रंग पांढरा
रंग पांढरा
शहापूर गाव तसे छोटे,तालुक्याचे पण छान होते.हिरवागार निसर्ग ,एक नदी, शेती डोंगर दऱ्या नी समृध्द.रेणू ला फार आवडले गाव.इथे शांतता होती प्रसन्नता होती.तिनेच मुख्याध्यापकांना सांगून बदली करून घेतली होती इथल्या प्राथमिक शाळेत.
तीन छोट्या रूम चे घर भाड्याने मिळाले तिला. शाळे पासून जवळच होते.आज तिचा शाळेत पहिला दिवस होता .शुभ्र पांढरी कॉटन ची साडी, पांढराच ब्लावूज, साधी एक वेणी, काळी बारीक टिकली आणि दोन्ही खांद्या वरून घट्ट लपेटून घेतलेला पदर.रेणू शाळेत आली सह शिक्षक आणि मुख्याध्यापकांना भेटली.पाचवी आणि सातवी चे वर्ग तिला दिले.
महिना झाला रेणू या शाळेत आणि गावात ही छान रुळली.रेणू रोजच पांढरी साडी नेसून शाळेत जात असे.ती विधवा आहे हे आता पर्यंत सर्वांना समजले होते पण म्हणून आज च्या काळात कोण इतके पाळते आजकाल विधवा ही सगळ्या रंगाचे कपडे वापरतात.मग ते शहर असो वा खेड.पण रेणू याला अपवाद होती.
रेणू,अग शाळेचे स्नेहसंमेलन असते आता दिवाळी नंतर.तू काही तरी तुझ्या वर्गा तील मुलां साठी नाटक किंवा नृत्य बसव.आणि हो स्नेह संमेलना साठी सगळ्यांनी निळ्या रंगाची काठ पदर साडी नेसायची आहे.तुला सुद्धा.रेणू सोबत ची सहशिक्षिका आरती म्हणाली.
आरती मी बसवेन काहीतरी कार्यक्रम पण ते साडीच नाही जमणार मला.
रेणू अग कुठल्या जमान्यात राहतेस तू? अजून तू तरुण आहेस,तुझ्या ही काही इच्छा अपेक्षा असतीलच ना? पांढरी साडी का म्हणून तू नेसतेस? आयुष्यात इतर रंग ही आहेत ग त्याचा वापर कर.अस जगाशी तोडून का वागतेस आरती म्हणाली.
आरती मला नाही जमणार ग.ही पांढरी साडी च माझ्या साठी ठीक आहे .रेणू चे डोळे भरून आले.
रेणू काय झालं मला सांगशील . बोल,मन हलक होईल आरती तिला घेवून बाहेर आली.शाळेच्या आवारात बाका वर त्या बसल्या .
आरती मी बी ए बी एड केले आणि माझे लग्न ठरले लगेच निशांत सोबत .निशांत कोर्टात लिपिक होता .मला तो खूप आवडला होता त्याला ही मी पसंद होते.दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होतो. निशांत ची आई वडील बहीण सगळे खुश होते.खूप सुंदर दृष्ट लागेल असा आमचा संसार सुरू होता .मी नोकरी ही करत होते.एक दिवस माझ्या दंडा वर एक पांढरा डाग आला.अगदी छोटा.मी निशांत ला तो दाखवला .तो म्हणाला,रेणू आपण डॉकटर कडे जावू पण त्या आधी बघू तो डाग आपोआप जातो का?
मग मी ही त्या डागा कडे दुर्लक्ष केले . कालांतराने तो डाग मोठा झाल्याचे मला दिसले.मी खूप घाबरले हा डाग म्हणजे कोड तर नसेल ना? .निशांत ने आई ला त्या डागा बद्दल सांगितले.तशा आई म्हणाल्या ,अरे निशांत हा डाग म्हणजे कोडच आहे.आपली फसवणूक केली रेणुका च्या आई वडिलांनी.त्यांच्या घराण्यात असा डाग कोणा ला तरी असेल.हे काही चांगले लक्षण नाही आता अंगभर कोड फुटेल.
आई अग अस काही नसते आणि तो डाग कोड नसेल पण.मी रेणू ला डॉकटर कडे नेतो.निशांत आई ला समजावत बोलला.
मला मात्र आई चे शब्द मनाला डागण्या देत होते .
आम्ही दोघं हॉस्पिटल मध्ये गेलो डाग एकदम मोठा रुपया सारखा झाला होता.चेक केले तर तो कोड च होता.मी पूर्णपणे हादरून गेले. अहो,आमच्या घरात कोणाला असा डाग नाही ओ,पण मला कसा आला नाही माहित.
रेणू अग नको काळजी करू आता मेडिकल सायन्स किती पुढे गेले आहे.काहीतरी उपचार असेलच ना यावर निशांत ने माझी समजूत काढली.
घरी आलो आई ला सांगितले.तशा त्या जाम भडकल्या.रेणू ला आताच्या आता माहेरी सोडून ये अस निशांत ला म्हणाल्या.
आई मी अस काही ही करणार नाही.रेणू माझी बायको आहे.ती जशी आहे तशी मला प्रिय आहे.
मग आई आणि निशांत मध्ये खूप वाद झाला मी माहेरी जायला तयार झाले पण निशांत ने जावून नाही दिले.
आई आता माझ्या सोबत बोलत नव्हत्या.एक महिना झाला होता.माझे औषधोपचार सुरू होते पण काही फरक दिसत नव्हता.
एक दिवस घरी येत असताना निशांत चा अपघात झाला.आणि जागेवरच तो गेला.आई ने सगळ खापर माझ्यावर फोडले."तू पांढर्या पायाची कोड असलेली निघालीस आणि माझ्या मुलाला गिळलेस,आता तुझे समाधान झाले असेल तर निघ या घरातून.माझ्या सासू ने मला हाकलून दिले.
हे खूप वाईट झालं ग रेणू.
हो आरती.तेव्हा पासून ही पांढरी साडी मी वापरते.निशांत शिवाय आयुष्याला काहीच अर्थ नाही.कसले रंग ही नाही उरले.हा पांढरा रंग मला मनाला संयम घालतो.भावना,आकर्षण यापासून दूर ठेवतो.एक प्रकारची विरक्ती च मी या पांढऱ्या रंगा तून घेतली आहे.मला प्रसन्न आणि शांत वाटते ग या साडीत.मला फक्त निशांत च्या आठवणीत जगायचे आहे.मला नको जगाचे रंग.माझ्या पांढऱ्या रंगात मी खुश आहे.आणि आरती हे बघ,म्हणत रेणू ने आपला दंडा वरचा पदर बाजूला केला .एक मोठा पांढरा कोड तिथे होता. जगाला हे दिसू नये म्हणून मी घट्ट पदर लपेटून घेते आरती.
डोळ्यातले पाणी पुसत रेणुका आपल्या वर्गा कडे निघून गेली.
पाठमोऱ्या जाणाऱ्या रेणू ला बघत आरती स्तब्द्ध उभी होती.