काळी रात्र
काळी रात्र
भिशी पार्टीच्या आम्ही सर्व मैत्रिणीनी ट्रिप काढण्याचे ठरविले. सर्व जणी अगदी उत्साही…कुणाला छोटे मुलं असल्याकारणाने किंवा अजून कुणाला काही प्रॉब्लेम...तरीही एक दोन सोडल्या तर बाकी तयार झाल्यात… एक छानसा स्पॉट निवडला कारण एक दिवसभर फक्त...साधारण रात्री नऊ किंवा दहा पर्यंत येऊन पोहोचणार…. मग ठरले आणि निघाली आमची ट्रिप...जाताना मध्ये एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो...साधारण आम्ही 15 जणी होतो तेवढी मोठी गाडी आम्ही हायर केली ...
निसर्गाच्या सानिध्यातून वाट काढत आमची गाडी जात होती सोबत आमची धमाल सुरू होती ...तीन तास जायला लागणार होते .एकदाचे आम्ही त्या स्पॉट वर पोहोचलो.. आधीच ठरवून ठेवलेला नाश्ता केला आणि दुपारपर्यंत खूप एन्जॉय केला मग जेवण आणि नंतर राहिलेली बाकी भ्रमंती…. फिरता फिरता थोडा वेळच झाला .. अंधार पडायला लागला ..पक्षी आपापल्या घरट्यात परतण्याची घाई करीत होते संपूर्ण ती हिरवळीची जागा त्यांच्या किलबिलाटाने व्यापून गेलेली...फेब्रुवारीचा महिना..त्यामध्ये थोडी बोचरी थंडी हवा स्पर्शून अंगाला काटे येत होते… विशेष म्हणजे तिथे इलेक्ट्रिसिटी नव्हती … आधीच आम्हाला लवकर निघण्याची सूचना मिळालेली होती…तरी वापस निघायला वेळच झाला त्यात आम्ही फक्त महिला..जंगलातून वाट काढता काढताच वेळ होणार होता.अनामिक भितीने थोडी हुरहूर वाटायला लागली आणि बसलो एकदाचं गाडीत.. गाडी सुरू झाली नी एकदाचं हुश्श वाटलं...आता लवकरच घरी पोहचू .. पुन्हा एकदा असे वाटायला लागले की किती आपण भित्र्या आहोत…!!!
ड्रायव्हरला चल लवकर म्हणून सांगत होतो..आता गाडी दाट जंगलातून वाट काढत होती… हा रस्ता फारच निमुळता होता समोर जातो की नाही की इथेच बंद झाला असे वाटत होते..थोडेदूर जात नाही तर गाडी बंद पडली. सुरूच होई ना.. .ड्रायव्हर नी खूप प्रयन्त केले पण सुरूच होत नव्हती ...खाली उतरायचीही भिती…!! पण आता ड्रायव्हरला उतरणे भाग होते ..त्याने बोनेट उघडून पाहिले.. अंधारात काहीच दिसत नव्हते आम्ही मोबाईलचा लाईट लावला आणि त्याला उजेड दाखवत इकडे तिकडे बघून कशीतरी हिम्मत दाखवून उभी होते.आता आम्हाला काही पर्यायच नव्हता .. फक्त
दोन तीन मोबाईल सुरू होते पण नेटवर्क काहीच नव्हते बाकीच्यांच्या मोबाइलच्या बॅटरी डाऊन..
आता आमच्या जवळचे खायचे पदार्थ पण संपलेले आणि पाणी पण…निशब्द वातावरण... एकही एकीशी बोलत नव्हती सर्वजणीनी एकमेकींच्या हातात हात घेऊन घट्ट पकडून ठेवले.. ड्राइव्हर एकच काय तो माणूस सोबत.. तो पण असफल राहिला..घड्याळ पाहिले रात्रीचे 9 वाजलेले… बापरे …!! 2 तास झाले आपण इथेच आहोत…!! आता मात्र पुरतं घाबरून गेलो.मग ड्राइवर म्हणाला की बघतो इथे कुणी मिळेल तर ...आणि फोन करतो तेथून मालकाला…इथे मेकॅनिक मिळणार नाही.... नाहीतर माझ्या मोबाईल ला नेटवर्क मिळाले तर फोन करून दुसरी गाडी बोलावतो…..आम्ही सर्व लेडीज त्यामुळे तो पण आम्हाला सोडून कुठे जात नव्हता...शेवटी पाठवावेच लागले.. आम्ही थोडं रेस्ट्रिक्टटेड एरिया च्या बाहेर होतो तरी पण तिथे खूप झाडी होती..ड्रायव्हर ला खाली पाठवून आम्ही गाडीचे दार लॉक करून घेतले.. ड्रायव्हर वापस येईपर्यंत गत्यंतर नव्हते..त्याला बाहेर पाठवून ती सुद्धा एक रिस्कच घेतली होती..
