अस्तित्वाचा स्वीकार - भाग २
अस्तित्वाचा स्वीकार - भाग २
लग्नाच्या चार दिवसांनी पाहुणे आप आपल्या घरी निघून गेले. सबंध घर शांत झाले. आईला काही संशय येऊ नये म्हणून पंकज मोजकेच शब्द सीमाशी अधून मधून बोलत होता. तीही त्याला प्रतिसाद देत होती.
आईने सहजच विचारणा केली."लग्न झाल्या वर नवीन जोडपी फिरायला जातात. बायकोला घेऊन कुठे जाणार नाही का? पंधरा दिवसांची सुट्टी घरातच घालवणार का?"
"आई ! अगोदर बुकिंग करावी लागते. थंडीचा सिझन असा असतो की, सगळं महाग असतं. तात्काळ बुकिंगचे सुद्धा जास्त पैसे घेतात. नंतर फुरसत मध्ये जाऊ." पटकन तो आईला बोलून गेला.
एक दिवस घरातील सामान आणण्यासाठी म्हणून दोघं मॉल मध्ये गेले होते. घरी आल्यावर पंकज भलतीच चीड चीड आई पुढे करू लागला. "ही कसली घंटा माझ्या गळ्यात बांधून दिलीस. आयुष्यभर गळ्यात घालून फिरावी लागणार."
"अरे! पण एवढं कुठलं मोठं आभाळ कोसळलं?" आई ओरडतच बोलली.
"लोक माझ्या कडे बघून हसतात. तिचं चालणं. तिचं बोलणं. तिचं वागणं. तिचं मुरडण काही वेगळंच आहे. शिवाय गावा कडची. काही एक अक्कल नाहीये. गावठी कुठली." तो भडकून बोलला.
"अरे! तिच्या साठी शहरातील दुनिया नवीन आहे. होता होता सवय होईल." आई उत्तरली.
सीमाला हे ऐकून खुप वाईट वाटले. हृदयाला दुःख झालं की, डोळ्यांना त्याची सहानुभूती असते. तिच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. दुसरीकडे तिच्या हृदयाचे ठोके खुप वाढत चालले होते. भविष्यकाळ तिच्या साठी काय घेऊन येणार? हा प्रश्न तिला भांडवून सोडू लागला. खरं तर ह्यात तिची काही एक चुकी नव्हती.
बघता बघता पंधरा दिवस लोटले. सरकारी नोकरी म्हटलं तर माणसं वेळेवर घरी येतात. पण पंकज रोज रात्री उशीराने घरी येऊ लागला. तो कितीही उशीराने घरी येत असला तरी सीमा त्याच्या साठी जागी राहायची. तो जेवल्या शिवाय ती जेवत नसे. एक दिवस तो न जेवताच झोपला. तीही उपाशी झोपली हे त्याच्या लक्षात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरातून निघताना तो तिला शांतपणे म्हणाला,"मला उशीर झाला की, मी बाहेरून जेवण जेऊन येतो. माझ्या साठी जेवायला थांबत जाऊ नकोस आणि हो माझ्या साठी जागरण करत जाऊ नकोस. झोपताना दरवाज्याला आतून ल्याच्छ लावत जा. एक्सट्रा घराच्या किल्ल्या माझ्या कडे आहेत. मी दरवाजा उघडत जाईन. म्हणजे तुला उठायला नको."
त्याने दिलेल्या उपदेशा वर ती चालू लागली. पंकज रात्री घरी आल्यावर झोपून जायचा. तीची चांदणी रात्र मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहून अशीच सरत निघुन जायची.
रविवारी पंकज घरी असला की, आई त्याला बोलायची.. "लग्नाला वर्ष भरायच्या आत घरात पाळणा हलायला हवा."
पंकज आईच्या बोलण्या कडे दुर्लक्ष करत होता. जास्त वेळ त्याने स्वतला घरा बाहेरच व्यस्त करून घेतले होते. त्याची टाळाटाळ आईच्या लक्षात येऊ लागली होती. पुढे हे असच चालत राहिलं. तर कसं होणार? या विचारात आई असायची..
अशातच मार्च २०२०, कोरोनाच्या प्रभावा मुळे जगभरात लॉक डाऊन करण्यात आले. पंकज ऑफिसचे काम घरून करत होता. सतत त्याचा फोन व लॅपटॉप ऑन असायचा. चोवीस तास त्रिकुट कुटुंब एकमेकांच्या नजरे समोर होते. एकीकडे पंकजला घरात असह्य होऊ लागले होते. तर दुसरीकडे सीमा तो डोळ्यां देखत असल्याचा आनंद घेत होती.
खरा नजर चोरीचा खेळ सुरू झाला. ऑफिसच्या कामात तो व्यस्त असला. तरी त्याचे लक्ष सीमा वर केंद्रिंत होऊ लागले. तिचा नित्यक्रम तो रोजच पाहत होता. पहाटे सगळे उठायच्या आधी ती उठायची. सबंध घर साफ करून झाल्यावर फ्रेश व्हायची. रांगोळी, देव पूजा मनोभावे करायची. नाश्ता मागायच्या अगोदरच गरम बनवून हजर करायची. आवड लक्षात घेऊन दुपारच्या जेवणाची तयारी. जेवून झाले की, धुऊन झालेले कपडे वाळत घालायला गच्चीवर जायची. दुपारची निवांत वेळ असल्यामुळे त्या वेळेस तिला काही काम नसायचे. तेव्हा ती गच्चीवर बसून डायरी लिहित बसायची.
एक दिवस कुणी पाहुणे घरी आले. आई सीमाला आवाज देऊ लागली. ती खाली येत नाही हे पाहून पंकज तिला बोलविण्यास गच्चीवर गेला. ती डायरी ठेऊन तशीच खाली पळत गेली.
(क्रमशः)