रक्तपिपासू (भाग ३)
रक्तपिपासू (भाग ३)
नेहाने अभयला पाणी दिले..ती पुढे काय ऐकायला मिळेल याची तिला उत्सुकता होती..अभयला ही लवकरात लवकर सगळे सांगून इतक्या वर्षांत जे गुपित त्याने मनात दाबून ठेवलेलं ते मोकळे करायचं होतं..
तो पुढे बोलू लागला,"आम्ही श्रीरंगपूरला जायची तयारी केली..मी लग्न झाल्यानंतर स्वतंत्र खोली घेतली होती..कारण मला सुमनला मामांकडे जास्त दिवस ठेवायचं नव्हतं..आधीच खूप उपकार होते त्याचे माझ्यावर..
असो, मी जायच्या आधी मामाला सगळी कल्पना दिली..तो तर सुमनला ठेवून जा..असेही म्हणत होता..पण सुमन पुढे माझा नाईलाज झाला..
माझी लहानपणीच आजोळी रवानगी झाल्यामुळे मला गावाचा तितकासा परिचय नव्हता..म्हणून काकाने घराचा पत्ता, आणि हा फोटो आणि काही खाणाखुणा पत्रात लिहून दिलेल्या..मला दिवसा यायला सांगितले की, मला रात्रीचं नीट रस्ता कळणार नाही..कारण आपला वाडा गावाच्या थोड्या आडबाजूला होता..मी व्यवस्थित पत्र वाचून गावाच्या दिशेला निघालो..
माझ्या आयुष्याचा तो तुझ्या आईबरोबरचा अखेरचा आनंदी आणि मजेचा प्रवास ठरला..मला अजूनही आठवतंय, आम्ही पहाटे निघायचा निर्णय घेतला..सुमनच्या या अवस्थेमुळे मी आरामात गाडी चालवत होतो..ते हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे मस्त, थंड असे वातावरण चहूबाजूला होतं..आम्ही दुपारपर्यंत श्रीरंगपूरच्या वेशीवर आलो..पुढे गावात कच्चा रस्ता सुरू झाला त्यामुळे मला गाडी काळजीपूर्वक चालवावी लागत होती..गाव तसे फार मोठे नसले तरी २५-३० घरे होती गावात..आतापर्यंत गावाबद्दल मामाकडून ऐकत आलो होतो..पण लहानपणानंतर जाण्याची ही पहिलीच वेळ..
काकाने सांगितल्याप्रमाणे खाणाखुणा बघत मी घराकडे गाडी नेत होतो..
पण कोणास ठाऊक मला पुढे रस्ता सापडेनाच..माझ्या आजोबांचा गावात खूप दरारा होता हे मी ऐकले होते आणि आपले घराणे खूप श्रीमंत होते त्यावेळेच..त्यामुळे सहज कोणीही घरचा रस्ता दाखवेल असा माझा अंदाज होता..गावात घर पण लांब लांब होती आणि दुपारची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती..मी कोणी दिसतंय का असं बघत पुढे गाडी चालवत होतो. इतक्यात एका घराजवळ २-३ माणसे मला बसलेली दिसली..मी त्या घराजवळ गाडी थांबविली आणि त्या लोकांजवळ पोहोचलो..त्यांच्यापैकी एका इसमाला वाड्याबद्दल विचारले, तर त्याचा चेहरा एखादे भूत बघावे तसा झाला आणि तो चक्क राम राम म्हणत तिथून पळाला..आणि त्याच्याबरोबर असणारे ही असेच दूर पळू लागले..मला काहीच समजतं नव्हते..
मी पुन्हा गाडीत बसलो आणि गाडी पुढे नेण्याचा विचार केला..तिथे थांबण्यात अर्थ नव्हता..म्हंटल आता स्वतःच वाडा शोधावा लागेल..त्यावेळेला कुणास ठाऊक कसे पण माझ्या मनात सारखा हाच विचार येत होता की, सुमनला मी इथे आणायला नको होतं..
सुमनला माझा चेहरा बघून थोडी चिंता वाटली पण मला तिला आता घडलेल्या घटनेबद्दल काही सांगायचे नव्हते म्हणून मी तिला म्हणालो, "अग, उगाच उतरलो मी गाडीतून..हे काय ५-१० मिनिटांवर तर घर आहे आपलं." तिला ही ते खरं वाटलं.
मला लवकरात लवकर तिथून पुढे जायचं होतं..एव्हाना दुपारचे 3 वाजले होते..आम्ही खात-पित मजा करत हा प्रवास केला होता..त्यामुळे इतका प्रवासाचा थकवा अजून तरी जाणवत नव्हता..इतक्यात सुमनला झोप लागली..
त्यामुळे कदाचित पुढे घडलेला प्रसंग तिने पहिला नाही..
