पहाट
पहाट
पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
तुला आण त्या वेचल्या तारकाची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलाची
लपेटून घे तू मला भोवताली
किंवा
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
ही गाणी जरी रोमँटिक असली तरी पहाटेचे यथायोग्य वर्णन त्यात आहे.
पहाट म्हटल्यावरती प्रथम मला हे गाणे आठवले.
पहाट म्हटलं की रात्र आणि दिवस याचा उंबरठा म्हणजे पहाट!
साखर झोप लागते ती पहाटे पहाटेच लागते.
अतिशय गुढ सुंदर आणि हवाहवासा तो वेळ असतो.
पूर्वीच्या काळी पहाटे पहाटे जात्यावरच्या ओव्यांनी दिवस उजाडायचा.
कुठून आलं आभाळ /रामाच्या पारी
गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी
अंधार असतानाच वासुदेव गाणी म्हणत यायचा .
शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी
अशी ती शुक्र चांदणी उगवण्याची वेळ देखील पहाट !
शिवाय पहाटेचा प्रहर हा शुभ आणि देवांचा प्रहर मानला जातो.
पहाट या शब्दाचा मी केलेला एक विग्रह, असा मला वाटतो. पहा हाट म्हणजे पहाट.
पूर्वी लोक भल्या पहाटे उठून बाजारहाट करण्यासाठीच जात असत, मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या गवळणी देखील भल्या पहाटे उठून जात असत. त्याआधीच आपली सारे काम, सडासमार्जन उरकून, मग पहाटे पहाटे बाजाराला जायच्या मला आपलं असं वाटतं पहाट म्हणजे पहा हाट
पहाटे वर शाळेत अजून एक कविता होती.
शतकानंतर आज पाहिली
पहिली रम्य पहाट
पाहिली पहिली रम्य पहाट
गगन निवळले ,तिमीर वितळले
क्षितिजा वर नवरंग उसळले
प्रतिबिंबित ते होऊन उठले
भारत भूमी ललाट
ही कविता स्वातंत्र्य प्राप्ती नंतरच्या परिस्थिती वर आहे.
कैलास मानस सरोवरात देखील ताऱ्यांच्या रूपाने देव पहाटे पहाटे तेथे आंघोळीला येतात.
धुंदुर मासात सकाळी सकाळी लेकुरवाळी भाजी, बाजरीची भाकरी ,त्यावर लोण्याचा गोळा, लाल लसणाची चटणी, असा सारा मेनू सूर्य उगवण्या आधीच पोटात गडप केला जातो.
पहाटे पहाटे पाखरांचा किलबिलाट, कुठेतरी वाऱ्याच्या झुळकीवर प्राजक्ताचा सुगंध थंडीच्या दिवसात पडलेले दवबिंदू तेही चंद्राच्या उजेडात चमकणारे सोनेरी उजेडात चमकणारे बऱ्याच लोकांनी पाहिले असतील पण पहाटे पहाटे जर शेतात गेलात तर ते सुंदर कण चमकताना दिसतील.
दुपार वारा, सकाळ वारा, रात्रीचा वारा, असं कोणी म्हणत नाही.
तर पहाट वारा हा शब्द आहे म्हणजे पहाटेच्या झुळका आल्हाददायक आणि मनाला सुखावणाऱ्या आनंदी करणाऱ्या असतात.
आमच्या गावातली पहाट ही माझ्या वडिलांच्या उठण्यावर असायची. आमच्याकडे विठ्ठलाचे देऊळ पूजेला होते.वडील माझे भल्या पहाटे उठायचे, तीन साडेतीनला उठत असतील मग घरातला लाईट लागला आवाज आला म्हणजे बामन उठला, मग विहिरीवर पाणी भरायला जायचे. रहाटाचा आवाज आला म्हणजे चार साडेचार वाजले.
देवळात घुमणारी स्तोत्र ऐकली म्हणजे पाच वाजून गेले.
असं घड्याळ आमच्या अळीतल्या लोकांचं माझ्या वडिलांच्या उठण्यावर असायचं
कार्तिक महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात देवांना काकड आरती होते ,ती पहाटे पहाटेच होते. थंडीच्या दिवसात भल्या पहाटे उठायचं कुडकुडत आंघोळ करायची आणि देवळात धूम ठोकायची, आणि मग ते विठ्ठलाच्या मूर्तीवर केलेले सारे सोपस्कार ,
शुद्ध पाण्याचे स्नान, पंचामृताचे स्नान, काकडा आरती ,वस्त्र नेसवणे, जेवू घालणे, आरती करणे ,हे सारे पहाटे होणारे सोपस्कार अगदी मनावर कोरून राहिलेले आहेत.