काळी आई
काळी आई
आज अचानक काळे ढग आकाशात भरून आले. भैरू आभाळाकडे बघत चिंतेने ग्रासून गेला होता. भाताच पीक कापणीला आल होत. कालच अजून चार पाच कामगारांना कापणीला बोलावलं होत. पण सगळीकडे काम सुरू असल्याने कोणी कामाला आल न्हवत.
पाऊस पडला तर उभ पीक पाण्यात जाऊन हातात चार पैसे ही मिळणार नाहीत, हीच चिंता त्याला सतावत होती.
" देवा.. दया कर रे बाबा. आत्ताशी कुठे मागच्या कर्जातून वर आलोय. आता परत कर्ज बाजारी करू नकोस." अशी विनवणी तो करत होता.
रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळ झाली तशी पटपट आवरून माणस शोधायला बाहेर पडला. थोडे पैसे जास्त मागत होते, तरी देतो म्हणून त्याने माणसं आणली.
दोन दिवसात कापणी झाली. मग बाकीची काम ही झाली. तांदूळ पोत्यात भरून ठेवला. पाऊस आलाच तर पाणी गळून तांदुळाची पोती खराब होऊ नये म्हणून सगळी व्यवस्था केली.
ट्रक बोलावून त्यात पोती चढवून बाजार समितीला घेऊन गेला. तिथे खूप घासाघीस करून सगळा माल विकून दुसऱ्या दिवशी गावी परत आला.
गावाच्या वेशी पाशी आला, तर जोरात पाऊस पडत होता. त्याच्या आधी कुठेच पाऊस नाही. इथे मात्र चांगलाच जोर धरला होता.
ज्यांची कापणी झाली नाही, त्याची शेत पावसाने आडवी पडली होती. सगळा चिखल झाला होता. शेतकरी उर बडवत भर पावसात बसले होते. काहींची कापणी झाली म्हणून वाचलो म्हणत देवाचे आभार मानत होते.
भैरु घरात शिरला तो चिंब ओला होऊनच. आल्या आल्या त्याने खिशातले पैसे बाहेर काढले आणि वाळवायला ठेवले.
आपण वाचलो म्हणून देवाचे आभार मानावेत का बाकीच्यांची वाट लागली म्हणून दुःख करावं. काही सुचत नव्हत.
" हा घ्या चहा " त्याची बायको चहाचा कप आणि खारी पुढे ठेवीत बोलली.
" तू घाई केली म्हणून आपल शेत वाचलं ग विमले. मी तर थांब, पैसे जास्त मागतायेत म्हणत होतो. पण तू सुचू कुठे देतेस काही. नुसती भुणभुण." भैरू तक्रार करत आणि तरीही हसत बोलला.
" काय बोलू? त्या राम्याची बायको ही मागे लागली होती त्याच्या. दोन पैसे वाचतील म्हणून उद्या कापणी करू म्हणाला. वाईट झाल बघा पण." विमल बोलली.
" आता तो पंचनामा कधी होणार? पैसे कधी मिळणार? सगळीच पंचाईत..त्यात ही तुझी माणसं, माझी माणसं आहे की." मागच्या वर्षीच सगळ दृश्य तिच्या डोळ्यासमोर आल.
ते साहेब येणार , त्यांना कोंबडी खायला घालायची. पैसे नसले तरी उधारी करून खायला घालायची. बाबा पुता करायचं तेव्हा पैसे मिळणार. इतका त्रास. बर चिडून ही काही उपयोग नाही. निर्लज्ज जमात ती.
ह्यावर काही तरी उपाय काढला पाहिजे. दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला.
सर्वांनी एकत्र येऊन काही तरी केलं पाहिजे. बैठक बसली. कापणी करायला इथे कामगार नाही मिळाले तर दुसऱ्या गावातून आणायचे. पण कापणी
लांबवायची नाही. आपणच एकमेकांना मदत करायची. आता सरकारी माणसं आली की त्यांच्या सोबत दोन चार जणांनी रहायचं. प्रत्येकजण स्वतः पुरत बघत म्हणून तर अस होतंय. एकत्र आलो की सगळी समस्या संपते.
काळया आईला हा भेद मंजूर नाही. तिला वाटत सर्व लेकरांनी एकत्र यावं.
सरपंच म्हणाले, " काय? राहायचं का एकीने? "
" हो" सर्व जण एकसाथ बोलले आणि सरकारी माणसांची वाट पाहू लागले.
समाप्त