पुस्तकांची आत्मकथा
पुस्तकांची आत्मकथा
"रविवार शिवाय वाचनालयाला सुट्टी नसते. अचानक झाले तरी काय? आपल्याला जीव लावणारी माणसं अचानक गायब कशी झाली. गेली तरी कुठे? समजेनासे झाले आहे बुवा." रॅक मधील एक पुस्तक दुसऱ्या पुस्तकाशी हळूच कुजबुज करत होते.
"नेहमी निरनिराळ्या विचारांची माणसं यायची. निवांत पुस्तके वाचन करायची. आता फक्त खिडकीच्या फटीतून डोकावणारी सूर्यकिरणे तितकी आपलीशी राहिली आहेत." दुसऱ्या पुस्तकाने लगेच उत्तर दिले.
"पुस्तकांना ज्ञानाचे भंडार म्हटले जाते. परंतु सध्याच्या युगात मुलांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी इंटरनेटचा जमाना आला आहे ना. सगळं काही त्यावर उपलब्ध असतं. त्यामुळे आपला उपयोगच राहिला नाही. असे वाटायला लागले आहे." अभ्यासाच्या पुस्तकाने चिंता व्यक्त केली.
"परीक्षा आल्या की, मुलांची किती गर्दी दिसायची. तासनतास मुलं वाचन करत बसलेली असायची. वाचनालयाचे अभ्यासमय वातावरण एखाद्या भरलेल्या कुटुंबा प्रमाणे भासायचे." दुसऱ्या रॅक मधील पुस्तकाने मनातील खंत बोलुन दाखवली.
"माझ्या कथा वाचताना वाचक इतका दंग होऊन जातो की, त्याला संपुर्ण पुस्तक वाचन केल्या शिवाय झोपच लागत नाही. " रहस्यमय पुस्तक गॅरंटी देत बोलले.
"माझ्या वाचकाबद्दल तर विचारूच नका. कुणी धाडसी असेल तर संपूर्ण पुस्तक वाचून काढतं. पण कुणी अर्ध्यातच माझी साथ सोडून निघुन जातं. अश्या भित्र्या वाचकांना सगळीकडे भूतच दिसू लागतात." भुतकथा संग्रहातील पुस्तके हसू लागली.
कॉमिक्सची पुस्तक ऐट दाखवत म्हणाले,"एखाद्याचा मुड ऑफ असल्यास मला शोधत येतात. मग लोटपोट हसून मनाची मळभ घालवतात. मग वाचनालयाचे पिन ड्रॉप सायलेन्स वातावरण तंग झाल्यावर सर किंवा मॅडम रागाने बाहेर काढण्याची चेतावणी देतात."
प्रत्येक रॅक मधील पुस्तक स्वत बद्दल थोडक्यात माहिती सांगत होते. सगळ्यांचा कल प्रेमकथेच्या पुस्तकांकडे वळला. प्रेम कथेची पुस्तक काहीशी लाजारीमोजरी तर काही आठवणीच्या डोहात बुडालेली होती.प्रेम कथेच्या पुस्तकाने बोलण्यास सुरुवात केली.. प्रत्येक पुस्तकाची एक वेगळीच बात असते. माझे विश्व कधी प्रेमाच्या विश्वात झोके घेते. तर कधी आसवांच्या डोहात पार बुडून जाते. कथा वाचन करून प्रेमात पडणारी जोडपी खुप असतात. काहींचे प्रेम एकतर्फी असले की, मग तो गुलाबही माझ्या आयुष्यात कायम सुकून राहतो. तर प्रेमचिठ्या वर्षा नुवर्ष पिवळसर होई पर्यंत निरंतर राहतात. प्रेम कथेचे पुस्तक दुःख व्यक्त करत बोलुन गेले.
कोपऱ्यात एका कपाटाला कुलूप लावले होते. त्या कापटच्या काचे मधून काही ग्रंथ शांतपणे बाहेर पाहत होते. तर काही तल्लीन होऊन बसलेले.
