मीच गौरी मीच दुर्गा
मीच गौरी मीच दुर्गा
न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हती असे मनूने सांगितल्यामुळेस्त्रीला स्वातंत्र्य दिले गेले नाही.
आपण 100 वर्षांपूर्वीची बाईची अवस्था बघितली , तर तिच्याभोवती तमोमय अंधःकारच होता. रांधा , वाढा , उष्टी काढा हेच तिचे जीवन होते. कष्ट , अपमान , दुःख अवहेलना ह्यांनीच तिचे जीवन झाकोळून गेले होते.पडेल ते काम करणे , उलट न बोलणे ह्या गोष्टींनी तिचे जीवन कुचंबणेचे झाले होते.तिला अवाक्षर बोलायची परवानगी नसे.तिचे स्थान घरामधेच. उंबरठा ओलांडून बाहेर जाता येत नसे.काम , काम आणि काम हेच तिचे जीवन होते.
शिक्षण घेणे ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती. बुद्धीचा प्रांत हा फक्त पुरुषांचाच आहे , अशी त्यावेळी समजूत होती.ती कधी उंबरठा ओलांडून बाहेरच पडली नव्हती , तर तिची बुद्धिमत्ता समजणे शक्यच नव्हते.
इतक्या पुराणमतवादी काळात ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ह्यांनी मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे , म्हणून मुलींसाठी शाळा सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. शिक्षणाचे दार खुले झाल्यावर तिच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला " तिळा तिळा दार उघड" असे म्हटल्यावर जसे अलिबाबाच्या गुहेचे दार उघडायचे, तसे घराच्या कोठडीत राब राब राबणा-या स्त्रीला प्रगतीचा सूर्य दिसला.
हा मार्गही खडतरच होता. त्यातही खाचखळगे , काटेकुटे आणि प्रखर सामाजिक विरोध होता. त्यावेळच्या कर्मकांडात अडकलेल्या पुराणमतवादी लोकांना पटणे शक्यच नव्हते.त्यांना प्रचंड विरोध झाला. अंगावर शेण टाकणे पाणी उडवणे असे घाणेरडे प्रकार केले, पण ज्योतिबा आणि सावित्रीबाई विरोध होणार हे जाणूनच , गृहीत धरुनच कंबर कसून ह्यात उतरले होते. आपल्या निश्चयावर दोघेही ठाम होते. कितीही छळले तरी मागे हटायचे नाही, असे दोघांनीही पक्के ठरवलेले होते. प्रसंगी हाल सोसून कर्मठ व्यक्तींची टीका सोसून स्त्री शिक्षणाच्या निर्णयावर ठाम राहिले , अशी अढळ निष्ठा सामाजिक कार्यात असेल तरच ते कार्य सिद्धीस जाते. त्यांच्या ह्या स्त्री शिक्षणाच्या आरंभ कार्यास महिलांनीही उत्साहाने साथ दिली. घरचा कितीही विरोध असला तरी न जुमानता , त्या उंबरठा ओलांडून शिक्षणासाठी बाहेर पडल्या म्हणून तर महिला शिकल्या मोठ्या झाल्या. सावित्रीबाईंनी ओल्या साडीवर मुलींना शिकवले म्हणून स्त्री पुरुषांइतकीच बुद्धिमान आहे हे सिद्ध झाले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांनी सोसलेल्या त्रासामुळे , स्त्रीशिक्षणाच्या वेलीचा वटवृक्ष होऊन तो नभाला भिडला आहे.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्याविषयी गाढ कृतज्ञता व्यक्त करते. त्यांना लाख लाख प्रणाम करणे , स्त्री विषयक लेख लिहिणा-या लेखिकेचे आद्य कर्तव्यच आहे.
