लिखाण.....
लिखाण.....
"आज नवीन काही लिहलं नाहीस.."
आतून आवाज आला..
लगेच वही आणि पेन यांच्या सहाय्याने स्वतःशी बोलायला सुरुवात केली.
".. पण रोज नवीन काहीतरी लिहायलाच हवं का..?" मी विचारलं.
"हो"
"का?"
" कारण तो रियाज आहे. तो रोज श्रद्धेने करायचा. आई बाबांच्या, देवाच्या पायावर रोज ज्या श्रद्धेने डोक ठेवतोस, त्याच भावनेने हा रियाज करायचा.."
" पण रोज असं नवीन काहीतरी सुचेल कसं..?" मी आपली एक genuine वाटणारी पळवाट शोधली.
" न सुचू देत ना.. पण तुला प्रयत्न करायला काय हरकत आहे..? तू एकदा का प्रयत्नाच्या किनार्यावर उभा राहिलास की यशाच्या लाटा येतील की आपोआप.. पण आलेल्या लाटा झेलायला, तू किनार्यावर उभा तर रहा !"
मग डोक्यात available असलेल्या शब्दांमधून निवडला एक शब्द, आणि उतरवला कागदावर.. मग त्याच्याशी संबंधित आणखीन एक शब्द सुचला. तोही निसटायच्या आत पटकन लिहून घेतला.. मग त्याला क्रियापद जोडलं. आता तयार झालं एक वाक्य.. मग हळूच त्या लिहलेल्या वाक्याला अनुसरून एक कविता आठवली.. लिहून टाकली पटकन आठवली तशी.. आता मात्र मन रिकामं झालं.. पुढे काही सुचेना..
"बास आज एवढंच.." असं वाटून गेलं.. मग जरा आजूबाजूला बघितलं. काही विशेष वेगळं दिसलं नाही.. मग काय लिहायचं?
स्वतःलाच विचारलं, " पुढे काय लिहू ?"
आतून उत्तर आलं, " 'आज एवढंच बास'....... असं लिही..! 'कंटाळा आलाय'........ असं लिही...!"
"पण ते आधीच्या वाक्यांशी सुसंगत नाहीये.."
"नसू देत ना.. सुसंगत नसलं, तरी तुझंच आहे ना..?"
मग मी लिहित सुटलो.. मनात येईल ते लिहित गेलो.. त्याला फारसा अर्थ होता असं नाही, पण ते मला कळत होतं..
लोकांसाठी काय, आपण नेहमीच लिहितो हो ! कधीतरी स्वतःसाठी लिहावं ! अर्थहीन ! तरीही खूप खरं, आणि आपलसं वाटणारं..
मजा येते !!