थंडगारवारा आता जोरात वहात होता आम्ही मात्र न बोलता ,प्रत्येकीच्या चेहर्यावर चिंता ,एक अनामिक भिती की आपले आता काय होणार ?..त्या थंडगार वाऱ्यापेक्षाही गार होऊन बसलो होतो..गाडीत अंधार ..एखादी टाचणी जरी पडली तरी आवाज येणार इतकी भयाण शांतता...झाडीतून किर्र किर्र करीत रातकिडे ओरडत होते.. कुठेतरी सटकन काही पडल्याचा आवाज मग अजूनच आमची मिठी घट्ट होत होती...एक दोघी तर रडायलाच लागल्या..त्यांना समजावत होते पण माझीच भीतीने किती गाळण उडाली होती हे मलाच माहीत होते..तरी मला हिम्मत ठेवावीच लागली....काजवे अजूनच ओरडत होते आणि थोडा प्रकाश देऊन जणू त्या अंधाराला डिवचत होते...तितकंच मनाला बरं वाटत होते.. कुठेतरी लांब कोल्ह्याची कोल्हेकुही सुरू होती.. त्या शांततेला चिरत तो आवाज अजूनच भेदरणारा वाटत होता.. वाटेल तसे विचार मनात डोकावत होते. प्राण्यापेक्षाही जिवंत नराधमाचीच जास्त भीती वाटत होती..
एक सावली बस च्या दिशेने येतांना दिसली आणि आमची तर मग पूर्ण हवाच निसटली.. थोडं वर डोकं करून पाहिले तर थोड्या वेळात ती सावली काही कानोसा घेत तेथून झाडीत गायब झाली...जीव मुठीत घेऊन बसलो होतो.. घरची चिंता वाटत होती.. काय म्हणतील? आपल्या काळजीने ते कसे असतील ? घड्याळात पाहिले मध्यरात्रीचे 12 वाजलेले… हे 3 तास किती भयंकर…!! आम्ही सुरक्षित असल्याची खात्री पटली.. घश्याला कोरड पडली होती पण प्यायला पाणी नव्हते .. कुणाच्या तरी पर्समध्ये चॉकलेट होते ते खाऊन कशीतरी वेळ निभावली… साधारण रात्रीला 12.30 वाजता आमच्या बस चा दरवाजा ठोठावला.. मग आमची पंढरी चांगलीच घाबरली…!! देव आठवायला लागले… त्याच्याजवळ दोन मशाली होत्या ..आता वाटले हे दरवाजा तोडून आत येणार मग……..
कल्पनाच करवीत नव्हती… त्या थंडीतही दरदरून घाम फुटला… मग ड्रायव्हरचा आवाज आला तेव्हा कुठे जीवात जीव आला...दार उघडू की नाही म्हणून मी थोडा पुढाकार घेऊन समोर गेले आणि त्या मशालीच्या उजेडात ड्रायव्हरचा चेहरा पाहिला आणि देवाचे नामस्मरण करीतच मी बसचे दार उघडले तर ते दोन धडधाकट पुरुष मशाली बाहेर ठेऊन आत शिरले.. आधीतर ते त्यांच्या भाषेत काहितरी कुजबुजत होते ते कळले नाही..आता अजूनच भीती वाटायला लागली पण ड्रायव्हर सोबत होता… ते बोलले , " तुमी आता इथिसा थांबू नका कारण आता रातीत इथ काइ पण इपरित घडत…. म्हणून मणतो का चाला आता इथून उतरा ...नायतर काई खर नाय …." आमचे चेहरे पहण्यासारखे होते..
नाईलाजाने आम्ही बस खाली उतरून गुपचूप त्यांच्या मागे चालायला लागलो जीव मुठीत घेऊन त्या अनोळखी माणसासोबत……!! कारण इकडे आड तिकडे विहीर असे झाले होते म्हणून आम्ही हा मार्ग निवडला.. काठी आपटत आपटत आमच्या एक जण मागे आणि एक जण पुढे असे जवळपास अर्धा किलोमीटर चाललो असेल.. घश्याला कोरड पडली पण कुणाला सांगणार ? अगदी हिप्नोटाईझ झाल्यासारखे चालत होतो आता समोर काय होणार ? आपण घरी पोहचू की नाही ? समोर अंधुकसा उजेड असलेली एक जागा दिसली… आता आम्ही धोक्या बाहेर असल्याची खात्री झाली.. आता इथे थोडावेळ आराम करून सकाळ होईलच मग आपण सुखरूप घरी जाऊ या...
या तंद्रीत असतांनाच एकदम बेडवर धाडकन उठून बसले.. पाहते तर दरदरून घाम सुटलेला.. मी स्वप्न पाहिले का ? स्वप्न असेल तर किती भयंकर स्वप्न होत ते…!! मी झोपेत होते की जंगलात ? विचार करूनच अंगावर काटा उभा राहिला..आम्ही अशी रात्र काढली.. आमच्यासाठी स्वप्नातील ती काळी रात्र खरंच काळीरात्र ठरली ...ती दोन माणसं कोण होती ?या आणि त्यांनी आपली मदत केली …..!! स्वप्नातील ही रात्र पुन्हा कधीच येऊ नये….न विसरणारी जीवघेणी रात्र… कायम स्मरणात राहणारी….!! कधी कल्पनाही न करू शकणारी ….!! हे खरं असेल का ? किंवा होईल का ? यामुळे अजूनच भीती निर्माण झाली कारण खरंच आम्ही ट्रिप ठरवली होती…… आता सर्व तयारीनिशी जायला हवंय.. भरपूर पाणी, पावर बँक, काही खायचे सामान….!!