स्वातंत्र्य मनाचे
स्वातंत्र्य मनाचे
आई पाणी आणायला गेल्याबरोबर दिप्तीने कपाटातून बाबांची पँट आणि शर्ट काढले.तिच्या नजरेत एक आनंद एक बावरलेपण होते."काहीतरी चुकीचे करतो आहोत आपण??..नाही नाही हेच तर मला हवे आहे"."अग,पण लोक काय म्हणतील?? कुणी बघितले तर?!!"तिच्याच अंतर्मनाशी तिचा असा झगडा हल्ली रोजच होत असतो.
शाळेत सातवीच्या मुली एकमेकांशी कुजबुजत लाजत,उगीचच हसत एकमेकांच्या कानात काहीतरी पुटपुटत असतं.दीप्ती त्यांच्यात जरा वेगळी होती .म्हणजे ती त्यांच्यात असायची पण तिला लाजणं उगीचच हसणे हे काही जमायचे नाही,उलट त्या मुली लाजल्या की तिला ते प्रचंड आवडायचे.त्यांच्या कडे बघत रहावे असे वाटायचे.पण का कुणास ठावूक ती उगीचच कानकोंडी व्हायची.लगेच उठून दुसरीकडे निघून जायची.तिची मैत्रीण सुधा तिला नेहमी समजून घ्यायचा प्रयत्न करायची.पण स्वतः दिप्तीलाच काय चालले आहे हे कळत नव्हते तर ती सुधाला काय सांगणार? एक दिवस सुधा शाळेत आली नाही,दिप्तीला तिच्याशिवाय करमायचे नाही.त्यामुळे तिला काय झाले असेल ह्याचा विचार करतच ती तिच्या घरी गेली.सुधा आत खोलीत झोपली होती. हि आत जायला लागल्याबरोबर काकूंनी जोरात हाक मारून म्हंटले,"आत नाही जायचे आता चार दिवस ,तुला हवे तर खिडकीतून बोल तिच्याशी."हिचे डोके फिरले, काहीतरी उलट झणझणीत बोलावे असे तिला वाटले .पण त्यापेक्षाही महत्वाचे तिला सुधाला भेटायचे होते,त्यामुळे ओठा वरचे शब्द आत ढकलून ती बाहेरून खिडकीत आली.सुधा खाली जमिनीवर सतरंजी टाकून झोपली होती.कोकणातील थंडीत सुधा अशी खाली झोपलेली बघून हि चा खाली सरकलेला पारा एकदम वर गेला."अग मूर्ख बाई,खाली काय झोपली आहेस?बरे नाही आहे ना तुला ,आणखी तब्येत बिघडली तर काय करशील?उठ आधी .आणि काही खाल्ले आहेस का सकाळपासून???"तिच्या प्रश्नांच्या भडीमाराने सुधा पटकन उठली.सावकाश चालत खिडकीजवळ आली.आणि तिला बघून अशीच उगाच हसली.दीप्तीला काय बोलायचे तेच कळले नाही.त्यामुळे तिथून तिरमिरीत ती घरी निघून आली.रागाने दोन दिवस शाळेत पण गेली नाही, मात्र सुधा जेव्हा घराबाहेर येऊन उभी राहिली तेव्हा तिचा नाईलाज झाला. नदीजवळ बसून एक एक दगड पाण्यात टाकत सुधा शांत बसली होती.,"आता बोलणार आहेस की जाऊ मी ? डोक्यात जाऊ नकोस हा कधी बोलणार नाही तुझ्याशी.""अग अग,अशी चिडू नको सांगितल्यावर तूही लाजशील माझ्यासारखी." "काहीतरी मुर्खासारखे बोलू नकोस ,मी काय मुलीसारखी लाजणार बिजणार नाही ."काही कळण्या आधी तोंडातून गेलेल्या शब्दांचे तिला भयंकर आश्चर्य वाटले.सुधा तर भूत बघावे तशी बघायला लागली.लागलीच स्वतः ला सावरत ती म्हणाली,अग म्हणजे मी शूर मुलगी आहे तुमच्या सारखी लाजाळू नाही."विषय संपवत ती घरी निघाली.हल्ली हे काय होते आहे मला,काहीतरी वेगळे घडते आहे माझ्या आयुष्यात,पण काय? मुलींकडे बघायला आवडते,दादाचे बाबांचे कपडे घालावेत असे वाटते.सगळे पुरुष जे करतात ते करावेसे वाटते,धुंदीत जगावे बेफिकीर .कशाचीही तमा न बाळगता.पण मग आई इतकी बंधन घालून मला बांधून का ठेवते? उत्तर नव्हतीच आणि प्रश्नाचे मोहोळ वाढतच चालले होते.
