मराठवाडा भुमी
मराठवाडा भुमी
इतिहासालाही ज्यांचा हेवा वाटावा , कली काळाच्या छाताडावर पाय रोउन जो धीरोदात्तपणे आपल्या महाराष्ट्राची कीर्ती जगाला दाखवतो, ज्याने पाहिला शौर्याचा काळ,स्वातंत्र्यवीरांचा रांगडा बाज, कातालावरील रक्ताचे पाट ,भुमीच्या कणा कणातील घामाचा वास, शुरवीरांच्या पायधुळीचा अंगार, शत्रूच्या गोटातील धुळधाण , मर्दुमकीची प्रचंड लालसा, गगनचुंबी वीररसाचा ताप आणि अनुभवला, जगला पाहिला एक क्रांतीचा सुवर्ण काळ. आजही ज्यांच्या प्रत्येक कणा कणाला पाहून नतमस्तक व्हाव ,ओल्या पापण्यानी अभिषेक घलावा प्रत्येक चट्टानाला आणि बस सार्थकी लागले हे जीवन की या मराठवाड्याच्या कुशीत आपला जन्म झाला. बहुत पुण्यवान देह घडला आणि वाढला याच पावन पवित्र भूमीत आणि जीवनाची धन्यता मानावी.
हा मराठवाडा नुसता सखल मैदान,डोंगर ,दऱ्या नाहीत तर हा आहे युगपुरुष तुमच्या आमच्या पिढ्यांची अलौकिक पुण्याई आणि शौर्याची गाथा सांगणारा. अरे कसा होता काळ ? कसे होते ते बेलगाम राज्य ? आणि कशी निजामशाही ? अशा एक नाही अनेक प्रश्नांचे उत्तर या आफाट, आचाट, विराट, उतुंग आणि वैभवशाली मराठवाड्याच्या भुमीला पाहिले कि लक्षात येत. किती वैभवशाली,भाग्यशाली, शौर्यवादी,प्रभावशाली आहोत आम्ही ह्या मराठी मुलखातील आम्ही की आम्हाला हा ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि आजही तो वारसा ताठमानेने आम्हाला खुणावतो आहे. अजिंठा वेरूळची जागतीक लेणी, औरंगाबाद,धाराशिव, जालना, परभणी अशी ऐतिहासिक शहरे, देवगीरी,हळदा अंतूर, सुतोंडा असे आफाट डोंगरकिल्ले यांच्या कडे पाहून आमच्या स्वाभिमानची बिरादरी अशीच आभिमानाने आज तागायत मिरवतो.
आपण जो आज घाट घातलाय ना प्रगत मराठवाडा करण्याचा हे काही नुसते काम नाही तर आपले कर्तव्य आहे. आज आम्ही पुढाकार घेतला तर संस्कृती बहरेल आपल्या पुढील कित्येक पिढ्या आपल्या पुर्वजांच्या शौर्याचे पोवाडे मुखी ठेवतील, आणि अजरामर असणारी ही मराठवाड्याची माती आपल्या संस्कृतीला अमूल्य ,अतुल्य ,अजरामर करतीलच यात शंका नाही.महाराष्ट्र राज्याच्या विकासात याच मराठवाड्याची खुप महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात येथील मातब्बर नेत्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंढे, शिवराज पाटील चाकुरकर, अंकुशराव टोपे, नानाजी देशमुख, शिवाजी पाटील निलंगेकर अशा कित्येक राजकीय नावे सांगता येतील. येथील जनतेच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम याच दिग्गज नेत्यांनी केले. पर्यटनस्थळांचा देखील खुप मोठा वरसा मराठवाड्याला लाभलेला आहे. ५२ दरवाज्यांचे औरंगाबाद शहर, बीबी का मकबरा, देवगीरी किल्ला अजिंठा वेरूळची लेणी, नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा, परभणी येथील कृषी विद्यापीठ, बीड येथील पांडव कालीन दगडी मंदिरे, धाराशिव येथील तुळजाभवानी मंदिर, रेणुकामातेचे माहुर, नाथांचे पैठण, रामदास स्वामींचे जांब, औढा नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर अशी ज्योतिर्लिंग अशी किती तरी प्रेक्षणीय स्थळे मराठवाड्याच्या सौदर्यात भरच घालतात. गौताळा अभयारण्य आणि त्यात वसलेले गिरिदुर्ग पर्यटकांना खुणावत असतात. औद्योगिक क्षेत्रात देखील स्वातंत्रोत्तर काळात या विभागाने उत्तुंग भरारी घेतली आहे. जालना जिल्हा लोह पोलाद उद्योगा सोबत बीजनिर्मिती साठी प्रसिद्ध आहे. दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण बीज फक्त येथेच मिळते. साखर कारखाने, जिनिंग, MIDC यामुळे येथील तरुणांना रोजगार तर मिळालाच सोबत भागाचाही विकास जोमाने सुरु झाला. जायकवाडी सारखा प्रकल्प म्हणजे मराठवाड्यासाठी संजीवनी. कित्येक जिल्ह्याना तृप्त करण्याच काम हे एकच धरण करतय.औरंगाबाद सारखे दृतगतीवेगाने वाढणाऱ्या शहराची रोजची तहान भागवते.
महाराष्ट्राचे वैभव म्हणजे ही मराठवाड्यातील भुमी. आपल्या या भुमीने कितीतरी नरवीर दिले. याच नरवीराना शतशः नमन करून आपल्या मराठवाडा भुमीचा आदर कसा वाढेल हाच विचार येथील लोकांनी करायला हवा. तेव्हा कुठे आपण त्यांच्या विचारंचे पाईक बनु.
जय जिजाऊ जय शिवराय