आता उंबरठा ओलांडून गौरी शिक्षणासाठी बाहेर पडली.ती बाहेर पडली अन् तिचे विश्वच बदललेतिला तिची बुद्धिमत्ता आता सिद्ध करता येणार होती, ही स्रीजीवनाला सर्वात मोठी कलाटणी देणारी गोष्ट .ती बाहेर पडली तरी , तिला घरची कामे चुकलेली नव्हतीच. जरा काही चूक झाली तर , गाडी तिच्या शिक्षणावर येऊन धडकत असे. तिनेही त्या काळात कर्मठ लोकांची नाही नाही बोलणी , शिव्याशाप सहन केले , स्त्री शिक्षणाची आस धरली म्हणूनच आज स्त्री समतेची आणि स्वातंत्र्याची भाषा बोलू शकली.
स्त्री शिक्षणाने स्त्रीला तर शिक्षण मिळालेच , पण तिला पुरुषांइतकीच समबुद्धी आहे हे सिद्ध झाले.नाहीतर घरकामात रखडणा-या स्त्रीला मूर्ख , बेअक्कल अशी दूषणे ऐकून घ्यावी लागायची.
खडतर परिस्थितीत स्त्रीने घेतलेले शिक्षण , ही पुढच्या पिढीसाठी मर्मबंधातली ठेव ठरली. शिक्षणाने तिचे अवघे विश्व उजळले. तिचे कष्टप्रद , अपमानास्पद जिणे संपून , तिच्यामधे आत्मविश्वास निर्माण झाला.आपल्या आस्तित्वाची तिला जाणीव झाली. आत्तापर्यंत ती उपेक्षित जिणे जगत होती, त्यापेक्षा जीवनात शिक्षणाचे दार खुले झाल्याने , तिला दिलासा मिळाला. शिक्षणाने आपले जीवन बदलू शकते ह्या नवीन आशा तिच्या मनात पल्लवित झाल्या तरीही घरच्या कामाचे जू तिच्या मानेवर होतेच , पण तिला शिकायची अत्यंत तीव्र इच्छा असल्याने , तिने ते पेलूनही शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविले. ह्या यशाने तिची बुद्धिमत्ता सिद्ध तर झालीच , शिवाय तिची निर्णयक्षमता पुरुषांपेक्षा जास्त चांगली आहे हे सिद्ध झाले. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यालयीन काम करण्याची संधी उपलब्ध झाली .आता ह्या गौरीला अजूनच नवनवीन क्षेत्रे खुली झाली. ह्या नवीन क्षेत्रांमधे तिने मिळवलेले यश नुसतेच नेत्रदीपक नव्हते , तर त्यात तिने उठवलेली वर्चस्वमुद्रा खरोखरीच कौतुकास्पद होती.
आता गौरीच्या बुद्धिमत्तेबद्दल कोणाचेच दुमत नव्हते. आता तिला हव्या त्या क्षेत्रात प्रवेश मिळवून , वर्चस्वमुद्रा उमटवता येऊ लागली. तिची निर्णयक्षमता पुरुषांपेक्षा सरस आहे , असे सिद्ध झाले.शिक्षणात तिने मानाचे स्थान मिळवल्याने तिला निरनिराळी कार्यक्षेत्रे खुली झाली. मधल्या काळात मेकँनिकल इंजिनिअरिंगमधे महिला नव्हत्या. त्यात महिलांनी प्रवेश मिळवून यश मिळविले.तसेच नोकरीमधे पुरुष उमेदवारालाच निवडत असत.सुधा मूर्तींनी टाटाजींना पत्र लिहून" असे का "असे विचारले. त्यांना नोकरीचा call आल्यावर M tech ला आँडमिशन मिळत असूनही , त्या नोकरीत रुजू झाल्या. अर्थात M Tech त्यांनी नंतर पूर्ण केलेच ,पण आपली नोकरीची योग्यता सिद्ध करुनच !!ह्या अशा कसोट्यांवर ती यशस्वी झाल्याने , तिला वरिष्ठ पदे मिळाली आणि ती तिने बुद्धीमत्तेच्या जोरावर भूषविलीही. देशातील सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावर आदरणीय प्रतिभाताई पाटील मँडम ह्यांची नेमणूक झाल्यावर , तिच्या आत्मबळाचा , विकासाचा आलेख खूपच उंचावला.