"बंदिस्त कपाटा मध्ये आमचे वेगळे स्थान दिसते खरे. मात्र वर्षानुवर्ष धूळ खात इथे पडून राहतो. शक्यतो वयस्कर माणसा शिवाय आमच्याकडे कुणी फिरकत नाही. ४०० वर्षांपूर्वी संतांनी त्यांच्या सहजीवनातील उदाहरणं देऊन ग्रंथालेखन केलेले आहेत. ते आजही जिवंत आहेत त्यांच्या अभंगांत. त्यांच्या भारुडात, त्यांच्या श्र्लोकांच्या प्रत्येक ओवी अन् ओवीत.. अज्ञानातून ज्ञानाचा प्रवास सहज अश्या सुंदर शब्दांत मोकळा करून दाखवला आहे. संत परंपरे कडून आलेले हरिनाम, कीर्तन, प्रवचन, सप्ताह श्रवण करून मनाला आत्मिक सुख लाभते. काळ लोटला तसे जनमानस बदलले. सगळं काही उलट सुलट झालं बघा. पाश्चात्य संस्कृतीचे लोक भारतीय संस्कृतीची जोपासना करू लागले आहेत. संताची महती त्यांना कळून चुकली. मग आपल्या नवीन पिढीला का समजू नये? आपल्या संस्कृतीचा विसर पडणे. ही खुप चुकीची बाब आहे." एवढं बोलून ग्रंथ डोळे बंद करून शांत बसले.वाचनालयात शांतता पसरली.
सुन्न वातावरण प्रसन्न करण्यासाठी कवितेचं पुस्तक गाणं गुणगुण करू लागलं. खरंच! संगीतातील जादू म्हणायला हरकत नाही. काही पुस्तके सुर छेडू लागली. तर काही पुस्तके ताल पकडू लागली.
एक दिवस अचानक वाचनालयाच्या सरांनी येऊन दरवाजा उघडला. प्रत्येक रॅक मध्ये ते डोकावून बघत होते. कदाचित सगळ्या पुस्तकांना पाहून आज त्यांना सुद्धा हायसे वाटले असावे.
दोन शिपाई येऊन वाचनालयाची साफ सफाई करू लागले. तेव्हा पुस्तकांना बातमी समजली की, कुणी कोरोना नावाच्या विषाणूने जग पालथी घातले आहे.
काही दिवसांत हरवलेली पाखरं पुन्हा ज्ञानाच्या विश्वात येऊन रमताना दिसू लागली. काही दिवसपर्यंत वाचन तर नाहीच. पण एकमेकांना भेटून दिसणारा आनंद वर्णन करण्या सारखा होता. ऑनलाईन अभ्यासाची शिकवणी मुलांच्या डोक्यात शिरत नव्हती. दोन वर्ष मुलांनी अभ्यास केला नाही. त्यामुळे नुकसान झाले असल्याचे समजले.
पुस्तकांनी मनाला लावून घेतलं. मात्र दुसऱ्याच क्षणी पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करणारी मुलं पाहून मनाकडे समाधान आलं. विज्ञानाच्या जगात मोबाईल वर कितीही ज्ञान वाटप होत असलं. तरीही एकाग्र चित्त अभ्यास पुस्तक हातात घेऊनच होतो. जिवंत उदाहरण पाहून पुस्तके स्वतः लाच शाबासकी देऊ लागले. पूर्वी सारखे वातावरण पाहून प्रत्येक पुस्तक सुखावून गेलं होतं. आणि काय नवल.. बंदिस्त कपाटा मधील ग्रंथ काही विद्यार्थ्यांनी बाहेर काढले. प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळाले. "पुरातन काळाच्या भारतीय संस्कृती वर पी एचडी डी करण्यासाठी.." खऱ्या अर्थाने नवीन पिढी कडून ग्रंथांचा सत्कार झाला होता.