अलक_माझेही
अलक_माझेही
१) बाबा आधीच गेले होते. आईही गेली.
प्रॉपर्टीची वाटणी होत होती.
भांडण करून मोठ्या भावाने घर त्याच्या नावावर करून घेतलं आणि त्याच्या नोकरीच्या गावी जायला निघाला.
धाकट्या अपंग भावाला आपल्या घरी घेऊन जाता जाता आनंदाने बहीण म्हणाली,
" छान झाले.. माझ्या वाट्याला "आईपण" आलेयं"
................
२) नाळ तुटली तेव्हाच खरंतर पत्ता बदलला जगण्याचा..
आईच्या मात्र लक्षातच आलं नाही.
दोन ओळींचं का होईना..उत्तर तर नाहीच
पण आताशा गावातून शहरातल्या दिलेल्या एकमेव पत्त्यावर पाठवलेली पत्रच उत्तरादाखल परत यायला लागलीयेत..
तरीही एक भाबडी आशा घेऊन ती जगते आहे.
तिचं लेकरू हरवलंय अन् त्याचा पत्ता...
...............
३) तिला फोन आला.. आई गेली..
सगळे समजावत होते..
माणूस आहे.. कधीतरी जाणारच... वयही झालं होतं.
फक्त तिलाच जाणवत होतं..
आई गेली आणि सोबत गेलं होतं.. तिचं बालपण.. तिचं अल्लडपण.. हक्काने भांडून हवं ते मिळवण्याचं ठिकाण.. मायेनं गोंजारणारे हात.. दृष्ट लागू नये म्हणून कडाकडा मोडली जाणारी बोटं.. मनकवडं मन.. तिच्या वाटेवर शिणलेले डोळे..
अन् माहेरपण...
.............