कारण तो शेतकरी आहे
कारण तो शेतकरी आहे
त्याला मिळत नाही हजार कोटींचं कर्ज
हजारावर किती शून्य दिल्यावर कोटी होतात
हेच मुळी त्याला माहीत नसतं
त्याला मिळत नाही कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ
कर्ज फेडण्यासाठी कर्ज तर मुळीच नाही
त्याला मिळतात फक्त नोटिशीवर नोटिशी
हजार-पाचशेचं कर्ज बुडवून तो होऊ नये फरार म्हणून
व्हीसा, पासपोर्ट हे शब्द पडू दिले जात नाही त्याच्या कानावर
त्याच्यासाठी जाहीर होते नुकसान भरपाई
ती तर मिळत नाहीच कधी
नुकसान मात्र गॅरेंटीने होते
त्याचं कर्ज माफ व्हावं म्हणून
केले जातात संप, काढले जातात मोर्चे
प्रत्यक्षात कोणाचं कर्ज माफ होतं
हे त्याला कधी कळू दिलं जातं नाही
त्याच्यासाठी घोषित केलं जातं पॅकेज
तेही कागदावरच
जीवंतपणी मरणयातना भोगत असताना
त्याच्यासाठी कोणाकडे नसतो वेळ
त्याच्या विधवेसोबत चेक घेऊन फोटो काढण्यासाठी मात्र
सगळेच दीनदयाळ गोळा होतील