पूर्वी सैन्यामधे महिलांची नेमणूक होत नसे ,पण आता महिलांनी तिथेही धडाडीने आपली योग्यता सिद्ध केल्याने , तिला भूदलाचे रणांगणावर मर्दुमकी गाजवण्याची संधी मिळाली. तसेच वायुदल , नौदल ह्यामधेही तिने कर्तृत्व सिद्ध केले आहे.आत्तापर्यंत पर्यटनक्षेत्र ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती , पण ह्यात आता महिलाही उतरल्या आहेत. यशस्वीपणे काम करीत आहेत. केसरी टूर्स , वीणा वर्ल्ड सन टूरिझम अशा इतरही खूप कंपन्या आहेत , ज्यात महिला डायरेक्टर पदावर काम करत आहेत. येणा-या अडचणींना समर्थपणे तोंड देत आहेत.टूर्स यशस्वी करुन दाखवत आहेत.तिची निर्णयक्षमता उच्च दर्जाची आहे हे तिने सिद्ध करुन दाखवले आहे.गिर्यारोहण हीदेखील पूरुषांचीच मक्तेदारी होती.आता त्यात मुलींनी निरनिराळे उच्चांक स्थापन केले आहेत.ती वकील म्हणून तर खड्या आवाजात केसचे pleading करतेच आहे पण तिने न्यायाधीश म्हणूनही यशस्वीपणे केसेसचे निकाल दिले आहेत. साहित्य , कला , क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांमधे तिने कर्तृत्वाची मोहोर उमटवलेली आहे. आपल्या ज्ञानाने गगनाला गवसणी घालणारी कल्पना चावला!!लहान वयात तिने ज्ञानाची खूपच मोठी झेप घेतली होती , म्हणूनच तिची ह्या मोहीमेवर निवड झाली होती.तिने मोहीम यशस्वीही केली होती. ह्याच आनंदात परत येत असताना दुर्दैवाने तिच्यावर घाला घातला. जगभरातले लोक तिच्यासाठी हळहळले!! कल्पना चावलाने लहान वयात घेतलेली अवकाश भरारी संस्मरणीय आहे.
प्रियदर्शनी इंदिराजी गांधींचे हुशार , तेजस्वी व्यक्तिमत्त्व जगाला परिचित आहे. मनातले कुणाशीही न बोलण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्या मुत्सद्दी राजकारणी ठरल्या.वडीलाःच्या मृत्यूनंतर पंतप्रधानपद त्यांच्याकडे चालून आलेले असतानाही , त्यांनी ते विनम्रपणे नाकारत , लालबहाद्दूर शास्त्रीजी ह्यांना त्या पदाचा मान दिला .त्यांच्या निधनानंतर " कोमल खांद्यांना ही जबाबदारी पेलेल का?" असा सवाल उपस्थित केला पण त्यांनी यशस्वी कारकीर्द घडवून स्त्री सबला आहे , कठीण प्रसंगी ती दुर्गेचा अवतार धारण करते हे वागणुकीतून दाखवून दिले.
अफ्रिकेतील केनिया देशाची वांगारी मथाई ही जगभराचे हिरवे नेतृत्व ठरली. जंगलसंवर्धनाची चळवळ महिलांच्या मदतीने चालवली गेली. " ग्रीन बेल्ट मूव्हमेःटच्या यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता , त्या स्थानिक महिलांना देतात ह्यात त्यांचा विनम्रपणा दिसतो. आपल्या लोकशाही आणि मानवतावादी लढ्यासाठी , शांतता आणि शाश्त पर्यावरणासाठी त्यांना जगातील सर्वोच्च नोबेल पारितोषिक मिळाले. डॉ वंगारी मथाई ह्यांच्या कर्तृत्वाचा डॉ ए पी जे अब्दुल कलामजी ह्यांच्या हस्ते भारतातही सन्मान झाला.