मला रस्त्याच्या कडेने एक माणूस चालताना दिसला..तो थोडा वयस्क होता म्हणून मी गाडी थांबवली आणि गाडीतून उतरून त्या म्हाताऱ्या बाबांना हाक मारली..ते लगेच होते तिथेच थांबले..मग मी त्यांना मी या गावात नवीन आलोय आणि रस्ता चुकलोय असे सांगितले..मी त्यांना लागलीच वाड्याकडे जायचा रस्ता विचारला. त्यावर ते ही असेच भांभावले. पण तेवढ्यात त्यांची नजर गाडीत झोपलेल्या सुमनकडे गेली आणि कसं कोणास ठाऊक पण त्यांना माझी दया आली.
ते म्हणाले, "कुठचा तू आणि तुला तिथं कशापायी जायचंय. हे बघ पोरा माझं ऐक आणि जिथून आलास तिथं परत जा..ती जागा लय वंगाळ हाये..जो कोण भी त्या वाड्याच्या आसपास भी जातोय ना तो परत कधीच दिसत नाही..माझ्यासारख्या जाणत्याच ऐकशील तर माघारी फीर पोरा..तिथं काय हाय कोणाला माहीत नाही पण ती जागा लय वंगाळ हाय." पण मी काही केल्या ऐकत नव्हतो.
मग मी त्यांना माझी खरी ओळख सांगितली तसे ते थोडे चकित झाले..आणि पुढे काही न बोलता त्यांनी मला रस्ता दाखवायचं मान्य केलं..
मी त्यांना गाडीत पाठीमागे बसवलं..वाडा खरचं गावाच्या आडबाजूला होता. त्याने पुढचे एक वळण सांगून तो म्हातारा गाडीतून उतरला आणि त्याने आम्हाला दोघांना आशीर्वाद दिला. मी गाडी सुरू करणार तेवढ्यात त्याने मला हाक मारली आणि त्याच्याजवळ एक पुडी होती ती त्याने मला दिली आणि म्हणाला "पोरा,कायमस्वरूपी तुझ्याकड ठेव. देव तुझं रक्षण करो" असे बोलून तो निघून गेला..
काही वेळातच आम्ही वाड्यात पोहोचलो..वाडा खूप मोठा आणि प्रशस्त होता..मला बघितल्यावर काका धावतच माझ्याजवळ आले आणि मला बिलगले..त्यांना कोण आनंद झाला होता..सुमनला ही भेटून ते खूप खुश झाले त्यांनी काकीला हाक मारली..काकी ही धावत आली तिने आमच्या दोघांचे औक्षण केले आणि भाकरी तुकडा ही ओवळला..मग आमच्यासाठी साफसूफ केलेली खोली मला दाखवली..मी माझ्या लहानपणीच्या आठवणीतले आमचे घर पाहत होतो..सगळे काही तसच होत..जसे मी जाताना होत..तेवढ्यात माझी नजर आजोबांच्या खोलीकडे गेली..पण त्या खोलीला कुलूप होते आणि कसलेतरी लाल धागेदोरे त्या कुलुपाभोवती गुंडाळले होते..
एव्हाना संध्याकाळचे ५ वाजले होते..काकांनी थोडा आराम करा मग आपण सविस्तर बोलू असे ठरविले..मग २ तासांची चांगली झोप काढून गरमागरम चहा पितापिता आम्ही बोलू लागलो..तोपर्यंत घराचं वातावरण खूपच छान होतं..खूप प्रसन्न होतं..सुमन पण खूप खुश होती की, तिने इथे येण्याचा योग्य निर्णय घेतला म्हणून..
सुमनला ४ महिना चालू होता त्यामुळे गरोदरपणातले तिचे पोट अजून तरी दिसत नव्हते..
काकांनी इतक्या तातडीने मला इथे बोलाविले होते त्यामुळे आधी मी थोडा काळजीत पडलो होतो. पण ह्या घरात आल्यावर मी ते सगळं विसरून बालपणीच्या दिवसात हरवून गेलो..मी विक्रमचा विषय काढणारच होतो, इतक्यात एक तरुण वाड्याच्या दरवाज्यात उभा होता आणि मला पाहताच दादा अशी त्याने हाक मारली..
विक्रम!! हो तो विक्रमच होता..किती लहान होता तो जेव्हा हा वाडा मी सोडून गेलेलो..आता किती रुबाबदार दिसत होता तो..त्याने मला गच्च मिठी मारली..मग मी त्याची सुमनशी ओळख करून दिली..
मग आमच्या गप्पा सुरू झाल्या..पण एक गोष्ट मी नोटीस केली की, इतक्या गप्पांमध्ये काका-काकी मनापासून काही सहभागी नव्हते..काहीतरी होतं जे त्यांना आम्हाला सांगायचं होतं..पण कदाचित ते त्यांना आम्हाला सांगता येत नव्हतं..
क्रमश: