क्षण एक पुरे प्रेमाचा
क्षण एक पुरे प्रेमाचा
" ए आजीबाई ,उठ की आता "
" ए मनीआज्जी मला खारी दे ना दूधाबरोबर "
" ए आज्जे मला आलूपराठे दे ना!!आई फरसाण अन् केक ने म्हणतीयं !! "
सोनाची लाडिक मनधरणी आजीच्या कानांत रुंजी घालत होती.
" अहो मनीषाबाई सात वाजले .उठा आता. इथली चहाची वेळ संपेल.इति चिंतामणी
मनीषाबाई पटकन् उठल्या. आज त्या घरी नव्हत्या. कालच मुलगा सुनेने इथे आणून सोडलेले. निघताना सोनाचा कोमेजलेला चेहरा अन् अश्रूंनी डबडबलेले डोळे त्यांच्या डोळ्यांसमोरुन हलत नव्हते.रोज आपल्या चांदण्यांच्या हातांनी तीच उठवायला यायची आजीला.
" आता भूतकाळ विसर मनीषा.जरा वर्तमानात ये."
मग दोघेही चहा घेऊन आले.घरच्या चहाची चव तोंडावर परतपरत येत होती , पण नाईलाजाने ती परतवावी लागत होती.
सुरवातीला कुणाशी काय अन् कसे बोलावे कळत नव्हते.चोरट्यासारखे वाटत होते.सुनीताताईंनी जवळ घेतल्यावर अश्रूंचा बांध फुटला.असं विश्वासाचं माणूस मिळणं ही पण परमेश्वरी कृपाच म्हणायची.
काळ हेच प्रत्येक दुःखावरचे औषध असते.एक दोन महिन्यात त्याही तिथल्या वातावरणाला सरावल्या.त्या चिंतामणींशी गप्पा मारु लागल्या. भूतकाळ अजिबात गप्पांत येऊ द्यायचा नाही हे बंधन दोघांनीही पाळले.त्यांच्या कांचनसंध्या उमलू लागल्या , बहरु लागल्या.
वृद्धाश्रमात एप्रिल आणि आँक्टोबरला गेटटुगेदर असे. मनीषाताईंना गायन , अभिनय कलागुणांची जाण चांगली होती.चांगले कार्यक्रम बसवून ,वेळ सत्कारणी लावू लागल्या.
आपल्याला जसे सुनीताताईंनी सावरले , तसे आपणही इतरांना सावरले पाहिजे असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले .नवीन येणा-या प्रत्येकीची कहा णी वेगळी असे , मात्र निर्णय वृद्धाश्रमापर्यंत पोचलेला एकच!!
" नशिबाचे भोग आहेत सारे " असं म्हणून त्या नवीन येणारीचे अश्रू पुसत.भावना मोकळ्या करायला विश्वासाचे माणूस म्हणून त्या आधार देत.
एका गेटटुगेदरमधे त्यांना सन्मानचिन्ह मानाची शाल देऊन गौरविले.त्यांना कृतार्थ वाटले.
चिंतामणींच्या खांद्यावर हलकेच डोके ठेवून म्हणाल्या
" क्षण एक पुरे प्रेमाचा......