कोणे एके काळी
कोणे एके काळी
ती:अहो ऐकलंत का? सुलू वन्सच्या धाकल्या दिराच्या लग्नाची पत्रिका आली आहे. बघा मे मध्येच लग्न आहे.
तो: मग जाऊ या आपण, मुलांनाही सुट्ट्या असतील.
ती: काही नाही जायचं! आपला मे मध्ये शिमल्या ला जाण्याचा प्लान आहे. आणि आपल्या मुलांच्या मुंजी मध्ये सुलु वन्स एकट्याच आल्या होत्या.
काय पण आहेर काय दिला होता. एक स्टील चा वाडगा. दोन पोरांना दोन स्टीलचे वाडगे हातात ठेवले. आणि म्हणतात याच्या मध्येच भिक्षावळ घ्या! काय म्हणून आपण जायचं लग्नाला? फुकट चार-पाच हजाराला फोडणी. त्यापेक्षा आपला ठरलेला प्लॅन आपण सिमला कुलु मनालीलाच जाऊया.
.................
संवाद दुसरा
तो: ऐकलस का तो माझा मावस भाऊ आहे ना, त्याच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आली आहे.
ती:अहो मग जाऊ या ना!
तो: अग जाऊ या, काय जाऊ या? एरवी कधी संबंध आहेत का? कधी फोन,? कधी पत्र,? लग्नाला आपले यांना नातेवाईक जमा करायचे असतात तेव्हा यांना आठवण होते. ते पण आपल्याला बडोद्याला जायला लागेल .
ती: अहो जाऊ या ना! त्या निमित्ताने आपलं बडोदा बघून तरी होईल. काही नको उगाच संबंध जोडायला जायचं नाही. आपल्या मुलाच्या लग्नात बोलावून पण ते कुठे आले होते! काय म्हणून आपण जायचं?
..................
संवाद तिसरा
ती :अहो वरच्या मजल्यावरचे काळे आहेत ना त्यांच्या मुलाची पत्रिका आली आहे. शेजारी तर हॉल आहे. जाण्या-येण्याचा त्रास नाही. आणि खर्च देखील नाही. शिवाय सगळी फॅमिली जाऊन जेवून येऊ,
तो: पाकीट बरोबर भरले का ग? त्यांनी आपल्या वास्तुशांतीला पाचशे रुपये टाकले होते, आणि जेवायला मात्र घरची सगळे 5/6 लोक आले होते. आपण पण पाचशे रुपये द्यायचे आणि चौघांनी पण जेवून घ्यायचे.
...................
संवाद चौथा
अगर राजेश्री ऐकलं का? आपल्या ऑफिस मधल्या सरिता च्या घरी वास्तुशांत आहे. तिने आपल्याला आमंत्रण केलंय, जायचं का?
पहिली :मला बाई वेळ नाही, मुलाची परीक्षा आहे. (मुलगा असतो तर पहिली नाही तर दुसरीत)
दुसरी: मला पण जमणार नाही. संध्याकाळी माझ्या सासूची डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे.
तिसरी: मी आले असते ग! पण ही सरिता तरी कुठे कोणाच्या कार्यक्रमाला कधी येते? आणि आली तरी तिचा हात एकदम जड, हातून कधी काही घसघशीत सुटणार नाही. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमाला कोण जाणार? जाऊ दे!
असे अनेक प्रकारचे अनेक संवाद घरोघरी घडत असतात. नव्हे! नव्हे! घडत होते.
पूर्वी आमंत्रण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. तीस-चाळीस वर्षांपूर्वी पत्रिका घरी जाऊन द्यायची. मग ते किती पण लांब रहात असू दे,दुसऱ्या गावी राहत असू दे. पण जर त्या व्यक्तीने घरी येऊन पत्रिका दिली तरच लग्नाला जायचे असे ठरलेले असायचे. किंवा असं कसं चालेल? त्यांनी घरी येऊन पत्रिका दिली म्हणजे आपल्याला कार्यक्रमाला गेलेच पाहिजे असा एक सूर असायचा.
