नागवेली व बारी समुदाय
नागवेली व बारी समुदाय
रोजच्या किंवा विशेष प्रसंगी पूजेसाठी वापरणारे "नागवेलीचे पानं" आणि या वेलीचा जन्म कसा झाला याबाबत पूर्वजांकडून ऐकण्यात आलेल्या कथा, आख्यायिका आपल्या समोर ऐतिहासिक कथेच्या रुपात सादर करीत आहे. या पानांचा व्यवसाय करणारे लोक म्हणजेच "बारी" समुदाय होय
कथा ०१)
"समुद्रमंथनाच्या वेळी चौदा रत्नांबरोबर ऐरावताच्या पायाला गुंडाळून एक वेल आली. ही वेल अतिशय नाजूक होती. त्यामुळे अतिशय शुद्ध, सात्त्विक आचरण करणाऱ्या व्यक्तिसमूहाकडे या वेलीच्या संगोपनाचं कार्य असावं असं देवांनी ठरविलं व कश्यप ऋषींकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली. या कश्यप ऋषींचे वंशज म्हणजे बारी होत. अमृतमंथनात सापडलेल्या या वेलीला 'अमृतवेल' (नागवेली) असे तेव्हापासूनच संबोधिले जाऊ लागले."
कथा ०२)
"बारी समाजाच्या पानमळे पिकविण्याच्या पारंपरिक व्यवसायात पाने वेलीपासून खुडण्याचं नाजूक काम बहुतांशी स्त्रियाच करीत अनेक वर्षांपासून पानमळ्यात काम करीत असताना एक बारी स्त्रीला नाकातल्या नथीचा काहीसा त्रास झाल्याने तिने ती काढून एका वेलीला टोचून ठेवली. कामाच्या घाईत ती विसरली. जेव्हा नथीची आठवण आली तेव्हा ती पुन्हा त्या वेलीजवळ आली असता बारी समाजाची देवता असलेली नागीण मुग्ध नजरेने त्या वेलीकडे पाहताना दिसली. स्त्रीने नागिणीला नमस्कार करून नथ घेण्यासाठी हात पुढे केला असता नागिणीने 'ही नथ मला खूप आवडलीय. ती तू मला देऊन टाक. 'अर्पण कर' अशी विनंती केली आणि त्या स्त्रीने ती मान्य केली. तेव्हापासून बारी समाजाच्या स्त्रीच्या नाकातील नथ गेली ती गेलीच."
कथा ०३)
एकदा शंकरजी वनात ध्यानस्थ बसले होते. तेव्हा तिथे त्यांची बहीण ' त्यांना अक्षता लावण्याकरिता आली. हे पाहून शंकरजींना खूप आनंद झाला. त्यांनी तिचे स्वागत केले. तिला बसविले. तिला पाहुणचार केला. तसेच तिची खुशाली विचारली. नंतर शंकरजीच्या बहिणीने त्यांना अक्षता लावली तेव्हा शंकरजी चिंतित झाले. त्यांना विचार पडला की, आपण आपल्या बहिणीला काय द्यायचे. तेव्हा त्यांनी नागवेलीचा वेल जो समुद्रात होता आणि तो समुद्रातून हत्तीच्या पायाला आला. त्याची गुंडाळी करून तो शंकरजीने आरतीत टाकला. आणि तिला वरदान दिले की, हे दान तुला कधीही सरणार नाही. तेव्हापासून पानतांड्यांना सुरुवात झाली आणि त्याची भरभराट होऊ लागली.
परंतु नागवेलीने शंकरजींना अशी अट घातली की, मी कलीच्या शेंड्यावर राहणार नाही. कारण सतयुग नष्ट होईल. जेव्हा कलीयुगाला सुरुवात झाली तेव्हापासून पानतांडे नष्ट होण्यास सुरुवात झाली.
कथा ०४)
आर. व्ही. रसेल या इंग्रज अधिकाऱ्याने १९१६ मध्ये लिहिलेल्या 'ट्राइब्ज अॅण्ड कास्टस् ऑफ टी सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया' या आपल्या पुस्तकात बारी समाजाच्या उत्पत्तीची एक कथा दिली आहे "महाभारत युद्धानंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला तेव्हा पूजेअर्चेसाठी पानं हवी होती. त्यामुळे पानांच्या शोधासाठी सर्वत्र दूत पाठविण्यात आले. त्यातील एक दूत पाताळात पोहोचला. तेथे नागराणीने आपल्या हाताची करंगळी कापून त्या दुताला दिली. ही करंगळी जमिनीत पेर व त्याची जपवणूक कर असे तिने सांगितले. त्या करंगळीच्या रोपाला पुढे पानं आली. तीच नागवेल म्हणून ओळखली जाऊ लागली आणि त्या दुताचे वंशज बारी ठरले.