व्याकुळ
व्याकुळ
दुपारचं टळटळीत उन पडलं होत. लेकराला काखोटी ला बांधून अम्मा डोक्यावर पाटा वरवंटा ठेऊन ती ओरडत होती. " पाटा घ्या, वरवंटा घ्या. "
तहानेने जीव व्याकूळ होता. आसपास घर होती, बंगले वजा. सर्व दरवाजे बंद आणि सामसूम ही होती.
एका बंगल्या समोर एक मोठा वृक्ष होता. त्याच्या सावलीत ती बसली. पोराला ज्या चादरीने बांधल होत, ती चादर खाली टाकली आणि त्यावर ठेवलं. ते खुशीने हात पाय मारायला लागल, ते बघून तिला हसू आल.
घाम पुसला, थंडगार हवेची झुळुक आली आणि तिला बर वाटलं. तिने इकडे तिकडे पाहिलं तर आसपास बरीच झाड होती. मोठे मोठे बंगले, छान सजवलेले. माणसं एवढी श्रीमंत कशी होतात, तिला प्रश्न पडला.
नशीब आणि काय? असा विचार करत कुठे पाण्याचा नळ दिसतोय काय, तर ते बघायला लागली.
तेवढ्यात समोरच्या बंगल्यातून छान साडी नेसलेली, गोरी पान बाई तिला हाक मारताना दृष्टीस पडली.
" अहो ताई. इकडे बघा. या इथे या.माझ्या घरात." अस म्हणत राधिकाने बंगल्याच्या छोट्या गेटची कडी उघडली.
अम्मा जरा गोंधळली. एवढ्या मोठ्या बंगल्यातील बाई आपल्याला का बोलवतिय. अस तिला वाटल. पाणी पाहिजे होत म्हणून ती लेकराला घेऊन गेट जवळ गेली.
" ताई. आत ये. मी आज सवाष्ण जेवायला बोलावली होती. ती आत्ताच जेऊन गेली. तुला ही जेवण आणते. इथे ओट्यावर बस. " अस म्हणत ओट्यावरचा पंखा सुरू करत राधिका आत गेली.
आता तर चादरीवर टाकलेलं बाळ अजून जोरात हात पाय मारायला लागल.
राधिका आतून जेवणाच भरलेलं ताट आणि थंड पाण्याने भरलेल तांब्या भांड घेऊन आली.
समोरच्या नळाकडे बोट दाखवत राधिका म्हणाली, " हातपाय धुवून घे तिथून."
गार पाण्याचे हबके तोंडावर मारल्यावर अम्माला खूप बर वाटलं. पदराचा काही भाग गार पाण्याने तिने ओला करून घेतला आणि ओट्यावर येऊन लेकराचं तोंड, हात पाय पुसून घेतल.
" जेव आता." राधिका प्रेमाने बोलली.
जेवता जेवता अम्मा बाळाला पोळी, वरण भात भरवत होती. तो ही आनंदाने जेवत होता. जेवण झाल्यावर हात जोडत अम्मा बोलली, " जेवण लई झकास हाये."
जेवण झाल्यावर तिने अजून एक थंड पाण्याचा तांब्या मागितला आणि घटाघटा प्यायला.
" खर तर लई थान लागली होती ताई. तुम्ही थान, भुक भागवली माजी. पन मला.का बोलावल जेवायला? " अम्मा ने आश्चर्याने विचारलं.
" अग. मी अस नेहमी करते. नेहमी सवाष्ण बोलवते, तेव्हा त्या दिवशी अजून कोणी कष्ट करणारी ताई दिसली की तिलाही जेवायला घालते. तेवढाच आराम तिला. थांब ह.." अस म्हणत राधिका आत गेली.
आतून ओटीच सामान घेऊन आली. साडी, नारळ, तांदूळ अस सगळ ओटीच सामान आणल.
अम्माची ओटी भरली. बाळाला खाऊ, कपड्यासाठी पैसे ही दिले.
" लई भल होईल ताई तुझ. ह्या व्याकूळ आत्म्याला आज तू शांत केलस. "
अस म्हणून मनापासून राधिकाला आशीर्वाद देत, बाळाला परत चादरीने काखोटीला बांधत, अम्मा रस्त्यावरून " पाटा, वरवंटा घ्या ताई" अस म्हणत चालू लागली.
(समाप्त)