आठवीत असताना तिला पाळी आली आणि आईने अक्षरशः निःश्वास सोडला.पण हिची घुसमट वाढत चालली होती.नको त्या शरीरात आपण अडकले आहोत ,आपला जीव गुदमरून जातो आहे असे तिला वाटायचे.हळूहळू तिला ह्या सगळ्याची सवय झाली.पण तरीही मध्येच कुठून तरी एक आवाज तिला अस्वस्थ करी. ग्रॅज्युएशन झाले .आणि घरात तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली.कुणाशी बोलून आपला हा प्रश्न सोडवता येईल तिला कळत नव्हते.खूप धुसपुस आणि प्रसंगी मार,आणि अश्रू ह्या सगळ्यांचा मारा करत तिला लग्नाला उभे करण्यात आले.पहिल्या रात्री तिला नवऱ्याचा स्पर्श उद्दिपित करत नव्हता.पण शरीराने आपले काम चोख केले.लग्नानंतर सुद्धा ती खऱ्या अर्थाने सुखी झाली नव्हती.नवरा चांगला होता .सासर गुणी होते.कशातच दोष नव्हता मग ती का सुखी होतं नाही आहे.तिचे डोके फुटायची वेळ आली होती.नको इतके विचार करून तिला डोकेदुखी सुरू झाली.खूप डॉक्टर करूनही यश येईना.तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले हा काहीतरी मनाचा आजार वाटत आहे मला.तू एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांची मदत का नाही घेत.घरात विषय काढल्याबरोबर धरणीकंप झाला .
नवरा तिच्या विरोधात नव्हता पण त्याची ती हळवी जखमी नजर तिच्या मनाला पाहत यातना देत होती.रात्री जेव्हा ती त्याच्या बरोबर बाहेर झोपाळ्यावर बसली.तेव्हा मनाचा निर्धार करून ती म्हणाली ,"आपण बाहेर जाऊया का ?मला जरा मोकळेपणाने बोलायचे आहे तुमच्याबरोबर."जणूकाही त्यालाही हे सगळे समजून घ्यायचेच होते अशा तऱ्हेने तो पटकन उठला आणि त्याने गाडी काढली.नदीच्या शांत वातावरणात त्याच्या वाढलेल्या श्र्वासाच्या आवाजाचा ही तिला त्रास होत होता.तिने तिला जमेल तसे त्याला समजवायचा प्रयत्न केला.पण त्याला ते काही समजत नव्हते..कंटाळून ती म्हणाली,"हा शेवटचा उपाय मला करू द्या .माझे मन मला कळू द्या .मग मी बाकी काही मागणार नाही."एवढे सोडले तर त्यालाही तिच्यात काही दोष दिसत नव्हता त्यामुळे तोही लगेच तयार झाला. पुढच्या आठवड्यात जेव्हा ते दोघे एकत्र डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरनी त्याला बाहेर बसायला सांगितले.बराच वेळ ती आत होती ,बाहेर आल्यावर खूप धावून आल्यासारखी ती दमली होती.डॉक्टरांनी त्याला परत पुढच्या आठवड्यात या असे सांगितले.घरी येऊन ती शांत झोपली.पण ह्याच्या डोळ्यांमधली झोप जणू रुसून बसली होती. पुढच्या आठवड्यात परत एक सेशन झाले .ह्यावेळी मात्र ती जरा निवळल्यासरखी वाटली.आणि त्याला जरा छातीवरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटले.डॉक्टर म्हणाले ,"सहा सेशन्स झाली आपली आता मला वाटते की पुढचे शेवटचे असेल ".त्याला खूप आनंद झाला येताना त्याने तिला हॉटेल मध्ये नेले.साडी घेतली( त्यावरून तिचा झालेला मूड ऑफ त्याला कोड्यात टाकणारा होता) घरी आल्यावर बऱ्याच दिवसांनी त्याची रात्र फुलली.समाधानाने त्याने तिच्या कडे बघितले .आणि दुसऱ्याच क्षणी तो झोपी गेला.ही मात्र जागी होती पण ही जाग चंचल नव्हती.तर शांत समाधानी होती.जणू काही इतक्या वर्षांच्या अंधारानंतर आलेला तो एक प्रकाशाचा किरण होता तिच्यासाठी.सकाळी उठल्यावर तिने नेहमी प्रमाणे सगळी कामे केली.आणि आई तात्या आणि त्याला हॉल मध्ये बोलावले.सगळे जण आले पण डोळ्यात भले मोठ प्रश्नचिन्ह घेऊनच..
