प्रवास वर्णन
प्रवास वर्णन
' शेगाव दर्शन 'प्रवास वर्णन
शुक्रवार दिनांक 7- 4 - 023 रोजी सकाळी सहा वाजता शेगाव कडे प्रस्थान केले खूप दिवसांच्या इच्छेनंतर अगदी अचानक मनात विचार आला आणि शेगाव जाण्यासाठी सर्व मैत्रिणी तयार झाल्या .जोपर्यंत महाराज गजानन स्वामी बोलवत नाहीत तोपर्यंत कितीही प्रयत्न करा त्यांच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाहीत. परंतु अगदी सगळ्यांनाच तीव्र दर्शन इच्छा झाली आणि महाराजांचे बोलवणे आले. ही गोष्ट म्हणजे निव्वळ भाग्यच. अगदी चार पाच दिवसातच निर्णय झाला आणि अखेर सर्वजणी निघाल्या गजाननाच्या दर्शनाला.
सकाळी सहा वाजता नगरहून गाडी निघाली घोडेगाव मार्गे औरंगाबाद ,वेरूळ, भद्रा मारुती दर्शन घेऊन पुन्हा औरंगाबाद मार्गे शेगाव कडे कुच केले .प्रवासात सावली आणि रसाची सोय पाहून जेवणासाठी गाडी थांबवली .फ्रेश होऊन सर्वजणींनी छान गार सावलीमध्ये डब्यांवर यथेच्छ ताव मारला .वेगवेगळ्या भाज्या ,खाऊ यांनी पोटोबा गच्च झाले. त्यावरून रसाचा शिडकावा करण्याचा मोह काही आवरला नाही. आता मात्र सगळ्याजणी च्या गाड्या एवढ्या फुल झाल्या होत्या की गाडीत बसल्यावर अवघ्या पाचच मिनिटात सर्व गाड्या निपचीत पडल्या होत्या. आवाज होते फक्त श्वासांचे .अशा शांततेत अगदी सर्व सालस असणाऱ्या सख्या शेगाव कडे धाव घेत होत्या. बस मध्ये एवढी शांतता पसरली होती की गाडी नेमकी कुठपर्यंत आली तेही समजत नव्हते .रस्ता काही उरकत नव्हता .कारण उत्सुकता लागली होती ती महाराजांच्या पावन भूमीला स्पर्श करण्याची. रस्त्यात मधून मधून पान वारा तर कधी पावसाचा छान फवारा अनुभवायला मिळत होता. हवेत छान गारवा निर्माण झाला होता. खरंतर खूप तीव्र उष्णतेच्या विभागात आपण चाललो आहोत याचं खूप टेन्शन होतं परंतु जबरदस्त इच्छाशक्तीने त्यालाही हरवले आणि छानच सुखद गारवा अनुभवायला मिळाला. संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान शेगावच्या भूमीत पोहोचलो आणि आनंदाला पारावार राहिला नाही. परंतु जोरदार पावसाने सर्वांचीच थोडीशी धावपळ चालली होती. विसावा भक्त निवास च्या आवारात गाडीने प्रवेश केला आणि लक्षात आले की आजचे चित्र काही वेगळेच आहे .खूपच गर्दी असल्याचे जाणवले. त्यामुळे गाडीतून उतरल्याबरोबर पहिले निवासाची सोय पाहण्यासाठी पळालो. थोड्याशा प्रतीक्षेनंतर महाराजांच्या पावनभूमीत राहण्याची व्यवस्था झाली .हेडाऊ नरेश साहेब यांनी ती करून ठेवली होती .ही देखील महाराजांचीच कृपा म्हणावी लागेल. सर्व मैत्रिणी अगदी आतुरतेने वाट पाहत होत्या. पावसात पळापळ चालू होती. मैत्रिणींच्या जवळ पोहोचलो आणि सर्वजणी भक्त निवास क्रमांक तीन मध्ये निवासासाठी गेलो .ढगांचा गडगडाट आणि खूप विजा असल्यामुळे खूप इच्छा असूनही महाराजांच्या दर्शनाला रात्री जाता आले नाही. रूमवरच फ्रेश होऊन जेवण केले. एक फेरफटका मारून पुन्हा निवासस्थानी आलो .सर्वजणी एकत्र येऊन खूप सार्या गप्पा मारल्या .अगदी मनमुरात हसणे झाले आणि रात्री बारा वाजता झोपण्यास गेलो कारण सकाळी पुन्हा दर्शनाला जायचे होते. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे तीन वाजताच सगळ्या उठल्या सर्व क्रिया कर्म होऊन पाच वाजता महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेलो .अगदी शांत प्रसन्न वातावरणात ब्रह्म मुहूर्तावरच दर्शन झाले हे खूपच भाग्याचे ठरले .ध्यानमंदिर तर प्रसन्नतेच्या परिसिमेच्या कितीतरी पुढे आहे असे होते. खूप निवांत ध्यान मंदिरात बसून राहिलो त्या प्रसन्न भूमीतून पाय निघत नव्हता.
परंतु पुढील नियोजनामुळे तेथून पुन्हा भक्त निवास मध्ये जाण्यासाठी निघालो. प्रसाद आणि इतर खरेदी करून फोटो काढून बस मध्ये बसलो .विसावा मध्ये येऊन पुन्हा फोटो काढले. आणि जड अंतकरणाने विसावा सोडले. आता आमचे प्रस्थान होते पुढील आकर्षण लोणार सरोवर पाहणे. प्रवासात मध्ये चहा नाश्ता करून लोणारच्या दिशेने निघालो. दहाच्या दरम्यान लोणार ला पोहोचलो .एक गाईड घेऊन सरोवर आणि परिसर पाहून फोटो काढले. फलाहार घेतला. आणि पुन्हा गाडीत बसलो. ते जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा येथे जाण्यासाठी .जिजाऊ उद्यान हे सिंदखेडराजा या गावांमध्ये आहे आणि ते विसरून गेल्यामुळे माझ्याकडून ते बघणे राहून गेले. त्याबद्दल खूप हळूहळू वाटली. जिजाऊ सृष्टी देखील खूपच उदास वाटली पूर्वीचे वैभव तिथे काहीही नव्हते त्यामुळे ही वाईट वाटले. अशा द्विधा मनस्थितीत गाडीत बसलो ते घराच्या ओढीने. रस्त्यात जेवणासाठी खूप हॉटेल शोधले औरंगाबादच्या जवळ एक छान हॉटेल भेटले. जवळपास चारच्या दरम्यान जेवण केले.आणि पुन्हा प्रवासास सुरुवात केली. देवगड जाण्याचा प्रस्ताव सर्व मैत्रिणींनी एकमताने मंजूर केला. छान देवगड दर्शन झाले आणि सर्वजणी सुखरूप रात्री दहापर्यंत आपापल्या घरी पोहोचल्या गजानन महाराजांना कोटी कोटी प्रणाम