काही ठिकाणी आमंत्रणा बरोबरच त्या व्यक्तींसाठी देण्यात येणारा आहेर किंवा मॉडन भाषेतील रिटर्न गिफ्ट देऊन टाकायचे. म्हणजे लग्नामध्ये लग्नाचा मूळ यजमान किंवा यजमान बाई या बिझी असतात. त्यामुळे कोणाला काय द्यायचे हे त्यांनी ठरवले असले तरी गफलतीने एकादी वस्तू दुसऱ्याला दिली जायची. असे होण्यापेक्षा आपण त्यांना आधी वस्तू देऊन टाकली म्हणजे समोरच्या व्यक्तीला पण त्या वस्तूच्या किमतीच्या मानाने आहेर करणे बरे पडायचे. अगदी जवळचे नातेवाईक असेल तर हजार-बाराशे च्या साड्या, जरा लांब च्या असतील तर साताआठशे च्या साड्या, त्यापेक्षा जरा लांबच्या असतील तर तीनशे ते पाचशे या गटातील साड्या, असा ठरलेला आहेर असायचा.
आमंत्रणाची अजून एक पद्धत म्हणजे अक्षदा देणे. म्हणजे आधी सर्व देवतांना अक्षदा द्यायच्या, आणि मग ज्या माणसांना आपल्याला बोलवायचे आहे त्यांच्या घरी वाटीमध्ये, अक्षदा, हळदी कुंकू, घेऊन जायचे पत्रिकेला हळदी कुंकू लावून त्या व्यक्तीच्या हातात अक्षदा द्यायच्या. आणि तुम्ही आमच्या आमच्या कार्यक्रमाला या म्हणून सांगायचे. म्हणजे त्या लोकांनी येताना त्या अक्षदा घेऊन यायच्या. मग घरी आलेल्या लोकांचे तोंड गोड करण्यासाठी काहीतरी गोडाचे बनवायचे किंवा अगदीच वेळ नसेल तर हातावरची चिमुटभर साखर ठेवायची. अशी ती लग्न, वास्तुशांत, मुंजी इत्यादी कार्यक्रमाची आमंत्रणे असायची.
जर पोस्टाने आमंत्रण करायचे झाले तर, त्या पोस्ट कार्डाला किंवा पाकीटाला हळदी कुंकवाची बोटे लावली जायची, छोटेसे स्वस्तिक काढले जायचे, आणि लग्नाचे आमंत्रण केले जायचे. पोस्ट कार्ड असेल तर फक्त हळदीकुंकू लावून दोन अक्षदा चिटकवायचे. पाकीट असेल तर आत मध्ये अक्षदा टाकायच्या.
त्यानंतर काळ बदलत गेला, आणि सगळेजण टेक्नोसॅव्ही झाले. त्यामुळे आमंत्रण आणि पत्रिका व्हाट्सअप वरती येऊ लागल्या. शिवाय फोनही केला जायचा त्यामुळे मंडळींनी तेदेखील स्वीकारलं आणि लग्नाला जाऊ लागले. पण कसं का होईना आमंत्रण केलं जायचं आणि माणसं देखील त्या निमित्ताने भेटीगाठी होतील म्हणून तरी जात असत मराठी मध्ये एक वाक्यप्रचार आहे मरणाला आणि तोरणा ला आठवणीने जायचं ते टाळायचं नाही.
पण मंडळी या सगळ्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्यात. जेव्हा अशी आमंत्रणे येत होती तेव्हा आपण हातात अगदी तराजू घेऊन बसलो होतो. आणि सगळ्या गोष्टी वरखाली बघत होतो. त्यांनी दिले तेवढेच द्यायचे, घरातील असणारी वस्तू पॅक करून द्यायची, कधी जायच नाही, कधी एकदम उभ्याउभ्या जायचे, ते आपल्याकडे कार्यालयात उभ्या उभ्या आले होते ना ! मग आपण पण तसेच ऐन लग्नाच्यावेळी जाऊ. असा विचार जो तो करत होता. त्याने काय दिलं! घड्याळ दिलं? मग आपण पण घड्याळ द्यायचं. त्यांनी नाईट लॅम्प दिला, तर आपणही नाईट लॅम्पच द्यायचा. याची वस्तू त्याला करायची, हे सारं चालू होतं.
