कँडल मार्च
कँडल मार्च
केली असती मीही कविता
लिहिलीसुद्धा असती कथा ,
पण अफाट दुःख सोसणाऱ्या
ताईची कशी मांडली असती व्यथा !!
आपणच सारे निलाजरे
काहीच नाही कामाचे ,
झाला एखादा बलात्कार की
राहतो उभे मेणबत्या घेऊन बिनकामाचे !!
अशा नराधमांना आपण
का नाही देऊ शकत शिक्षा ?
का स्त्रियांना रक्षणासाठी
सतत मागावी लागते भिक्षा ?
कधी थांबणार हे सगळं
असे लचके तोडण्याचं काम ?
कधी मिळणार स्त्रियांना
वासनेच्या विळख्यातून आराम ?
अजून किती बलात्कार आपण
असे उघड्या डोळ्यांनी पहायचे ?
की काहीच नाही करता येत म्हणून
फक्त कँडल मार्च काढत रहायचे ?