एक मोठा निःश्वास सोडून तिने बोलायला सुरवात केली."लहान पणापासून मला पुरुषासारखे राहावे ,बोलावे वागावे असे वाटायचे.मला पुरुष भुरळ घालत नव्हता तर मुलीला बघून मला आकर्षण वाटायचे.मला माहित होते हे काहीतरी चुकीचे आहे.आई कडे बोलायला गेले तर तिने मला बदडून काढले तीन दिवस उपाशी ठेवले आणि मग मी कायमची शांत झाले.मनाशी झगडा चालू होताच पण तो कुणा पाशी मोकळा करावा हे कळत नव्हते.उशिरा का होईना मला पाळी आली ह्याचा आईने इतका का बाऊ केला हे तेव्हा नाही कळले पण आता उमजले. मानसोपचरतज्ज्ञ यांनी मला समजून घेतले आणि सगळी गुंतागुंत हळुवार सोडवून दाखवली .पहिल्यांदा मीही हादरले ,कोसळले,पण त्यांनीच सांगितलेल्या माहितीवरून सगळी माहिती काढली आणि मग सगळेच सूर्य प्रकाशाईतके साफ झाले.तुम्ही सगळे खूप चांगले आहात, आपले नाते खूप छान आहे .म्हणूनच त्या नात्यावरच्या विश्वासाने मी सांगते की ,काही अपरिहार्य कारणामुळे माझ्या गुणसूत्रात चूक झाली आणि पुरुषाचे मन माझ्या बाईच्या शरीरात आले.त्यामुळे बाकी शरीर जरी बाईचे असले तरी मी अशांत होते .ह्याला शास्त्राच्या भाषेत third gendar किंवा intersex. बाईंच्या शरीरात मी सुखी होऊ शकत नाही.त्यामुळे मला माझीच ओळख नव्याने झाली आहे .आणि आता मी त्या पासून लांब राहू नाही शकत."
.म्हणजे ?????? छक्का???? आई एकदम खालीच बसल्या.तात्या काही न बोलता जमिनीकडे दृष्टी लावून बसले.पण तिचा नवरा मात्र तिला म्हणाला," खूप कठीण आहे हे सगळे कळायला किंवा मान्य करायला पण आपण एकत्र राहू हे सगळे समजून घेऊ ह्यातून काहीतरी मार्ग दिसेल". आपल्या वरच्या त्याच्या प्रेमाने दिप्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.पण लगेच त्याच्या कडे वळून," आई तात्यांची ही प्रतिक्रिया बघूनही तुम्हाला वाटत आहे सगळे नीट होईल?आपले संबंध परत पूर्वी सारखे होतील? आणि कळतंय का तुम्हाला हा आजार शरीराचा नाही आहे मनाचा आहे गुण सूत्रांचा आहे.तो बरा होणार नाही .मला त्यातून मार्ग काढावा लागेल.आणि मला नाही वाटत मी माझ्या साठी तुमचे आयुष्य पणाला लावावे.मलाही नक्की माहित नाही आहे पुढे काय करायचे.मलाही तुमच्या इतकाच धक्का बसला आहे.फक्त तुम्हाला बसलेल्या धक्क्याने तुमचे आयुष्य थांबले ..अगदी काही क्षणा करता का होईना,आणि माझे मात्र मार्गाला लागले.तो मार्ग मलाच शोधावा लागेल .मिळेल की नाही मला माहीत नाही.इतक्या वर्षात मुलीच्या शरीरात अडकलेले पुरुषाचे मन मला स्वतंत्र करायचे आहे .हा स्वातंत्र्याचा चा दिवस मला उपभोगू दे. माझ्या सारखे अजूनही कुणी असतील त्यांचा शोध घेऊन काही प्रश्नांची उत्तरे नाही ,तरी ते सोडवण्याची पद्धत तरी सापडेल.
मला अडवू नका .इतक्या वर्षांनी मला सापडलेले स्वत्व मला उपभोगू दे.त्यासाठी आज माझ्या तुमच्या नात्याचे मी सिमोलंघन करत आहे. माझ्या शरीरातील भावनांचे सिमोलंघन करत आहे.तुम्ही बरोबर यावे असे वाटत आहे ,पण आग्रह नाही.तुम्हाला सुखी होण्याचा पूर्ण अधिकार आहे ." येते मी".
मागे वळून न पाहता दीप्ती पुढच्या प्रवासाला निघाली जो तिलाही माहित नव्हता...
एक नवी स्वातंत्र्याची पहाट तिची वाट बघत होती.