पत्रांची व्यथा
पत्रांची व्यथा
आज विषय निघालाय
म्हणून येथे जमलोय
मी पोस्टकार्ड, हा लिफाफा
आणि हे आंतरदेशीय
खूप दिवसांपासून
मनातल बोलावं वाटतंय
वाटून द्यावं दुःख सार
अन् मोकळं व्हावं वाटतंय
किती सुंदर होते ते दिवस
जेव्हा आम्हाला वापरलं जायचं
मनातल्या भावना हळुवार लिहत
आपल्यांना पाठवील जायचं
कधी दुःख कधी आनंद
कधी प्रेम पत्र व्हायचो
कित्येकदा तुमच्या अश्रूंनी
आम्ही ही भिजून जायचो
आता मात्र आमची जागा
सोशल साईट्स ने घेतली
प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेत
आणि विसरत चालली लेखणी
पत्रांच्या उत्तराची वाट बघण्याची
ती हूरहूर आता संपत चालली
डिजिटल जगात जगणाऱ्यांची
बहुतेक भावनाही आता डिजिटल झाली
क्षणात यामुळे जुळतात नाती
क्षणात उध्वस्त होतात
कारण आता एका बटणेवरच
साऱ्या गोष्टी डिलीट होतात
तुमच्या डिजिटल शब्दांना
का कुठला गंध असतो ?
एखादं जुन पत्र वाचून बघा
त्यावर अजूनही ...
आठवणींचा दरवळ असतो...!