हुरहूर
हुरहूर


हुरहूरत्या संध्याकाळी सूर्याला मावळताना बघताना "भय इथले संपत नाही" ही ग्रेसची कविता लता मंगेशकरांच्या स्वरात मी अनेकदा ऐकली आहे. कवितेचा अर्थ, त्यातली गहानता, गंभीरता, लता मंगेशकरांचा आवाज वगैरे मुद्द्यांवर बोलण्याची माझी पात्रता नाही. अनेकदा हे गाणं ऐकूनही आजही संध्याकाळी हे गाणं ऐकलं की मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहते. खूप-खूप हळवं, दुखर अस सगळं आठवत. वयाच्या आणि काळाच्या ओघाने मागे टाकलेले क्षुद्र मानापमान, एखादं निरर्थक भांडण, शाळेत केलेली ती लटकी भांडण अस काहीतरी आठवत. काळाच्या पडद्याआड गेलेले जिवलग आठवतात. हयात असूनही जे गेलेल्या माणसांसारखे वागले असे "थोर" बुद्धीचे मनुष्यप्राणी आठवतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे कानात "भय इथले संपत नाही" चालू असत आणि त्याच वेळी मनाच्या आणि बुद्धीच्या कोणत्या तरी आर्त कप्प्यात माऊलींची विराणी "पडिले दूर देशी मज आठवे मानसी"गुणगुणत एक अंतर्मन अस्वस्थ फेऱ्या घालत असते. या दोन गोष्टींचा, या दोन रचनांचा आपापसांत तसा काहीही संबंध नाही. पण तरीही, ग्रेसची ही कविता मला माऊलींच्या विराणीत घेऊन जाते. आपल्या क्षुद्र आयुष्यातले वेदनेचे क्षण, कधीकाळी दुखावलं गेल्याची भावना सगळं अस उसळून वर येत आणि मग माझ्याही नकळत माझे डोळे पाझरतात. हा अनुभव ही मी अनेकदा घेतला आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. आपण एखादं पुस्तक जितक्या वेळा वाचतो तेवढ्या वेळा ते पुस्तक आपल्याला एक नवीन अर्थ सांगत अस मला वाटत. या अनुभवाचं तसच आहे. आजतागायत या गाण्याने माझे डोळे जितक्या वेळा पाझरले आहेत तो प्रत्येक अनुभव स्वतःत वेगळा आहे, खास आहे. काही गाणी अशी असतात जी मनाच्या फार-फार जवळ असतात. तुम्ही इतरांना शब्दांत त्याच कारण सांगू शकत नाही. तसच हे, "भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते."