सुंदर कवींचे गांव
सुंदर कवींचे गांव
समतेच्या गिरी शिखरावर " कविते " ' फुलावे तुझे गं नाव '
संविधानाच्या मुळात वसावे सुंदर कवींचे गाव ॥धृ॥
सुख शांतीच्या भिंती व्हाव्या भेदास नसावा भाव
विषमतेची घरे नसावी रंक न राहावा राव
निरामय रंगात असते पावित्र्याचा प्रभाव ॥१॥
माणूसकीचा ईश्वर व्हावा श्रद्धेने घ्यावी धाव
पुजा अर्चना रोजच व्हावी सरुन जावी कावकाव
सर्वे भवन्तु सुखिन: याचा करु चला वर्षाव ॥२॥
मी खरा तु विटाळा असे खेळू नका डाव
संस्कृतीला पडेल काळीमा सांदू नका असे घाव
मी अवघा अन् तु दुबळा थांबवा हा लपंडाव ॥३॥
दंभ ठेऊ नका मेंदूमध्ये त्यास करा मज्जाव
सत्य वसावे सूर्यासारखे असत्याचा होई पाडाव
धर्म न यावा आड कुठेही हृदयाचा घ्यावा ठाव ॥४॥
सूड बुद्धीची नसो कामना प्रेमाचा करु जमाव
साहित्यीकांनो माणूस कमवावा दुजास सांगा कमाव
तुका अमुचा ऐक्य सांगतो लागो सकलांशी लगाव ॥५॥