, त्या श्रीमंत अन् देखण्या सुनिलला डावलून तू गौरवला निवडलं." नेहा बोलली, "त्याचा स्वभाव आणि त्यांचे विचार आवडले मला.त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ही जाणून घेतली. त्याचे सगळे कुटुंब ही खुप छान आहे, प्रेमळ आहे. त्या बिझनेसमन सुनिलच म्हणशील तर खुप श्रीमंत आहे तो पण विचारांच्या श्रीमंतीत तो खुप गरीब आहे. अख्खे आयुष्य ज्याच्यासोबत घालवायचं आहे त्याचा स्वभाव जाणून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. जीवनात नुसता पैसा महत्त्वाचा नसतो. गौरव सावळा आहे पण त्याचे विचार शुभ्र, स्वच्छ आहेत. वैवाहिक जीवन सुखी, समाधानी करायचे असेल तर बाह्य सौंदर्य न्हवे तर आंतरिक सौंदर्य पहायला हवे. गौरव कर्तृत्ववान आहेच पण मूल्ये आणि विचारांनी ही तो प्रगल्भ आहे. माझा जोडीदार म्हणून तो अगदी योग्य आहे."
दोघी बहिणींच बोलणं आई-बाबा ऐकत होते. आई म्हणाली, "अगदी योग्य निर्णय घेतलास. पतीपत्नी एकमेकांना पूरक असतील तर त्यांचा उत्कर्ष व्हायला वेळ लागत नाही, आणि हा उत्कर्ष चिर:कालीन ठरतो. जोडीदार निवडताना वरवरच्या रंगांना न भुलता तुम्ही दोघांनी ही एकमेकांच्या स्वभावाला, विचारांना, ध्येय आणि आवडीनिवडींना प्राधान्य दिले हे खुप छान झालं." त्यावर नेहा म्हणाली पैसा काय स्वकष्टाने मिळवता येतो पण चांगला जोडीदार आणि चांगलं कुटुंब मिळण हे खुप महत्त्वाचं असतं. ही निवड करताना तू माझ्यावर केलेले संस्कार मला खुप उपयोगी पडले. सगळं कुटुंब आनंदी झालं होतं.
आज नेहाच्या लग्नाचा दिवस. नववधूच्या वेषात नेहा खुप सुंदर दिसत होती. गौरवचेही प्रसन्न व्यक्तिमत्त्व शेरवानीत खुलून दिसत होते. कन्यादान करताना नेहाच्या आईबाबांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. नेहाचा हात गौरवच्या हातात खुप मोठ्या विश्वासाने देताना तिचे आई-बाबा आज खऱ्या अर्थाने निश्चिंत झाले होते.