स्यूची यांनी सक्रिय राजकारणात अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला. चार वेळा स्थानबद्धता सोसली. म्यानमारच्या नागरिकांसाठी मानवाधिकारांची लढाई लढल्या. त्यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित प्रेसिडेन्शियल अँवाँर्ड मिळाले. जिला आधुनिक " सावित्रीबाई " म्हणून ओळखले जाते , ती पाकिस्तानमधील मलाला युसुफधझाई हिने मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व निःसंदिग्ध शब्दांत जगभरात पोचवले. पाकिस्तानी शिक्षणपद्धतीचा दृष्टिकोनच बदलण्यास सुरुवात केली. केवळ सतरा वर्षांची असताना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला , सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कारप्राप्त व्यक्ती ठरली.ह्यासर्व दुर्गेचेच रुप घेऊन अवतरलेल्या महिला आहेत.
आता ही दुर्गा परग्रहावरही संचार करते आहे.हे निश्चितच कौतुकास्पद आहे.तिचे क्षितीज आता खूपच विस्तारलेले आहे.नव्या युगात नव्या वाटांवरची आव्हाने ती यशस्वीपणे पेलते आहे.तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडते आहे. काही ठिकाणी पतीची हक्काने मदत घेते आहे. ती घरच्या जबाबदाऱ्या , घरातील ज्येष्ठांची सर्वतोपरि काळजी , मुलांची आई म्हणून भावनिक होऊन काही वेळ त्यांच्यासाठी काढून ठेवते आहे. घराचे घरपण ही गौरी टिकवते आहे.नुसतेच करिअर नाही तर, पत्नी ,आई , सून ह्या जबाबदा-यांचीही तिला जाणीव आहे.ही कार्यक्षम नारी आता समाजसेवेतही उतरली आहे.गरजवंतांना ती माऊलीच्या रुपाने मदत करत आहे.
पण.....हे सर्व यशस्वीपणे करुन दाखवल्यावर पुरुषांचा अहंकार कुठेतरी दुखावला गेल्याने म्हणा किंवा सूड , असूया , मत्सर उफाळल्याने पुरुषवर्गाने तिला नाना प्रकारे त्रास देण्यास सुरवात केली.स्त्री ही काय फक्त उपभोगाचे साधन आहे ? ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याने , तिला रात्रपाळीचेही काम दिले गेले. त्यावेळी ती कँबमधेही सुरक्षित नसायची. तिचा विनयभंग करण्याच्या खालच्या पातळीवर ही निर्लज्ज पुरुषजात घसरली.आता मात्र गौरीला मीच गौरी - मीच दुर्गा असे म्हणत मार्गातील कंटकांस फटका-याने उडवावे लागले .तिच्या सुरक्षेसाठी खाजगी कंपन्यांनी तिची रात्रीची रहायची सोय केली. ती स्वसंरक्षणार्थ ज्युडो , कराटे शिकली. गुंडांचा हल्ला आता ती दुर्गा होऊन परतवू लागली. नराधमांना बडवून जेरीस आणू लागली .तिच्या संहारक दुर्गेच्या रुपाने नराधमांची बोबडी वळू लागली. पोलिस अधिकारी होऊन गुंडांना जेलचा रस्ता दाखवू लागली. अचानक छापे घालून भ्रष्टाचारास आळा घालू लागली.वाईट धंदे बंद करण्यासाठी धंद्यातील दादांना , अचानक छापा टाकून आटक करु लागली. आता तर ती सर्व ठिकाणी आहे. ती असल्यामुळे तिचा वचकच इतका आहे , की तिला दादा लोक भिऊ लागले आहेत. ती पैशाच्या किंवा इतर कोणत्याही
अमिषास बळी पडत नाही , त्यामुळे ब्लँकलिस्टमधली माणसे सुतासारखी सरळ झाली आहेत.तिच्या कर्तृत्वाची थोरवी अगाध आहे.
मीच गौरी - मीच दुर्गा हे तिने आचरणाने सिद्ध केले आहे.ह्या गौरीला , ह्या दुर्गेला तिच्या महान कर्तृत्वासाठी माझे कोटी कोटी प्रणाम!!अशा स्त्री
देवतेबद्दल एकच म्हणावेसे वाटते
"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः"
........................................