शीर्षक नाते मैत्रीचे
शीर्षक नाते मैत्रीचे
रामू आणि शामू अगदी जीवश्चकंठश्च मित्र. दोघे बरोबर शाळेत जात. अभ्यास बरोबर करत. कधी रामूच्या घरी तर कधी शामूच्या! जिथे अभ्यास तिथेच जेवण होई. उशीर झाला तर तिथेच झोपत, इतका घरोबा दोन कुटुंबात. एक दिवस मात्र शाळेतून दोघे परत आले तर दोघांच्या वडिलांचे बांधावरुन जोरात भांडण चाललेले! अगदी हमरीतुमरीवर येऊन भांडू लागले शेवटी पाटलांनी येऊन कसेबसे सोडवले.
दोन कुटुंबात तंटा झाल्याने संबंध बिघडले. दोघे मागेपुढे शाळेत जाऊ लागले. मोठ्या लोकांत अबोलाच होता. एक दिवस पाटील विचारपूस करायला आले. "काय मिटलं का न्हाय भांडण?" दोघेही गप्प गप्पच!
"तुम्ही चला जरा माझ्यासंगं" असे म्हणून शाळेपासून दूर उभे राहिले. रामू शामू शाळेतून नेहमीप्रमाणे बरोबरच बाहेर पडले. आगदी आरामात गप्पा मारत होते. घर जवळ येताच दोघे मागेपुढे झाले. गप्पा थांबल्या. पाटील म्हणाले, "अरे पोरं किती निष्पाप आहेत बघा. तुमच्यासाठी मागेपुढे करतायत बघा."
दोघा वडिलांच्या डोळ्यांना धारा लागल्या. एकमेकांना मिठी मारुन रडू लागले. शेवटी मुलांच्या समंजस वागण्यानेच भांडण मिटले. दोन कुटुंबात सलोखा निर्माण झाला. सर्वांना आनंद झाला.