मर्द को दर्द नही होता...
मर्द को दर्द नही होता...
सोशल मीडिया जस जसे वापरू लागलो तस तसे अनेक नवीन दिवसांचे शोध लागत गेले. आज काय अमका डे उद्या दुसरा कसला डे अस हे डे पुराण ही असत आणि ते साजरं करायचं असत हे ही समजलं. महिला दिन असेल तर महिला कशा सोशिक,सोज्वळ आणि दिन असतात याचे गोडवे गायले जातात तर कुठे महिला किती सक्षम आहे, धाडसी आहे,कर्तबगार आहे याचे कौतुक केले जाते. तसाच उद्या 19 नोव्हेंबर ला "जागतिक पुरुष दिवस" आहे. आता हा कसा साजरा करावा बरे! प्रश्न पडला ना तुम्हाला. आता स्त्री पुरुष समानता सगळी कडे आहे. तरी ही आम्ही महिला बस,रेल्वे,नोकरी अशा ठिकाणी हमखास आम्ही महिला आहोत इथे आम्हाला आरक्षण आहे म्हणून त्या बिचाऱ्या पुरुषा वर हुकुमत गाजवनार. त्याला लहान पणा पासून एक गोष्ट हमखास शिकवली जाते ती म्हणजे तू मुलगा आहेस, तू स्ट्रॉंगच असायला हवे. तुला किती ही त्रास झाला तरी रडत बसायचे नाही कारण "मर्द को दर्द नही होता".किती ही भावनिक दृष्ट्या तो खचला असेल तरीही त्याने अश्रू नाही गाळायचे. कुठे एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला तर अत्याचार करणारा पुरुष मग काय एक जात सगळे पुरुष नालायक असतात हा शिक्का त्यांच्या माथी मारला जातो. याला अपवाद ही असतात हे सहजासहजी विसरले जाते. घरात पण बायको चे राज्य असते (काही ठिकाणी) मग त्याने फक्त ऐकायचे काम करायचे. तिला उलट उत्तर नाही द्यायचे. बऱ्याच वेळेस पुरुष आपल्या मुलां कडे बघून गप्प बसत असतो.
आज काय स्वयंपाकाचा कंटाळा आला, अहो जरा भाजी पार्सल मागवता का? त्याने काही ही प्रत्युत्तर न देता भाजी मागवणे. आज तब्येत ठीक नाही जरा कपडे मशीन ला लावता का आणि सुकायला ही टाका.त्याने न कुरकुरता ही कामे करायची. काही ठिकाणी तर त्याने भांडी सुद्धा घासायची. ( मी स्वतः हे सगळं एका नातेवाईकां कडे पाहिले आहे. बायको ला मदत म्हणून थोडं काम करणं वेगळं आणि तिच्या दहशती खाली काम करणं वेगळं) एकीकडे धावती लाईफस्टाईल, वाढती स्पर्धा, त्यातून येणारे नैराश्य, विभक्त कुटुंबपद्धती, वाढलेल्या सोशल मीडियाचा वापर आणि कमी झालेला संवाद यामुळे दाम्पत्यांमध्ये वाद वाढून वैवाहिक जीवन अडचणीत येत आहे. अशावेळीही अनेकदा फक्त पुरुषाला जबाबदार धरलं जात. उच्च शिक्षण आणि गलेलठ्ठ पगार यामुळे बायका नको तितक्या आत्मकेंद्रित आणि हट्टी बनल्या आहेत. त्यातून कायदा महिलांच्या बाजूने मग काय पुरुषाने आवाज जरी चढवला तरी "घरगुती हिंसाचार" ची केस करेन ही धमकी सरार्स महिला देतात. मग तुम्ही म्हणाल स्त्री वर पण अत्याचार होतो हुंडाबळी, बलात्कार मानसिक टॉर्चर, हो पण त्यामुळे पुरुष सुरक्षित आहे किंवा सुखी समाधानी आहे असं नाही म्हणता येणार. जरा आजूबाजूला नजर टाकली तर हमखास एक घर सोडून एका घरात पुरुषाला ही टॉर्चर केले जाते त्यात भर म्हणजे मुली चे आई वडील . तू काही ही काळजी नको करू आम्ही आहोत तुज्या सोबत असे आश्वासन मग काय 'हम करेसो कायदा' अशी वृत्ती स्त्रियां मध्ये बळावत चालली आहे.
शहरात घडणाऱ्या उदाहरणांपैकी बोलायचे झाल्यास दोघांच्या जाडजूड पगारामुळे अतिआत्मविश्वास आणि हट्टीपणा यांच्यातून विसंवाद वाढतो. बरेचसे कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे अशावेळी त्यांचाही दुरुपयोग करून नवऱ्याला आणि कुटुंबियांना अडचणीत आणण्याची उदाहरणे बरीच आहेत. मात्र सगळ्याच महिला अशा असतात असे नाही याला ही अपवाद आहेत. पण मला इतकंच म्हणायचे आहे की नाण्याची एकच बाजू न पाहता दोन्ही बाजू तपासून बघा. पुरुष ही माणूसच आहे. त्याला ही मन,भावना आहेत. बहीण सासरी जाताना ढसाढसा रडनारा भाऊ,मुलीला निरोप देताना आतल्या आत रडणारा बाप ,पत्नीच्या प्रसव वेदना आपण वाटून नाही घेऊ शकत अस वाटून मनातून अस्वस्थ होणारा नवरा ही सगळी पुरुषाचीच रूप आहेत.
अन्याय फक्त स्त्रीवर होतो आणि तिलाच मानसिक आधाराची गरज असते या ठराविक मांडणीतून बाहेर येऊन पुरुषावर होण्याऱ्या अन्यायाचीही तितक्याच संवेदनशीलपणे नोंद व्हावी अस वाटते. मानसिक खच्चीकरणा मूळे आत्महत्या केलेल्या पुरुषांची संख्या महिलां पेक्षा जास्त आहे. "मर्द को दर्द नही होता" या वाक्याला भीक न घालता,त्याच्या वेदना,त्रास जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. जसे महिला दिन साजरे करतो तसे पुरुष दिन ही साजरे व्हावेत यात स्त्री अत्याचारा बाबत जशी दखल घेतली जाते तसेच पुरुष अत्याचारा बद्दल ही आवाज उठवायला हवा . अन्याय फक्त स्त्रीवर होतो या मानसिकतेतुन लवकरात लवकर बाहेर येणे गरजेचे आहे. नाहीतर खरच पुरुष "दिन" म्हणूनच कायम उपेक्षित राहील.