युद्ध
युद्ध
होती कधी ती कर्मभूमी,
झाली आता रणभूमी
धरले वैर माणसाने माणसाशी ,
अन् गाठ पडली मरणाशी
केला संहार मानवाने,
भरडली मने कोवळी
सीमारेषा पार करिता
दुभागली कुटुंबे सारी,
अन् भंगली सारी स्वप्ने
कोण तयांचा वाली आता ,
कोण तयांचा रखवाला ?
निष्पाप जीवांचे बळी घेऊनी,
जगणे झाले कवडीमोल
तुटले छप्पर , तुटले घरटे,
राख राहिली बाकी मागे
विध्वंस जाहला सारा आता,
अश्रू पुसाया मागे नाही कोणी
युद्ध हे कसले?
मदमस्त उन्मत्ताचे प्रदर्शन हे
राखरांगोळी करूनि सारी,
बेचिराख केली वसति सारी
मानवतेला लावूनि कलंक,
साधले काय ईप्सित मनीचे ?
जखमा कशा भरतील तयांच्या,
आप्तेष्टांच्या वियोगाच्या
होईल अंत युद्धाचा जरी,
व्रण राहतील कायम तरी
आणि
अमानवतेच्या युद्धाचा भोगेल परिणाम दुनिया सारी