आठवण
आठवण


आठवणी एकदा यायला लागल्या की येतचं राहतात, हो ना? समुद्रात जश्या एका लाटेमधून दुसरी लाट जन्म घेते ना तश्या असतात या आठवणी सुद्धा. आता बघ ना, काहीतरी लिहू म्हणल तरीही तिथे आहेच आठवण. नुसती आठवण नाही खर, आठवणी. खूप आठवणी. तुझ्या, माझ्या, आपल्या मैत्रीच्या, आपल्या प्रेमाच्या, आपल्या तथाकथित लग्नाच्या, आणि आता विभक्त झालो त्याच्याही. आणि असचं आठवत राहिले मी तर उशीर होईल. आपण विभक्त झालो या गोष्टीला
६ महिने झाले आता. ६ महिन्यात हे माझ ६ पत्र तुला. पत्र खरतर तुला लिहिलेलं पण माझच, माझ्यासाठी आणि उरलेल्या ५ पत्रांसारख माझ्याकडेच पडून असलेल. तुला येते का रे माझी आठवण? लिहितोस का काही? बोलायचा तर नाहीसच तू कधी पण निदान आता तरी लिहून बोलायचा प्रयत्न करतोस? किमान स्वतःसाठी तरी...
ह्या ६ महिन्यात आयुष्य खूप बदललं, खूपच बदललं. मुळात सवयी बदलल्या. कुणालातरी बांधून राहण्याची, वाट बघण्याची, कुणासाठीतरी झटून काहीतरी करण्याची, विश्वास ठेवण्याची, आणि मुख्य म्हणजे स्वतःला विसरून जाऊन कुणावर तरी प्रेम करण्याची सवय बदलली. एकटेपणा आपला वाटतो आता, आणि त्या एकटेपणावर प्रेम बसलं आहे आता, इतकं की, आता कुणी आपल्यावर प्रेम करत असेल तर त्रास होतो त्याचा. चक्क माणसं नको वाटतात. इतकं सगळ बदललं अरे, पण प्रयत्न करूनही १ सवय नाही बदलली ह्या ६ महिन्यात. आणि आयुष्यावर बदलेल अस वाटत नाही. तुझ्या खूप परिचयाची सवय आणि तुला आवडणारी. आजही बाहेर जाताना उजव्या हातात २ बांगड्या
आणि गळ्यात ते छोटस मंगळसूत्र अडकवण्याची सवय. आजही आहे. तशीच.
आता कुणीही नसलेली तुझी,
मीरा.