तेव्हा आपल्याला खूप मानपान होते, तेव्हा कोणी विचार देखील केला होता का? की एक वेळ अशीदेखील येईल. दोन वर्ष झाले या अशा
आमंत्रणासाठी आपण तरसतोय, पण कोणी कशाच साध आमंत्रण पण देईना. एवढी वाईट परिस्थिती का बरं झाली? अहो तो मेला, करोना आला, त्याच्यामुळे कुठे जाण्याची सोय नाही राहिली. पूर्वी तरी सरकार शंभर लोकात लग्न म्हणत होते, नंतर पन्नास लोकांवर आले, आता तर पंचवीस लोक?
अहो यापेक्षा जास्त लोकं तर हळदी कुंकाला आणि गणपतीत आपण बोलावतो. एवढे वाईट दिवस आले आहेत ?गेल्या दोन वर्षात आमच्या साड्या कपाटात एखाद्या स्टे ऑर्डर प्रमाणे जैसे थे पडून आहेत.
ज्या ज्या ठिकाणी फिरायला गेलो, तिथून हौसेने त्या त्या ठिकाणची स्पेशालिटी म्हणून आणलेल्या बनारसी, कांजीवरम, कोटा, बांधणीची साडी, क्रश सिल्क साडी, भरलेली साडी, केरळची कॉटन, इरकली, नारायण पेठ, पैठणी, या सगळ्या जणी कपाटात रुसून बसलेल्या आहेत. आणि आपला नंबर कधी लागेल याची वाट पाहत आहेत.
अहो कपाट उघडलं की भांडतात त्या! माझा नंबर कधी,? माझा नंबर कधी? असे विचारतात.
मला तर वाटत आता सणावाराला घरातल्या घरात दरवेळेस साडी नेसावी ,आणि फोटो काढून ग्रुप वर टाकून द्यावे.
तेवढेच मनाचं समाधान
ताकावर भागवू या दुधाची तहान
दागिने सारे बँकेच्या लॉकरमध्ये ,एकतर चोराच्या भीतीने ,कार्यालयात पाऊल टाकल्यावरती पूर्वी दागिने घातले जायचे. पण आता तर कार्यालयात जाण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे दागिने कधी वापरायचे?
पुरुषांची पण तीच गत आहे. त्यांचे झब्बे, कुडते, शेरवानी, ब्लेझर , कोट, सूट सार काही आहे वॉर्डरोबमध्ये पडून आहे. माणूस हा उत्सवप्रिय प्राणी, कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्र येणे, नटणे, सजणे, एन्जॉय करणे आणि शेवटी काय तर काही काळ , असणारे ताणतणाव दे डे टुडे रुटीन विसरणे. अगदी आदिम काळापासून एकत्र येऊन सण-उत्सव मजा सजणे- नटणे सुरू आहे .
जुन्या काळात, आदिवासी काळात जरी बघितलं ,तरी ते संध्याकाळी ढोल वाजवून नृत्य करत होते. अंगावरती वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओढत होते. किंवा वेगवेगळी पाने, फुले, पिसे, अंगावर लेऊन स्वतःला नटवत होते. सजवत होते. स्वतःचा शृंगार करत होते. आपल्या काळात त्याचे स्वरूप बदलले होते इतकेच.
आता खरंच आदीमानव झाल्यासारखं वाटतंय, घर म्हणजे गुहा, मार्केट ला जाणे म्हणजे शिकारीला जाणे. किंवा लाकडं सरपण, फळं, कंदमुळं गोळा करायला जाणे .आणि जंगली प्राण्यांच्या भीतीने धावत धावत परत गुहेत येऊन बसणे. तसे करोनाच्या भीतीने धावत धावत येऊन घरात बसणे .किती पसारा वाढवला ना आपण ?
त्या सगळ्या वाचून देखील आपल आयुष्य चाललंय. आपण भारी भारी कपडे दागिने घातले नाहीत पण त्या लग्नाला पार्ट्यांना गेलो नाही तरी आपण जगतोय, पण त्या जगण्याला काही अर्थ आहे?
कोणे एके काळी
कधीतरी होईलच
ना उष:काल?
मावळेल करोना
उगवेल सकाळ