देऊळ
देऊळ
तो रोज देवळात यायचा. मनोभवे नमस्कार करायचा. काहीही होवो... दर्शनात खंड पडला नाही. असे कित्येक जण नेमाने दर्शनाला, वारीला यायचे. त्यांची भक्ती, निष्ठा पाहून देवही हरखला. इतके निस्सीम भक्त त्याचेही लाडके होते. देवाने ठरवले आज येईल त्या प्रत्येकाची इच्छापूर्ती करायची. आतुरतेने तो देऊळ अघडायची वाट पाहू लागला.
देवळाच्या दारापलीकडेही तितकीच उत्कंठा.. दार उघडताच झुंबड उडाली. देवाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी लोकांची हीsss गर्दी. देव ऐकत होता...
"आम्हा सगळ्या कुटुंबाला उदंड, निरोगी आयुष्य दे..."
"कपडेलत्ते-दागदागिने ऐश्वर्य कशाची कमतरता नको... भगवंता"
"मुलांचं भवितव्य उत्तम असू दे... बाबा. म्हातारपणाची काठी हायेत त्ये"
"आज जमिनीचा निकाल माझ्या बाजूनं लागला तर किलोभर पेढ्यांचा नैवेद्य दाखवीन..."
"परीक्षा आहे देवा. सोपा जाऊ दे पेपर..."
.....................
यादी संपतच नव्हती... माणसंही. भावभुकेल्या देवाने जेमतेम तथास्तु म्हटले आणि वरदहस्त पुन्हा कटीवर ठेवले. लोक देव सोडून सर्व काही मागत होते. जो सर्वोच्च आनंद, परमसुख देईल तो देव मात्र कोणालाही नको होता... कोणालाही नको होता.
उभा कल्पवृक्षातळी दु:ख वाहे...
घरी कामधेनू पुढे ताक मागें...